म. टा. वृत्तसेवा, सटाणा
पालिका निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार भूयारी गटारींचा प्रश्न मार्गी लावणार असून, या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन वर्षांत शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करू, असा आशावाद नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष मोरे बोलत होते. मोरे म्हणाले, शहरवासियांना दरडोई १३५ लीटर पिण्याचे पाणी पुरविण्याची क्षमता ज्या पालिकांकडे असेल त्यांनाच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करता येतो. पालिकेने पुनद पाणी योजना मंजूर करून घेतल्याने शासनाची दरडोई १३५ लीटर पिण्याचे पाणी पुरविण्याची अट पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रकल्प अहवाल तयार करण्यातील प्रमुख अडसर दूर झाल्याने आता भुयारी गटांरीचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने ई-निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार येथील अजिंक्यतारा कन्सल्टंन्स यांना प्रकल्प तयार करण्याचे काम देण्यात आल आहे. अहवाल तयार झाल्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
दहा टक्के लोकवर्गणी
भुयारी गटार, मैला व सांडपाणी प्रक्रिया करण्याकामी तसेच सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. ५० टक्के केंद्र ४० टक्के राज्य शासन व १० टक्के निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून पालिका भरणार आहे. या वेळी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट