Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हा बँक अध्यक्षांचाउद्या फैसला!

0
0

भाजप संचालकांच्या वाढदिवशी शक्तीप्रदर्शन, अविश्वास आणण्याच्या हालचाली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटबंदीनंतर आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती आता काही प्रमाणात स्थिरस्थावर होत असल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष बदलाच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. विद्यमान अध्यक्ष शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना हटवून त्यांच्या जागी भाजपचा अध्यक्ष बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या रविवारी भाजपच्या एका संचालकाचा वाढदिवस असून, या दिवशी संचालकांना स्वतंत्र स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपकडून संचालकाचे शक्तीप्रदर्शन केले जाणार असून, पुढील आठवड्यात राजीनाम्याचा प्रस्ताव अध्यक्षांपुढे ठेवला जाणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जून २०१५ होऊन कोणत्याही एका गटाला बहुमत न मिळाल्याने संचालकांनी एकत्रीत येत सत्तेचा फॉर्म्युला तयार केला होता. त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष पद हे प्रत्येकी एक एक वर्षाचे निश्चित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी नरेंद्र दराडे यांची अध्यक्षपदी, तर सुहास कांदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. वर्ष संपले, तरी दोघांनी राजीनामा न दिल्याने गेल्या एक वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या नरेंद्र दराडे यांना बदलण्यासाठी संचालकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात अध्यक्षांसह संचालक मंडळ विविध खरेदी व नोकरभरतीमुळे चर्चेत आले. तसेच, यासंदर्भात सहकार विभागाकडे तक्रारी होऊन चौकशीलाही सुरुवात झाल्याने अध्यक्षांच्याच अडचणी वाढल्या होत्या.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अचानक आलेल्या नोटबंदीने बँकेचे आर्थिक गणितच बदलले. बँक आर्थिक संकटात सापडल्याने अध्यक्ष बदलाचा विषय तुर्तास बाजूला पडला. मध्यंतरी जिल्हा बँकेच्या ३२७ कोटी बदलून मिळाल्याने आणि कर्जमाफीच्या घोषणेमुळे बँकेची आर्थिक स्थिती काही प्रमाणात स्थिरस्थावर झाली आहे. काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू झाल्याने अध्यक्ष बदलाच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे.

जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्तावही दिला होता. परंतु, हा प्रस्ताव नंतर बारगळला होता. आता भाजपने आपला अध्यक्ष जिल्हा बँकेवर बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारी भाजपच्या एका संचालकाचा वाढदिवस आहे. त्या दिवशी अध्यक्षांविरोधात असलेल्या जवळपास १५ ते १६ संचालकांनी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळेस होणाऱ्या स्नेहभोजनावेळी नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या नावावरच चर्चा होणार आहे. त्यात वाढदिवस असलेल्या संचालकाचे अध्यक्षपदासाठी पारडे जड असणार आहे.

राजीनाम्यासाठी अल्टिमेटम

भाजपच्या दोन संचालकांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपचे सध्या चार संचालक बँकेत असून, सध्या संचालकांची संख्या १९ आहेत. भाजपच्या गटाकडे १५ ते १६ संचालक आहेत. त्यामुळे सहमतीने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे. त्यासाठी आठवड्याचा अल्टिमेटम अध्यक्षांना दिला जाईल. तरीही त्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवली तर त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाप्पाचे थाटात आगमन

0
0

टीम मटा

आराध्य दैवत, सगळ्यांचे आवडते ‘बाप्पा’ शुक्रवारी मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झाले. ढोलताशे, सनई चौघडे आणि लेझीमच्या निनादात गगणभेदी जयजयकारासह गणेशभक्तांनी बाप्पाचे स्वागत केले. सजव‌लेल्या वाहनांमधून गणरायाचे आगमन होत असतांना वरुणराजाने हजेरी लावल्याने भक्तांच्या आंनदाला पारावार उरला नव्हता. पुढचे बारा दिवस विनायकाच्या सभामंडपात भक्त मोठा उत्साह साजरा करणार आहेत.

घोटीत बाप्पाचा जयघोष

घोटी - गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा जोरदार घोषणा, ढोल-ताशांचा गजरात गुलालाची उधळण करीत घोटी शहरात गणरायाचे स्वागत करण्यात दुपारनंतर पावसाने दमदार सलामी लावल्याने गणेशभक्तांचा उत्साह अधिकच वाढला.

शहरात सकाळपासूनच गणेशमूर्ती स्थापनेसाठी गणेशभक्तांची धावपळ सुरू होती. घोटी शहरातील गणेश चौकात सिद्धिविनायक मंदिरातील श्रीगणेशाची महाआरती करण्यात आली. बाजारपेठेत श्रीफळ, हार, फुले, गणेश पूजनाचे साहित्य व आरास साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. घोटी शहराबाबरोबर ग्रामीण भागातून मूर्ती खरेदीसाठी हजारो भक्त आले होते. इगतपुरी तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी व सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. जैन मंदिर परिसरात ही समस्या गंभीर होती.

पिंपळगावात जयजयकार

पिंपळगाव बसवंत शहरात सार्वजनिक मंडळासह घराघरात श्रीगणेशाची मनोभावे स्थापना करण्यात आली. अनेक सार्वजनिक मंडळांनी सकाळी वाजतगाजत गणरायाची स्थापना केली. येथील बाजारात गणेशमूर्ती बरोबरच पुजेचे साहित्य सजावट साहित्य आदी विक्रेत्यांची गर्दी होती. आगामी बारा दिवस शहरात गणेशोत्सवाची धूम राहणार आहे. शहरातील मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केले आहेत. ढोल ताशांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी पिंपळगाव शहर दुमदुमले होते.

मालेगावात मिरवणुका

शहरासह तालुक्यात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले. मोठमोठ्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी उशिरापर्यंत शहरात मिरवणुका सुरू होत्या.

मनमाडमध्ये नीलमणीचा थाट

मनमाड - शहरासह चांदवड व नांदगाव तालुक्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेल्याचे चित्र होते दुष्काळाच्या छायेतून आम्हाला बाहेर काढावं अशी आर्त साद ग्रामीण जनतेने यंदा गणरायाला घातली आहे. मनमाड शहरातील नीलमणी गणेश मंडळाच्या श्री मूर्तींची शुक्रवारी सकाळी पुणेरी थाटात पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विश्वस्त मंडळाचे नितीन पांडे, शेखर पांगुळ, किशोर पाटोदकर, रोहित कुलकर्णी, सचिन वडकते

आदींनी संयोजन केले. मनमाड पोलिसांनी गणेशोत्सवात काही भागात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू केल्याने या नव्या प्रयोगाचे नागरिकांनी स्वागत केले.
चोख बंदोबस्त मनमाड शहर परिसरात मोठी ४०, छोटी ८४ मंडळे, १९ गावात एक गाव एक गणपती, बंदोबस्त व्यवस्थेसाठी पाच पोल‌िस अधिकारी, ५० कर्मचारी, ४५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.


बागलाणमध्ये ‘श्रीं’चे स्वागत


शहरासह बागलाण तालुक्यात जल्लोषपूर्ण व उत्साहात ‘श्री’चे वाजतगाजत आगमन झाले. सकाळपासु)न शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. गणरायाची मूर्ती, आरास, प्रसाद, तसेच पुजेचे साहित्य घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह बालगोपाळांनी मोठी गर्दी केली होती. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शुक्रवारी घरोघरी ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रतिष्ठापणेसाठी दिवसभर मुहूर्त असल्याने सकाळपासूनच बाजारात सहकुटूंब सह परिवार मूर्ती खरेदी करून वाजतगाजत घरोघरी नेण्यात आली. सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ हून अधिक गावात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे. शहरात यंदा युवक मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतीची रेलचेल असल्याने पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे.

