Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘है तेरे साथ मेरी वफा’ आज रंगणार मैफल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारतीय चित्रपट संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने रसिकांना अवीट व मधुर गाणी देणारे संगीतकार मदन मोहन यांचे स्मरण म्हणून रसिकांसाठी ‘है तेरे साथ मेरी वफा’ या विशेष संगीत मैफलीचे शनिवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता विश्वास लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर, मिलिंद धटींगण व विवेक केळकर ही गाणी सादर करणार आहेत. सुप्रसिद्ध लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन करणार आहेत. मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या आठवणी वाद्यरचनेचा अभिनव वापर याविषयी अंबरीश मिश्र अभ्यासपूर्ण आणि सहज निवेदनात उलगडून सांगणार आहेत. मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.

मैफलीला साथसंगत अ‍ॅड. प्रमोद पवार (हार्मोनियम), प्रशांत महाले (कीबोर्ड), रागेश्री धुमाळ (कीबोर्ड), नीलेश सोनवणे (गिटार), आदित्य कुलकर्णी (तबला), स्वरांजय धुमाळ (ढोलक), अभिजित शर्मा (ऑक्टोपॅड) हे करणार आहेत. ध्वनी व्यवस्था तुषार बागुल यांची आहे. मैफलीची संकल्पना विश्वास ठाकूर यांची आहे.
मैफलीस अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, रऊफ पटेल, अ‍ॅड नितीन ठाकरे, विश्वास को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, सचिव विनायक रानडे, रेडिओ विश्वासचे समन्वयक डॉ. कैलास कमोद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅड. ढिकले पुरस्काराची निकिता पवार मानकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पुणे विद्यापीठ तसेच जिल्हा कबड्डी संघातर्फे अष्टपैलू खेळाडू म्हणून गणली जाणाऱ्या निकिता पवार या खेळाडूस यंदाचा अॅड. उत्तमराव ढिकले सर्वोत्कृष्ठ कबड्डी खेळाडू पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. १९) ‘मविप्र’च्या समाजदिन कार्यक्रमात जळगाव येथील जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी दोन वाजता प्रदान करण्यात येणार आहे.
मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे दिवंगत ज्येष्ठ सभासद व माजी खासदार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मविप्रतर्फे कबड्डी क्षेत्रातील सर्वोकृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूस हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार निवड समितीत ‘मविप्र’ सरचिटणीस नीलिमा पवार, ‘एनआयएस’च्या कबड्डी प्रशिक्षिका व राज्य सरकारच्या जिजामाता पुरस्कार प्राप्त शैलजा जैन, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह प्रशांत भाबड, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी काम बघितले.
या पुरस्काराबद्दल ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस अॅड. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, सर्व संचालक मंडळ यांनी निकिता पवार हिचे अभिनंदन केले आहे.
अॅड. ढिकले हे जिल्ह्यातील उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. खासदार असताना त्यांनी संसदेत केलेल्या भाषणापैकी क्रीडा व आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण उल्लेखनीय ठरले होते. यंदा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ गटातील (२० वर्षापुढील) कबड्डी खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले. पुरस्कारासाठी जिल्हाभरातून अर्ज प्राप्त झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना, काँग्रेसकडूनही भाजपच्या कोंडीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिवसेनेच्या वतीने करवाढीविरोधात अनोखे आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने महापौरांनी पत्र देऊन करवाढीला विरोध केला आहे. तसेच, सभागृहात हा प्रश्न आल्यास त्याला तीव्र विरोध केला जाणार आहे. ‘राष्ट्रवादी’नेही या करवाढीला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
थकीत घरपट्टी व पाणीपट्टीसह शनिवारी (दि. १९) होणाऱ्या महासभेत विकासकामे व अंपगाच्या विकास आराखड्यासह यांत्रिक पार्किंगचा विषय मंजुरीला ठेवण्यात आला आहे. पाणीपट्टी व घरपट्टीच्‍या मुद्द्यावरून महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची या करवाढीवरून कोंडी होण्याची शक्यता आहे.