त्र्यंबकमध्ये निनादले सनई चौघड्याचे सूर


ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकनगरीत मोठ्या उत्साहात आणि पावसाच्या हजेरीत गणरायाचे वाजतगाजत स्वागत झाले. सकाळपासून गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी बाजारपेठेत ग्रामस्थांची लगबग सुरू होती. मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप होता. पर्यावरणाचा ऱ्हास नको म्हणून शहरातील गणपती विक्रेत्यांजवळ पारंपरिक सनईवादक सनई चौघडे घेऊन थांबले होते. गणेश मूर्ती घेऊन जातांना काही हौशी मंडळींनी वाजंत्रीच्या सुरात बाप्पाला घरी आणले. त्यामुळे या वाजंत्री कलाकारांनाही पैसे मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ टोळीचे धागेदोरे हाती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन खरेदी केल्याच्या मोबदल्यात कंपनीकडून ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस लागल्याची बतावणी करीत भामट्यांनी एका वृद्धास तब्बल २१ लाखांना गंडविल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. या गुन्ह्यात सहा ते आठ जणांचा समावेश असून, संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक परजिल्ह्यात रवाना झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप मुधोळकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २०१५ मध्ये त्यांनी इंडियन टुडे ग्रुपच्या ‘बॅग इट टुडे’ या संकेतस्थळावरून मुधोळकर यांनी ६६ हजार रुपये किमतीचे १० कॅरेटचे ११ हिरे खरेदी केले होते. त्यामुळे कंपनीतर्फे मुधोळकर यांना काही वस्तू मोफत देण्यात आल्या होत्या. दरम्यान, २७ मे २०१५ रोजी त्यांना युनियन कस्टमर सर्व्हिसेस कंपनीच्या दूरध्वनीवरून फोन आला. दिल्लीवरून तुम्ही ऑनलाइन खरेदी केली म्हणून तुम्हाला चार लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस लागलेले आहे. हे बक्षीस मिळविण्यासाठी भामट्यांनी मुधोळकर यांना वारंवार १० लाख ५९ हजार ६०० रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने, ‘आपली आरबीआय बँकेतील अधिकाऱ्यांसोबत ओळख असून, तुमचे सर्व पैसे परत मिळवून देतो’, असे सांगत १ लाख ३९ हजार रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुधोळकर यांनी कंपनीच्या ए. के. अवस्थी आणि अंकिता सक्सेना यांना विचारणा केली असता दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आयसी सर्व्हिसेसमध्ये अडकलेली रक्कम आणि बक्षिसाची व्याजासह सुमारे ६७ लाख ५ हजारांची रक्कम परत मिळवून देतो, असे सांगून संशयित ठकबाज विक्रम सोनी याने पुन्हा मुधोळकर यांना सहा लाख ४७ हजार ७३५ रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या संशयिताने मुधोळकर यांना फोन करून ‘तुमच्या फंडाची रक्कम तब्बल ९६ लाख रुपये झाली असून, त्यासाठी तुम्हाला ४० हजार रुपयांची प्रत्येकी चार बँक खाती उघडावी लागतील’, असे सांगितले. त्यानुसार मुधोळकर यांनी पुन्हा एक लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक करीत बँकेत खाते उघडले. मात्र, त्यांच्या पदरी काही पडले नाही. बक्षिसांचे आमिष आणि गुंतवणुकीवरील व्याजाच्या लोभापायी तब्बल २० लाख ६६ हजार ३३५ रुपयांची फसवणूक झाली. यानंतर मुधोळकर यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत बोलताना सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले की, सदर गुन्ह्यात सहा ते आठ संशयित सहभागी असल्याचे दिसते. त्यादृष्टीकोनातून काही पुरावे समोर आले असून, संशयितांच्या शोधासाठी एक पथक परजिल्ह्यात रवाना झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाच्या गणपतीची महापालिकेत स्थापना

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मानाच्या श्री गणेशाची शहर अभियंता उत्तम पवार व नीता पवार यांचे हस्ते विधिवत पूजा करून पूर्व विभागीय कार्यालय मेनरोड येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. सोबतच महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावरही वाजतगाजत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राजीव गांधी भवन येथे श्री गणेशाची विधिवत पूजा शहर अभियंता उत्तम पवार यांच्या हस्ते करून प्रतिष्ठापना करण्यात आली. शहराची व नाशिक महापालिकेची सर्व कामे निर्विघ्न व चांगली व्हावीत, याकरिता गणरायाकडे महापौर रंजना भानसी व पवार यांनी प्रार्थना केली. याप्रसंगी उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता गौतम पगारे, उदय धर्माधिकारी, एस. वाय. पवार, देवेंद्र वनमाळी, नितीन वंजारी, उपअभियंता जितेंद्र पाटोळे, राजकुमार खैरनार, पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर, गोपीनाथ हिवाळे, समृद्धी पवार, नितीन गंभिरे, गोपीनाथ हिवाळे, संतोष कान्हे, विवेक जाधव, रवी पवार, नाना साळवे, प्रवीण कऱ्हाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीबीएस’ची कोंडी फुटेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीबीएस ते मेहेर सिग्नल या वर्दळीच्या रस्त्यावर सातत्याने वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक, कोर्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालयासारखी महत्त्वाची ठिकाणे याच मार्गावर असून, येथे नागरिकांचा कायम राबता असतो. मात्र, या रस्त्याच्या निम्म्या भागावर वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडते. पोलिसांचा वाहतूक विभाग या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुरेशा उपाययोजनाच करीत नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचे दिसते.

कोर्ट परिसरात पक्षकार आणि वकील यांची वाहने उभी करण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहनधारक अन्य पर्याय शोधतात. या समस्येवर नागरिकांनीच उत्तर शोधले असून, थेट रस्त्यावर वाहने उभी करण्यातच धन्यता मानली जाऊ लागली आहे. परिणामी वाहतुकीच्या या मुख्य मार्गाचा निम्मा भाग अशी वाहने अडवीत असल्याने वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत आहे. कोर्ट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवेशद्वार आणि कुंपनाला लागूनच कुणी वाहने उभी करू नयेत यासाठी रस्त्याच्या काही भागावर दोरी बांधण्यात आली आहे. परिणामी या संबंध रस्त्यावरील निम्म्याहून अधिक जागा निरुपयोगी ठरत आहे. विशेष म्हणजे वाहनधारकांनी येथे वाहने उभी करू नयेत यासाठीच ही दोरी बांधण्यात आली असली, तरी या दोरीच्या बाहेरील बाजूस नागरिक वाहने उभी करू लागले आहेत. त्यामुळे आधीच अरुंद ठरणारा हा रस्ता अधिकच अरुंद बनला असून, सातत्याने वाहतुकीची समस्या येथे तीव्र रूप धारण करीत आहे.