अंपगासाठी आराखडा
अंपग कल्याण पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणी वरून महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद झाला होता. त्या वादाची परिणती आता चांगली झाली असून महापालिकेने अंपगाच्या पुनर्वसनासाठी आराखडा तयार केला आहे. १४ कोटीचा आराखडा आता २० कोटींवर नेला असून त्यात अंपगासाठी शाळा, निवारागृहाचाही समावेश करण्यात आला आहे. अंपगांना सुविधा देणे,रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा आराखडा तयार केला आहे.

यांत्रिकी पार्किंग
शहरात शालीमार, जिल्हाधिकारी कार्यालय, अशोकस्तंभ, राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, इंद्रकुंड आणि जिल्हा न्यायालयात यांत्रिक पार्किंग तयार करण्यासाठी ११ कोटी रुपयांची मंजुरी घेण्याचा विषय महासभेवर ठेवण्यात आला आहे. रोटरी पार्किंगला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता यांत्रिक पार्किंगचा पर्याय पुढे आला आहे. त्यालाही मंजुरी घेतली जाणार आहे. महासभेने मंजुरी दिल्यास या महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगची समस्या सुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी-विरोधकांचे मनपामध्ये संगनमत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्मार्ट सिटीच्या नावाखाली करवाढ करून सत्ताधारी भाजपकडून नाशिककरांची लूट केली जात असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून मंजूर झालेली करवाढ ही सुलतानी असून प्रशासकीय खर्च कमी करण्याऐवजी नागरिकांवर अपयशाचे ओझे लादले जात आहे. मुंबईत पाचशे चौरस मीटरला घरपट्टी माफ करण्याची घोषणा होत असताना नाशिकमध्ये दुप्पट करवाढ केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी करवाढ मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता करात १८ टक्के तर पाणीपट्टी करात पाच वर्षात १२० टक्के करवाढ मंजूर केली. त्याला सर्वपक्षीय विरोध होत असताना आता माजी महापौर पाटील यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. करवाढीच्या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या कारभारावर टीका केली. महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला का आली? याची कारणे त्यांनी प्रथम स्पष्ट करत भाजपसह सर्वच पक्षांवर टीका केली. प्राकलने सुधारित करणे, जादा दराच्या निविदा, लेखा परीक्षण न करणे यासह एकाच कामांवर वारंवार खर्च केला जात असून महापालिकेचा खर्च कमी करून अन्य मार्गाने उत्पन्न शोधण्यापेक्षा प्रशासनाने सादर केलेल्या करवाढीच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांनी मंजुरी देत नाशिककरांवर चुकीच्या पध्दतीने करवाढ लादल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जादा दराच्या निविदा काढणे, एकाच कामावर वारंवार खर्च करणे, लेखा परीक्षण विभागाचा अंधाधुंद कारभारामुळे महापालिका डबघाईला आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

नगरसेवकांना गाजर; नागरिकांवर बोजा
नगरसेवकांना शंभर कोटी रुपये विकासकामांसाठी देण्याचे गाजर दाखवून नागरिकांवर चारशे कोटी रुपयांची करवाढ लादली जात आहे. प्रशासनाला योग्य रितीने वसुली करता येत नसल्याने त्यांच्या अकार्यक्षमतेचा भार करवाढीच्या रुपाने नाशिककरांवर टाकला जात असल्याचा आरोप माजी महापौर पाटील यांनी केला. त्यामुळे या करवाढीविरोधात आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अनागोंदीचा कारभार
पाटील यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधक शिवसेना या दोन्ही पक्षांवरही टीका केली आहे. महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकत्रच असल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांच्या निधीच्या बदल्यात नाशिककरांवर करवाढ लादू नये. सर्व नगरसेवकांनी याविरोधात सभागृहात आवाज उठविला पाहिजे. परंतु, नगरसेवकांनी याला विरोध केला नाही तर नाशिकरांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा तोळे सोने चोरट्यांकडून जप्त