सीबीएससारख्या वर्दळीच्या परिसरातच बेशिस्त वाहतुकीचे ओंगळवाणे दर्शन घडत असल्याने बाहेरगावाहून प्रथमच शहरात येणाऱ्यांपुढे त्यामुळे नाशिकचे हसे होऊ लागले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘पे अॅण्ड पार्क’ची सुविधा असतानाही तेथे पैसे द्यावे लागू नयेत यासाठी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. सीबीएस बसस्थानक ते मेहेर सिग्नलपर्यंतचा रस्ता अघोषित वाहनतळ बनला असून, पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणाऱ्या आंदोलनांच्या वेळी येथे वाहतूक व्यवस्थेचा अधिकच फज्जा उडतो. मात्र, आंदोलन आटोपले, की पोलिसही माघारी फिरतात. येथील वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात पोलिसांनाच स्वारस्य नसल्याचे पाहावयास मिळते. परिणामी वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतीची होऊ लागली आहे.

--

विद्यार्थी, पादचारी हैराण

सीबीएस परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीचा अक्षरश: फज्जा उडतो. या परिसरात अनेक शाळा आहेत. दुपारी, तसेच सायंकाळी शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस विद्यार्थी या परिसरातील बसथांब्यांवर गर्दी करतात. मात्र, येथील रस्ता अत्यंत अरुंद ठरत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच येथे थांबावे लागते. या मार्गाने पायी जाणाऱ्या नागरिकांचाही जीव टांगणीला लागतो.

--

मेळा आणि सीबीएस बसस्थानकाबाहेरील रस्त्यावर वाहन चालविणे जिकिरीचे ठरत आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने फळविक्रेते बसतात. रिक्षाथांबा, तसेच अन्य वाहनांची येथे वर्दळ असते. त्यामुळे येथून ये-जा करणे मोठे दिव्य ठरते. येथील कोंडीला रस्त्यालगत व्यवसाय थाटणारे व्यावसायिकदेखील जबाबदार असून, अशा घटकांना तात्काळ प्रतिबंध करायला हवा.

-रा. कृ. कोल्हटकर, तिडके कॉलनी

--

ट्रॅफिक इश्यू

नाशिक शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या जात आहेत. मात्र, अद्यापही शहरांतर्गत वाहतुकीचा जटिल प्रश्न सुटत नसल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विविध भागात वाहतुकीच्या समस्या भेडसावत आहेत. वाहतूक पोलिस आणि महापालिका यांच्या असमन्वयातूनही या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळेच शहरातील वाहतुकीच्या समस्यांचा ऊहापोह करणारे हे सदर आजपासून दर शनिवारी...

--

वाहतुकीच्या समस्या कळवा

त्रिमूर्ती चौकात विक्रेत्यांनी हायजॅक केलेला रस्ता, जुने सीबीएससमोरचा प्रश्न, शालिमारला रिक्षांची मनमानी, रविवार कारंजा येथे अवैध अतिक्रमण या आणि अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी ‘ट्रॅफिक इश्यू’ हे व्यासपीठ मोलाचे ठरणार आहे. म्हणूनच शहरातील वाहतुकीशी संबंधित समस्या, तक्रारी, अडी-अडचणी, तसेच अनुभव आपण आमच्याकडे पाठवू शकता. त्यासाठी मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप तुम्हाला मदत करू शकेल. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. लेखी स्वरूपातही ‘मटा’च्या डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथील कार्यालयात आपण तक्रारी देऊ शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैतन्यसरींच्या वर्षावात आले गणराय!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विघ्नहर्ता श्री गणेशाचे नाशिक शहर व जिल्ह्यात शुक्रवारी उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया-मंगलमूर्ती मोरया', ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार ’ असा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी करत सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे मंगलमयी वातावरणात स्वागत केले.

सर्वत्र घरगुती गणेशमूर्तींचीही दणक्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. वाजतगाजत बाप्पाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले असून ढोल ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सकाळपासून घराघरात गणपती बाप्पा विराजमान झाला. सकाळपासूनच गोल्फ क्लब मैदान तसेच आपापल्या गल्लीतील दुकानांमध्ये भाविक गणपती मूर्ती घेण्यासाठी पोहचले. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत प्रत्येकजण लाडक्या दैवताला घरी घेऊन गेले. सार्वजनिक मंडळांनीही ढोल ताशांच्या गजरात गणरायाला नेले. दुपारनंतर तर संपूर्ण वातावरणच गणेशमय झाले. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. मुहुर्तावर प्रतिष्ठापना करून बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचे नैवेद्य दाखवण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बाजारात झुंबड

गणरायाला घरी नेताना अबालवृध्दांचा उत्साह ओसांडून वाहत होता. बाजारात खरेदीसाठी उडालेली झुंबड, हलवायाच्या दुकानात मोदक आणि लाडूसाठी लागलेल्या रांगा, रस्त्यांवर रोषणाईची जय्यत तयारी, श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये आणि स्टॉल्सवर सुरू असलेली लगबग, गर्दी आणि सळसळता उत्साह, असे वातावरणात शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी होते. नाशिकनगरीचा कोपरा न कोपरा मंगलमय बनला. आसमंत ढोल-ताशांच्या निनादाने दणाणून गेला. सकाळपासूनच विविध मंडळांचे कार्यकर्ते गणरायाच्या मिरवणुकीत तल्लीन झाले होते. श्रींच्या मिरवणुकांनी शहरातील रस्ते गजबजून गेलेले दिसत होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेल्या रोषणाईमुळे रस्ते सायंकाळपासून उजळून निघाले होते. मंडळांचे कार्यकर्ते सजावटीवर शेवटचा हात फिरवताना दिसत होते.

मंडळांची लगबग सुरू असताना घरगुती गणेशमूर्तींसाठीही भक्तांनी गर्दी केली होती.

शेकडो छोट्या सुबक गणेशमूर्ती कोणी रिक्षामधून, कोणी कारमधून तर कोणी पायी चालत "गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात घरी नेत होते. शाडूच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा खरेदी करण्यासाठी बाजार खचाखच भरले होते. नैवैद्यासाठी लागणाऱ्या केळीच्या पानांची तडाखेबंद विक्री होत होती. बाजारपेठेतील दुकानांमध्ये आणि ठिकठिकाणी लावलेल्या स्टॉल्सवर धूप, कापूर, अगरबत्ती, चंदन, मखर, मुकुट, कंठी घेण्यासाठी गर्दी होती. फळबाजारही तेजीत होता. सफरचंद, केळी, पपई, डाळींब, मोसंबी या फळांना मागणी वाढल्याने दर चांगलेच भडकले होते. नैवैद्याचे उकडीचे मोदक घेण्यासाठी खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती.

लक्षवेधी मिरवणुका

रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरु होत्या. शुक्रवारी पहाटेपासून घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळांच्या गणेशाच्या आगमनाला सुरुवात झाली होती. मानाच्या व प्रमुख मंडळाच्या मिरवणुकीने बाप्पांचे आगमन झाले. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, भद्रकाली येथील साक्षी गणेश, गुलालवाडी व्यायामशाळा यांच्या मिरवणुका अधिक लक्षवेधी ठरल्या. या मिरवणुकीमध्ये बँडपथकासह ढोल पथकाचा समावेश होता. तसेच, शिवराय ढोल ताशा पथकामध्ये युवकांसह युवतींनीही प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.

रविवार कारंजा ते सीबीएस, एबीबी सर्कल, सिव्हील हॉस्पीटल, गंगापूर नाका या ठिकठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. काही मंडळांचा अपवाद वगळता बहुतांश मंडळांनी प्रशासनाच्या डीजे मुक्त उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.


बाप्पासाठी मोफत रिक्षा

देवळाली कॅम्प : पारिजात नगर येथील एका रिक्षाचालकाने गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांसाठी मोफत घरपोच सुविधा देत सामाजिक बांधिलकी जोपासली. प्रकाश उत्तम चव्हाण यांनी अनोखी संकल्पना राबवत ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विक्री संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठिकाणाहून नागरिकांना मूर्ती खरेदी करून घरी घेऊन जाण्याकरिता ही मोफत सुविधा देऊ केली. त्यांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. हा उपक्रम प्रकाश यांनी यंदा पहिल्यांदाच राबविला आहे. गणपतीवरील अपार श्रद्धेपोटी ही सुविधा दिल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभरात त्यांनी उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, महात्मा नगर, सिडको अशा भागांतील सुमारे ५० भक्तांना मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी मोफत सेवा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुका रोखल्यास टळतील रेल्वे अपघात

0
0

उत्तर प्रदेशात नुकतेच पाच दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्याने असे वारंवार होणारे अपघात चिंतेची बाब बनले आहेत. याबाबत मध्य व कोकण रेल्वेचे सेवानिवृत्त उपमुख्य अभियंता मधुकर सोनवणे यांच्याशी असे रेल्वे अपघात कसे टाळता येतील, या ‍विषयावर संवाद साधला असता कामाचे नियोजन व चुकांमधील वारंवारिता कमी केल्यास अपघात निश्चितच कमी होऊ शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

--

-मुझफ्फरपूरजवळ नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वेचे अत्यंत अनुभवी प्रशासन असताना असे टाळता येऊ शकत नाही का?

-होय, बऱ्याचशा प्रमाणात असे अपघात टाळता येऊ शकतील. मात्र, त्यासाठी राजकीय स्तरावर मानसिकता बदलावी लागेल. सरकार बदलले, की पूर्वीच्या तज्ज्ञ मंडळींचे अहवाल दुर्लक्षित का होतात, हा मोठा प्रश्न आहे. रेल्वे अपघाताची चौकशी सध्यासारखी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून अगर निरीक्षकांकडून न करता पूर्णतः अलिप्त व निःपक्षपाती यंत्रणा स्थापून झाली पाहिजे, तरच खरी कारणे प्रकाशात येऊन प्रत्येक अपघात जे शिकवितो त्याचा अभ्यास करून बऱ्याच झाकलेल्या प्रशासकीय त्रुटी व रेल्वेच्या यंत्रणेतील दोष सुधारता येऊ शकतील.

-सध्याच्या चौकशी यंत्रणेत मुख्यत्वे काय त्रुटी आहेत?

-आता या अपघाताची चौकशी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी हे करतील, त्यानंतर कारणे प्रकाशात येतील. वारंवार होणाऱ्या अपघातांची चौकशी पूर्णपणे स्वतंत्र, निःपक्षपाती, अभ्यासू यंत्रणा उभारून करणे आवश्यक ठरेल. मेल, एक्स्प्रेसच्या अपघातांची चौकशी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी करतात, ते रेल्वेच्या अाधीन काम करीत नाहीत. त्यांची सेवा भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाच्या आधीन असते. रेल्वेचे कोणतेही नियंत्रण त्यांच्यावर नसते. त्यामुळे बरेचसे वास्तव समोर येते. मात्र, अन्य अपघातांची चौकशी रेल्वेचे निरीक्षक किंवा अधिकारी करतात. प्रत्येक चौकशी सदस्य, अधिकारी त्याच्या डिपार्टमेंटच्या उणिवा झाकण्याचे कार्य करतात. वास्तव सत्य हे कागदावरील सत्याहून बऱ्याचदा भिन्न असते. चौकशीचे निष्कर्ष काढल्यावर जर कोणी डिसेंट नोट व सकारण दुसऱ्या बाबी प्रकाशात आणल्या, तरी बऱ्याचदा त्याकडे निष्कर्ष स्वीकारणारा मंडल वा झोन प्रभारी अधिकारी त्याचे मूळच्या डिपार्टमेंट लक्षात ठेवून अशा नोटकडे दुर्लक्ष करून ‘मेजॉरिटी फाइंडिंग अॅक्स्पेटेड’ असा शेरा मारून दुर्लक्ष करतो. डिपार्टमेंटची अस्मिता खरे कारण दडवू शकते. त्यामुळे दोष झाकले जातात. सदोष यंत्रणा चालू राहते. बहुसंख्य अधिकारी पदोन्नतीसाठी आपल्या विभागाची भलामण करतात.

--

-स्वतंत्र यंत्रणेबाबत तुमच्या काय कल्पना आहेत?

-जर संरक्षा विभाग परिचालन विभागाकडून काढून रेल्वेहून अलिप्त अशा यंत्रणेकडे, जी सध्याच्या कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडे वा तत्सम अन्य यंत्रणेकडे जी ‘इरिसेन’ पुणेसारख्या अनुभवी व तज्ज्ञ अशा स्टाफने परिपूर्ण संस्था असेल व जिचे नियंत्रण रेल्वेऐवजी अन्य मंत्रालयाकडे असेल अशाकडे सोपविला व त्यांच्याकडेच पूर्ण चौकशीचे काम सोपविले, तर बऱ्याच प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी प्रकाशात येतील. खऱ्या अर्थाने चुकांवरून शिकणे शक्य होईल. आता रेल्वे रुळावर इमर्जन्सी काम करताना कामाच्या मागे १२०० मीटरवर लाल बावटे लावून काम करावे, असा आदेश आहे.

--

-सध्याच्या आधुनिक यंत्रणा सुरक्षेसाठी वापरता येतील काय?

-होय, स्टेशनमधून गाडी जाताना गाडीच्या दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही बसवून डब्यांच्या खालचा भाग व रेल्वे रुळांची स्थिती कशी आहे, याचे रेकोर्डिंग करता येईल. अशी व्हिडीओ फिल्म तत्काळ तपासणी करणारी तज्ज्ञ मंडळी डब्यात आणि लोहमार्गात काही दोष आढळल्यास त्यांचे निराकरण करू शकतील. दुसरी गोष्ट जशी लोहपथाची अंडरलोड वर्तणूक ट्रॅक रेकॉर्डिंग कारद्वारे होते, तशी डब्यांची स्पंदने (फ्रिक्वेन्सी) मोजणारी स्पेशल गाडी धावणे आवश्यक आहे. प्रत्येक डबा व कोच ठराविक वेळेच्या अंतराने असा तपासाला गेला, तर त्यातील दोष समजतील. डबे तपासणीसाठी लपलेल्या भागांची (जसे बदलते कँबर, पिव्हट पिन, साइड बेअररमधील कमी जास्त होणारे अंतर इत्यादी) नेमकी अवस्था जाणून घेण्यासाठी आवश्यक उपकरणे शोधणे गरजेचे आहे. रुळात दडलेले स्ट्रेस व प्रत्येक रूळ व स्लीपर यांची बांधणी केल्या जागी रुळावर नेमका दाब (टो लोड) किती आहे, याची उपकरणे शोधणे आवश्यक आहे. यातील तज्ज्ञ अजूनही उपकरणे शोधू शकतील. अर्थात, तशी रेल्वेशी अलिप्त निःपक्षपाती यंत्रणा उभारली, तर अनेक सुधारणा होऊ शकतील.

--

-याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे काही उपाय सुचविले आहेत काय?

-स्टडी पेपर पाठविले आहेत. पण, उत्तर आलेले नाही. रेल्वे शक्यतो बाहेरच्या माणसांचा विचार घेत नाही. त्यामुळे रेल्वेचे उत्तर हा एकमेव आधार आहे. रेल्वेने आमच्यासारख्या माणसांचा योग्य वापर राष्ट्रकार्यासाठी करून घेतल्यास आम्ही तत्पर आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करावी

0
0

धुळे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टेंचे आदेश

म.टा.वृत्तसेवा,धुळे

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता पथकाची मासिक सभा नियमितपणे घ्यावी. ही सभा महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनापूर्वी घेऊन जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची अचानक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा दक्षता समिती सदस्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. महेश मोरे, अॅड. रसिका निकुंभ, जयश्री शहा, विधी समुपदेशक मीरा माळी उपस्थित होते.

स्त्री-भ्रूण हत्या हा विषय गंभीर असून, ही हत्या टाळण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागाने प्रबोधनात्मक उपक्रम राबविताना या केंद्रांना वेळोवेळी अचानकपणे भेटी देवून पाहणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले. त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार टळतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील केंद्रांना अचानकपणे भेटी दिल्या पाहिजेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर पीसीपीएनडी कार्यक्रमांतर्गत एकूण ६३ सोनोग्राफी केंद्र असून, त्यात दोन शासकीय, दोन शासकीय पशुवैद्यकीय, ५९ खासगी केंद्रे आहेत. त्यातील २६ सध्या कार्यरत असून, ३७ केंद्र धारकांनी स्वत:हून रेडिऑलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने बंद केले आहेत, असे डॉ. संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा व तालुका सल्लागार समितीच्या कामकाजाचा आढावा, एफ फॉर्म ऑनलाइन भरणे, टोल फ्री क्रमांक, आमची मुलगी डॉट कॉम या संकेतस्थळासह इतर माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी उपाययोजना कराव्या, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.

शिंदखेड्यात गर्भपात केंद्राची मान्यता रद्द

जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यक्षेत्रानुसार येणाऱ्या सर्व एमटीपी, सोनोग्राफी केंद्र तसेच बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत रजिस्टर रुग्णालये असे एकूण ७५ रुग्णालयांची धडक मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शिरपूर येथील १, शिंदखेडा येथील १ व दोंडाईचा येथील तीन गर्भपात केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. संबंधितांनी खुलासे सादर केले असून, त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत पुन्हा या केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात शिंदखेडा येथील गर्भपात केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली असून, इतर गर्भपात केंद्रांनी त्रुटींची पूर्तता केलेली आहे, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावगीते, व्याख्याने अन् बरेच काही

0
0

​ आठवणीतला गणेशोत्सव

वासुदेव दशपुत्रे, सांस्कृतिक अभ्यासक


नाशिक शहरातील पूर्वीचा गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव यात खूप फरक दिसून येतो. पूर्वी गणेशोत्सव असल्यावर सर्वजण एकत्र येत. परंतु आज जरी लोक एकत्र येत असले, तरी त्यांचे मन दुसरीकडेच व्यस्त असते. पूर्वी गणेशोत्सव असल्यावर मेळे आयोजित केले जात. या मेळ्यांमध्ये देशभक्तीपर गीत गायले जात. निरनिराळ्या पद्धतीने पथनाट्य सादर करून लोक इतरांचे मनोरंजन करत असत. पूर्वी देख्याव्यांना एवढी मागणी नव्हती. अगदी साध्या पद्धतीने आरास केली जात. त्यात देखील नैसर्गीक वस्तुंचा वापर केला जात. परंतु आजकाल सर्रासपणे लोक प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करतात. नाशिकमधील गणेशोत्सवाला पूर्वी अगदी साधे स्वरुप होते. गर्दी गोंधळ असला तरी लोक शांतपणे दर्शन घेत. परंतु सध्या सगळ्यांनाच घाई असल्याने लोक वेळ देत नाही. पूर्वी मिरवणुकींचे फार आकर्षण नव्हते. साध्या पद्धतीने लोक आपल्या घरची गणेश मूर्ती घेऊन जात असत. परंतु आता डीजे आणि लाऊडस्पिकरमुळे निव्वळ शोभा वाढवण्याचे काम करता. पूर्वी नाशिक आणि आजचे नाशिक यात सांस्कृत‌िक दृष्टीने विचार केला तर खूप मोठा फरक पहायला मिळतो. पूर्वी गणेश उत्सवात व्याख्याने होत. त्यामधून खूप समाजप्रबोधन केले जाई. परंतु हल्ली असे काही होत असल्याचे क्वचितच ऐकिवात येते. पूर्वी उत्सवात भावगीतांचा कार्यक्रम होत. नाशिक मधील आगळ्या वेगवेगळ्या गणेशोत्सव उत्सवाचा मी साक्षीदार असल्याने मला त्याचा अभिमान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांना अभय?

0
0

अनधिकृत स्‍थळांबाबत नगररचना विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील २००९ पूर्वी पालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांना अभय मिळण्याची शक्यता आहे. महासभेच्या ८ डिसेंबर २०१६ च्या ठरावाची अंमलबजावणीची प्रक्रिया नगररचना विभागाने सुरू केली आहे. पालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर दहा टक्के बांधकाम अनुज्ञेय करण्याची अधिसूचना नगररचना विभागाने प्रसिद्ध केली असून, त्याबाबत महिनाभरात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या तसेच सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवरील दोनशेच्या आसपास असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाने सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भातील डेडलाइन नोव्हेंबर २०१७ आहे. त्यापूर्वीच महापालिकेला अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार २००९ पूर्वीच्या आणि नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारी करीत नोव्हेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात २००९ नंतरच्या धार्मिक स्थळांवर कारवाईला पालिकेने सुरुवात करीत जवळपास दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळे जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईच्या विरोधात शिवसेनेसह काही संघटना या हायकोर्टात गेल्या आहेत. सन २००९ पूर्वीच्या ६५९ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. तत्पूर्वी या धार्मिक स्थळांना वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले होते. ८ डिसेंबर २०१६ मध्ये महासभेत पालिकेच्या मोकळ्या जागेवर असलेल्या बांधकामांना अभय देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. नगररचना विकास आराखड्यातील क्र.१३.३.८(२) तरतुदीनुसार मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत पॅव्हेलियन, व्यायामशाळा, क्लब हाऊस, विपश्यना, योगा केंद्र, संगोपन केंद्र, बालवाडी, पाण्याची टाकी बांधण्यास दहा टक्के सवलत आहे. नगररचनेच्या याच नियमाचा आधार घेत धार्मिक स्थळांच्या बांधकामांना मंजुरी मिळावी, असा ठराव पारित करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. शुक्रवारी नगररचना विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करीत याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. महिनाभरात नागरिकांनी याबाबतच्या हरकती व सूचना आयुक्तांकडे सादर कराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास मनपाच्या आरक्षित भूखंडांच्या जागेवर असलेली धार्मिक स्थळे दहा टक्के बांधकामाच्या नियमात बसवून ती नियमित होऊ शकणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा जवळपास दोनशे अनधिकृत धार्मिक स्थळांना फायदा होण्याची शक्यता आहे.

पालिकेचा आराखडा तयार

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी पालिकेने आपला अॅक्शन प्लॅन अगोदरच तयार केला आहे. नोव्हेंबरची डेडलाइन जवळ आल्याने १५ ऑगस्टपर्यंत अतिक्रमण विभाग, एमआयडीसी, सिडको यातील सर्व विभागांनी आपापला कृती आराखडा तयार करून तो पालिकेला सादर करण्याचे आदेश दिला होता. त्यानुसार या विभागांनी आपापला अॅक्शन प्लॅन तयार केला असून, कारवाईसाठी पालिका सज्ज आहे. परंतु, आता या प्रस्तावामुळे या कारवाईला काही काळ ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भडक रंगांची मिठाई टाळा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवामुळे मिठाईच्या दुकानांमधील विविध खाद्यपदार्थांना वाढती मागणी दिसून येत आहे. मात्र, या काळात भडक खाद्यरंग असलेली आरोग्यास हानीकारक असल्याने अशी मिठाई खरेदी करणे टाळावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे.

मिठाई तयार करताना अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि नियमानुसार सर्व तरतुदींचे पालन व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून, तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामारे जावे लागेल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खवा, मिठाई, मावा उत्पादकांची सखोल तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत असून, संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात येत आहेत.

ग्राहकांनी नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करावी. खरेदी करताना बिलाशिवाय आणि उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये. खवा, माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन २४ तासांच्या आत करावे. बंगाली मिठाईचे सेवन आठ तासांच्या आत करावे. शिल्लक राहिलेली मिठाई फ्रिजमध्ये ठेवावी. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास किंवा चवीत फरक जाणवल्यास ती सेवन न करता नष्ट करावी, असे आवाहन ‘एफडीए’ने केले आहे.

येथे करावी तक्रार

मिठाईची खरेदी करतान शंका आल्यास सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभाग, उद्योग भवन, पाचवा मजला, कक्ष क्रमांक २१ व २३ आयटीआय सिग्नलजवळ, सातपूररोड (दूरध्वनी- ०२५३- २३५१२०४ व २३५१२००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त उ. श. वंजारी यांनी केले आहे.

--

प्रसादासंदर्भात मंडळांना सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सणासुदीच्या काळात सार्वजनिक मंडळांनी प्रसाद बनविताना आणि वाटप करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) करण्यात आले आहे.

उत्सवाच्या काळात वाटला जाणारा महाप्रसाद अन्न पदार्थ असल्याने तो सुरक्षित असणे आणि त्यापासून भाविकांच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, सार्वजनिक मंडळांपर्यंत त्या पोहोचविण्यात येत आहेत. सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी, तसेच प्रसाद उत्पादन व वितरण करणाऱ्या व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नियमावलीमधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना करण्यात आल्या असून, अन्न पदार्थाबाबत शंका असल्यास आपल्या क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्याशी अथवा एफडीएच्या १८००२२२३६५ या क्रमांकावर हेल्पलाइन संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १०० टक्के खरीप पेरणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात ६ लाख ५२ हेक्टरवर खरिपाची १०० टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत कमी-अधिक पाऊस असला तरी गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने सर्वच ठिकाणी दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१७ मि. मी. पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्ह्यातील पीक पेरणी, पाऊस व दुष्काळाची माहिती घेतली. त्यात नाशिक जिल्ह्यातील पेरणीची माहिती समोर आली आहे.

कृषी विभागाने दिलेल्या या अहवालात म्हटले आहे, की पश्चिम भागात भात, नागली, वरई पिकांची पुनर्लावडीचे काम पूर्ण होऊन पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पूर्वभागात पेरणी पूर्ण झालेली असून बाजरी, मका, भूईमूग, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. कापूस हे पीक फुल व पाते लागण्याचे अवस्थेत आहे. उडीद व मूग ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. पूर्वभागात १० ते १५ दिवसांच्या खंडामुळे जी पिके सुकणे व करपण्यात सुरुवात झालेली होती त्या पिकांची अवस्था १८ ऑगस्टपासून चालू झालेल्या पावसामुळे चांगली झाली आहे. पावसाच्या खंडामुळे १० ते १५ टक्के उत्पादन घट होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन हे पिक शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, पाने खाणाऱ्या अळींचा अल्प प्रमाणात प्रार्दुभाव झाला असून, नुकसान पातळीच्या खाली आहे. ऊस पिकावर लोकरी मावा व पांढऱ्या माशीचा प्रार्दुभाव आढळून आला आहे. एकंदरीत जिल्ह्यात पीक परिस्थिती चांगली आहे.

दुष्काळावरही चर्चा

दुष्काळावर या कॉन्फरन्समध्ये चर्चा झाली असून, त्यात जिल्ह्यात बागलाण व सिन्नर तालुक्यात १२ टँकर सुरू असून, त्यात चार टँकर बंद होणार आहेत. जिल्ह्यातील धरणांची स्थिती चांगली असून, गेल्या वेळेस ८० टक्के धरण भरले होते. आजच्या तारखेत ते तितकेच भरले आहे. त्यातील काही धरणे १०० टक्के भरली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजियन्सचा उद्योजकतेकडे वाढता कल

0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण शिक्षणासोबतच विविध क्षेत्रांत प्रगती करताना दिसून येतो. कॉलेजेसमध्येही उद्योजकता विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून, दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकरीच्या संधी लक्षात घेऊन तरुणवर्गदेखील उद्योजकतेकडे वळत आहे. शहरातील कॉलेजमध्ये बहुतांश शिकणारे विद्यार्थी उद्योजकतेकडे वळू लागले असून, असंख्य विद्यार्थी शिक्षणासोबतच छोटे-मोठे व्यवसाय करीत आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद.

--

डिप्लोमापासून व्यवसायास प्रारंभ

डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना मी एक लहानसा व्यवसाय सुरू केला. मी माझ्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाला सुरुवात केली. इलेक्ट्रिकलचे प्रोजेक्ट तयार करून विकण्यास सुरुवात केली. तेथून माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. इलेक्ट्रिकलसोबतच इलेक्ट्रॉनिक्स विषयातील प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणेे गणेशमूर्तीच्या व्यवसायामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. जास्त प्रमाणात गणेशमूर्ती खरेदी करून वाजवी दरात त्या नागरिकांना दिल्या. सुरुवातील थोड्या अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत शिक्षणासोबतच उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज जरी माझा ठराविक असा व्यवसाय नसला, तरी गणेेशमूर्तींच्या व्यवसायाने एक नवी प्रेेरणा मला मिळाली आहे.

-निखिल गायकवाड

--

वेब पोर्टलला वाढता प्रतिसाद

मी २०१६ मध्येे चेसविकी हे पोर्टल सुरू केले. सुरुवातीला यासाठी लागणारा भांडवली खर्च उभा करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागले. परंतु, त्या अडचणींवर मात करीत आणि उद्योजक होण्याचे स्वप्न समोर ठेवून मी हे वेब पोर्टल सुरू केले. सर्व स्तरातल्या विद्यार्थांना आणि लोकांना चेस या खेळाविषयी माहिती मिळावी आणि ऑनलाइन पद्धतीने हा गेम खेळता यावा, या उद्देशाने मी हे वेब पोर्टल सुरू केले. या पोर्टलमध्ये ऑनलाइन गेम्स, प्रश्नमंजूषा, कोडे आणि इतर अन्य ऑनलाइन गेम्स व निरनिराळ्या अॅक्टिव्हिटीजचा समावेश आहे. या वेब पोर्टलच्या माध्यमातून १४५ देशांतील २५ लाखांहून अधिक लोक ऑनलाइन गेम्स खेळत आहेत. नोकरीवर अवलंबून न राहता उद्योजक बनणेे हे स्वप्न ठेवून या क्षेत्रात काम करीत आहे.

-विनायक वाडिले

--

प्रोजेक्ट बनवून केला श्रीगणेशा

मी गेल्या वर्षीपासून व्यवसायाला सुरुवात केली. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स बेस प्रोजेक्ट तयार करून विकण्यास सुरुवात केली. प्रोजेक्टसाठी लागणारे रॉ मटेरिअल विकत घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तयार मॉडेल विकण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या सिस्टिममध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट तयार करून देण्यास सुरुवात केली. प्रोजेक्टची किंमत ही त्या विद्यार्थ्याला हव्या असलेल्या सिस्टिमच्या आधारावर ठरविली जाते. मी विद्यार्थ्यांना हवी असलेली सिस्टिम अगदी वाजवी दरात देत असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी माझ्याकडे येत असतात. त्यामुळे शिक्षणासोबतच उद्योजक होण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून माझे काम सुरू आहे.

-हर्षद उकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणसाठा ८० टक्क्यांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यावर वरुणराजाने यंदा कृपादृष्टी केली असून, धरणांमधील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला असून, आजमितीस धरणांमध्ये ५२ हजार ९७१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

गतवर्षीसारखा मुसळधार पाऊस यंदा बरसला नसला तरी संतततधार पावसाने जिल्ह्यावर अभिषेक सुरूच ठेवला. दोनवेळा गोदावरी व तिच्या उपनद्यांची पाणीपातळी वाढून पूरसदृश परिस्थ‌ितीही निर्माण झाली. गंगापूर, दारणा, कश्यपी, भावली, नांदुरमध्यमेश्वरसह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. मध्यंतरी ओसरलेला पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यात लहान मोठी २४ धरणे आहेत. ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. या धरणांमधील एकूण पाणीसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणांमध्ये ५२ हजार ९७१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. चार दिवसांपूर्वी धरणांमध्ये ५१ हजार ५९९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. तो गेल्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

धरण पाणीसाठा (टक्केवारीत)
गंगापूर - ९२, कश्यपी - ९८. गौतमी गोदावरी - ९९. आळंदी - १००, पालखेड - ७७, करंजवण - ९७, वाघाड - १००, ओझरखेड - १००, पुणेगाव - ८५, तिसगाव - ९९, दारणा - ९८, भावली - १००, मुकणे - ७१, वालदेवी - १००, कडवा - १००
नांदुरमध्यमेश्वर - ९१, भोजापूर - १००, चणकापूर - ८०, हरणबारी - १००, केळझर - १००, नागासाक्या - ०, गिरणा - ५४, पुनद - ८८, माणिकपुंज - ५४, एकूण सरासरी - ८०, धरण समूह पाणीसाठा, गंगापूर - ९५, पालखेड - ८८, गिरणा - ८१

कडवा ओव्हर फ्लो

चार दिवसांपूर्वी कडवा धरणामध्ये ९० टक्के पाणीसाठा होता. गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे हा पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कडवा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गिरणा धरण समूहातील माणिकपुंज धरणामध्ये ० टक्के पाणीसाठा होता. मात्र या धरणामधील पाणीसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची हवा निकृष्ट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले नाशिक आता निकृष्ट हवा असलेल्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. ज्या शहरामध्ये हवा गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकांपेक्षा अधिक आहे, त्यांची नावे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) जाहीर केली आहेत. त्यात नाशिकचाही समावेश असून, वायूप्रदूषण रोखण्याचे आव्हान शहरासमोर आहे.

मुंबई-पुण्यानंतर नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नाशिकमध्ये औद्योगिक आणि अन्य आघाड्यांवर प्रगती होत आहे. तसेच, शहरात वाहनांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने वापरण्याचे प्रमाण नाशकात मोठे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानेही शहरात वैयक्तिक वाहने वापरली जात आहेत. शहरांमधील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत सीपीसीबीने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. या अहवालानुसार, भारतातील एकूण १२३ शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे. अशा शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकूण १७ शहरे आहेत. अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर व उल्हासनगर या शहरांमध्ये हवा गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकांपेक्षा अधिक आहे, असे सीपीसीबीने स्पष्ट केले आहे.

आपल्याकडे वाहनांचे आणि कारखान्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. ते थांबविणे गरजेचे आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी प्रदुषणावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. नव्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, स्वच्छ रस्ते देणेही आपली जबाबदारी आहे. महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी आपले शहर १०० टक्के कसे स्वच्छ होईल, प्रदूषण कसे थांबेल यावर कामाला सुरुवात करणे चांगल्या समाजासाठी, उद्याच्या स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे.

समन्वयातून शक्य

महानगरपालिकेने २५ टक्के निधी प्रदूषण रोखण्यासाठीच्या विविध बाबींवर (पर्यावरणीय कामकाज) खर्च केला पाहिजे. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महापौर या सर्वांनी मिशन म्हणून या समस्येकडे पाहणे आवश्यक आहे. पण, ते होताना दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारचे विविध विभाग यांच्यात कुठलाही समन्वय नाही. हा समन्वय झाल्यास प्रदूषण रोखणे शक्य आहे.

घातक पीएम दहा

हवेतील सर्वाधिक प्रदूषित घटकांना पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) असे म्हटले जाते. त्याची मोजणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जाते. १० मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असलेल्या प्रदूषित घटकांना पीएम १० असे संबोधले जाते. नाशिकमध्ये पीएम १०ची पातळी १४७ एवढी आहे. ही पातळी पुण्यात १४८, मुंबईत १६६ तर चंद्रपूरमध्ये १३३ एवढी आहे. पीएम १० रोज मोजले जाते. पीएम १०ची वार्षिक सरासरी ६० एवढी असणे आवश्यक आहे. पण, नाशकात ती १४७च्या आसपास आढळून आली आहे. याचाच अर्थ, दुपटीपेक्षा अधिक पीएम १० आढळून येणे मानवी आरोग्यासाठी घातक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाप्पांनी टाळले बाजाराचे विघ्न

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून मंदीत असलेल्या बाजारपेठेला बाप्पांच्या आगमनामुळे झळाळी मिळताना दिसून येत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे बाजारपेठेत चांगलीच मंदी आली. पण, आता गणपती बाप्पांच्या आगमनानंतर गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत बाजारपेठेत मोठ्या उलाढालीची चिन्हे आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांनी विविध आॅफर दिल्या असून, त्यामुळे बाजारपेठेला बूस्टर डोस मिळण्याची शक्यता वाढली आहे. गणेशोत्सवानंतर दिवाळीपर्यंत फेस्टिवल मूड राहणार असल्यामुळे माॅलसह विविध दुकानांनी त्यासाठी तयारी केली आहे. मोठमोठ्या कंपन्यासुद्धा या फेस्टिवलमध्ये चांगली विक्री होण्याची अपेक्षा ठेवून आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष नियोजनदेखील केल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर बाजारात काहीशी मंदी आली. त्यापाठोपाठ जीएसटीने व्यापाऱ्यांना घेरल्यामुळे अजूनही गोंधळ कायम आहे. मात्र, सध्याच्या फेस्टिव्हल मूडचा बांधकाम, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हॉटेलिंग, ऑटोमोबाइल, किराणा, कापड आदी क्षेत्रांतील व्यवसायाला चांगलाच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारल्यामुळे खरिपाची पेरणी शंभर टक्के झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेस त्यामुळेही दिलासा मिळाला आहे.

उलाढाल वाढणार

‘गणेशोत्सवात बाप्पांसोबत घरी न्या’ अशी टॅगलाइन वापरून मोठमोठ्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अॉटोमोबाइल्स कंपन्यांसह अनेक उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छोट-मोठ्या व्यावसायिकांनीसुद्धा त्यात उडी घेतली असून, त्यामुळे गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत मोठी उलाढाल होणार आहे.


बांधकाम व्यावसायिकांना आशा

गणपती बाप्पांचे आगमन व त्यात घराचे बुकिंग करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या अाहेत. अनेकांकडून वैविध्यपूर्ण ऑफर्स दिल्या जात असल्याने गणेशाेत्सवाच्या काळात घरांचे बुकिंग वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे बारा कोटी बुडाले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या वतीने श्रीराम को-ऑप सहकारी बँक आणि बालाजी सहकारी को-ऑप बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या तब्बल ११ कोटी ७४ लाखांच्या ठेवी आता बुडीत खात्यात जमा झाल्याचा ठपका लेखा परीक्षकांनी ठेवला आहे.

महापालिकेच्या २०१४-१५ या आर्थिक लेखापरीक्षण अहवालात याबाबत गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. वारंवार मागणी करून ही रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे या बँकामध्ये रकमेची ठेव ठेवणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असा शेरा मारण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन पदाधिकाऱ्यांसह काही बडे अधिकारी चौकशीच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध बँकामध्ये ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात श्रीराम को-ऑप सहकारी बँक आणि बालाजी सहकारी को-ऑप बँकेचा समावेश आहेत. यात श्रीराम बँकेत २००१ मध्ये ठेवी व मुदत खात्यात रक्कम गुंतवण्यात आली. महापालिकेचा निर्वाह निधी, कर्ज निवारण निधी, घसारा निधी आणि अनामत रकमा या दोन्ही बँकेत गुंतविण्यात आल्या. परंतु, २००२ मध्ये लगेच या दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली. २०१४-१५ पर्यंत श्रीराम बँकेकडे असलेल्या ठेवींची रक्कम आणि व्याज मिळून एकूण ८ कोटी ६५ लाख ३५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर २ कोटी ६५ लाख रुपये मुदत खात्यात जमा आहेत. तसेच बालाजी बँकेत १९९६-९७ मध्ये चालू खात्यात ४० लाख रुपये जमा आहेत. या दोन्ही बँकेकडे मिळून ११ कोटी ७४ लाख रुपये महापालिकेची थकबाकी आहे.
या दोन्ही सहकारी बँकेतील ठेवी व चालू रकमा परत मिळवण्यासाठी महापालिकेकडून दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही बँकांवर प्रशासक असले तरी कर्जदारांकडील वसुली झालेली नाही. त्यामुळे महापालिकेला ही रक्कम परत मिळालेली नाही. याबाबत २०१४-१५ च्या स्थानिक आर्थिक लेखापरीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. संबंधित बँकांकडे वारंवार मागणी करूनही कागदोपत्री हा निधी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या रकमा आता जवळपास बुडीत असल्याचे स्पष्ट संकेत या अहवालात दिले आहेत. त्यामुळे या ठेवी ठेवण्यांवर जबाबादारी निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पदाधिकारी-अधिकारी रडारवर
श्रीराम बँकेचे अध्यक्ष विजय पाटील हे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीही होते. त्यामुळे या ठेवी बँकेकडे वळते करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच महापालिकेचे तत्कालीन लेखा विभागाचे अधिकारीही यात सहभागी होते. त्यामुळे या प्रकरणी जबाबादी निश्चित झाल्यास बडे पदाधिकारी व अधिकारी हे चौकशीच्या रडावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. लेखा परीक्षण अहवालावर आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७३ महा ई-सेवा केंद्रे गेली कुठे?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसंदर्भात दररोज केल्या जाणाऱ्या दाव्यांची पोलखोल शिवसेनेकडून केली जाणार आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरूवारी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाईसेवा केंद्रांची यादी देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात १ हजार ८४५ पैकी अवघे १ हजार ७२ महा ई-सेवा केंद्र सुरू असून ४४३ केंद्रे गेली कुठे असा प्रश्न शिवेसनेने केला. सहकार विभागाची आकडेवारी फसवी असून, कर्जमाफी भूलभुलैया ठरल्याचा आरोपही केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची आकडेवारी व सत्यता तपासण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, प्रशांत दिवे, शामकुमार साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याकडून आकडेवारीची माहिती घेतली. यावेळी शिवसेनेकडून जिल्ह्यातील विविध बँकाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांना किती लाभ, शेतकरी अपात्रतेची कारणे काय, महाईसेवा केंद्रांची माहिती मागितली. यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली. त्यात दीड लाखांपर्यत एक लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तर दीड लाखाच्या पुढे ५९ हजार १४२ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा केला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ९५५ असल्याचे करे यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात १ हजार ८४५ महा ई-सेवा केंद्र सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, प्रत्यक्षात सध्या १ हजार ७२ केंद्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या केंद्राची यादी मागीतली. जिल्हा उपनिबंधकांकडून सोमवारी (दि. २८) ही यादी दिली जाणार शिवसेना या केंद्राची आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत सत्यता पडताळणी करणार आहे.

कर्जमाफीचा भूलभुलैया
जिल्ह्यातील अनेक सेवाकेंद्र बंद असल्याचा आरोप करत आकडेवारीही फसवीची असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. तर काही ठिकाणी विजेचा पत्ता नाही. त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी भुलभुलैया असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी केली जाणार असून तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटातून ‘टॉयलेट’प्रबोधन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता कक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे उंटवाडी येथील मल्टीप्लेक्समध्ये आयोजन करण्यात आले.
चित्रपटासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, विषय समिती सभापती सुनीता चारोस्कर व यतीन पगार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी व सर्व खातेप्रमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट स्वच्छ भारत अभियानांतर्गत महिलांसाठी शौचालयाचे महत्त्व अधोरेखित करणारा असून ग्रामीण भागात शौचालयाबाबत वास्तविकता दाखवणारा चित्रपट आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये सदरचा चित्रपट दाखवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’बाबत बुधवारी कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातमध्ये बुधवारी (दि. ३०) विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत मृदा व जलसंधारण सचिव एकनाथ डवले जलयुक्त शिवार अभियान कार्यपध्दतीबाबत तर विभागीय आयुक्त महेश झगडे २०१७-१८ मधील नियोजनाच्या रुपरेषेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विभागातील भूगर्भरचना व त्यानुसार पाणलोट उपचार, मृद व जलसंधारणाचे विविध उपचार, पाणीसाठा व आर्थिक मापदंड, पाण्याचा ताळेबंद व गाव आराखडा, एमआरएसएसी प्रणालीद्वारे विकस‌ित संनियंत्रण प्रणाली, जलसंधारण उपचार दुरुस्ती व आर्थिक मापदंड, अप्रत्यक्ष सिंचनामध्ये पाणीवाटप व्यवस्था, जलयुक्त शिवार व रोजगार हमी योजना आणि मागेल त्याला शेततळे आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.
उपसंचालक भूजल सर्वेक्षण यंत्रणा, मृदसंधारण संचालक कैलास मोते, ‘आयआयटी’ मुंबईचे संजय बेलसरे, ‘एमआरएसएसी’चे मुकुंद घारे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, ‘वाल्मी’चे संचालक हरिभाऊ गोसावी, उपसचिव नारायण कराड, नरेगा आयुक्त संजय कोलते आणि उपसचिव प्रमोद शिंदे हेही यावेळी यंत्रणेला विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी, जलसंपदा, लघु पाटबंधारे विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images