$
0
0

पंचवटी : चेन स्नॅचिंग करणाऱ्यांकडून पंचवटी पोलिसांनी १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. पंचवटी परिसरात महिल्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या खेचून पळणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली.
कृष्णा सतीश वाघ (२०, रा. नवनाथ नगर) आणि विलास राजू मिरजकर (२०, रा. पेठरोड) यांना अटक केली असता त्यांच्याकडे सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्र, अंगठ्या आढळल्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या. पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘आयएसए’तर्फे मान्सून मीट परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या (आयएसए) नाशिक शाखेतर्फे १९ आणि २० ऑगस्ट रोजी मान्सून मीट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आडगाव नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये ही परिषद होणार असून नाशिकसह राज्यातील अनेक भागातील सुमारे दोनशेहून अधिक भूलतज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत.
भूलशास्त्र हे वेगाने विकसित होत असून त्यात रोज नवनवीन संशोधन होत आहे. या नवीन बदलांची माहिती या परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींना होईल आणि त्याचा रूग्णसेवेत आधिक उपयोग होईल, असा विश्वास नाशिक आयएसएच्या अध्यक्षा डॉ. भावना गायकवाड यांनी यानिमित्त व्यक्त केला आहे. भूलशास्त्रातील नामवंत तज्ज्ञ याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यात महाराष्ट्र आयएसए अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन, जसलोक हॉस्पिटलचे डॉ. राजन दफ्तरी, नाशिकच्या डॉ. अनिता नेहेते, वाडिया हॉस्पिटल मुंबई येथील डॉ. प्रज्ञा सावंत, कार्डियाक एनेस्थेटिस्ट डॉ. अमरजा नागरे, बॅरियाट्रिक एनेसथेटिस्ट डॉ. संदीप मुथा आणि डॉ. नीलिमा गंधे अशा नामवंत डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे.

ऑपरेशन करण्याच्या आधी कोणती पूर्वतयारी आवश्यक आहे? लठ्ठपणा निवारणासाठीचे ऑपरेशन, दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टर याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. राज्याबाहेरील प्रतिनिधिंनीही परिषदेसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती आयएसए सचिव डॉ. नितीन वाघचौरे यांनी दिली आहे. अधिकाधिक संख्येने भूलतज्ज्ञांनी परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदय, मेंदूविकारांचे निदान गर्भावस्थेत शक्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
नवनवीन शोध लागत असताना वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाने अनेक आजारांवर उपचार मिळविण्यात यश येत आले. आता तर गर्भातवस्थेतच बाळाला हृदयविकार, मेंदूविकार यासारख्या गंभीर आजारांचे निदान करता येणे शक्य झाले आहे, अशी माहिती माहिती बेंगळुरूचे डॉ. रामामूर्ती यांनी दिली.
नाशिक रेडिओलॉजिकल आणि इमॅजिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित इमॅजीकॉन-२०१७ परिषदेचे समारोपाप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेत कर्नाटक, केरळ, गुजरातसह देशभरातून सुमारे साडेसहाशे डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. यावेळी डॉ. रामामूर्ती यांनी ड्रॉपलर सोनोग्राफी, त्रिमितीय व चौमिती सोनोग्राफी आदींविषयीं देखील मार्गदर्शन केले. कर्नाटकचे डॉ. भूपती यांनी नवीन थ्रीडी, फोरडी सोनोग्राफी तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. यावेळी मुंबईच्या डॉ. अल्पना जोशी यांनी छोट्या मुलांमध्ये हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार, पोटातील गाठी निदानाचे उदाहरणासह सादरीकरण केले. राष्ट्रीय परिषदेचे संयोजन डॉ. सुशांत भदाणे, डॉ. संजय देसले, डॉ. किशोर भंडारी, डॉ. मंजूषा कुलकर्णी, डॉ. विजय बर्वे आदींनी केले. या परिषदेला असोसिएशनचे माजी अध्यक्ष जिग्नेश ठक्कर, आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे हे उपस्थित होते. नाशिकमध्ये झालेल्या या परिषदेप्रमाणे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद आयोजनाची यातून प्रेरणा मिळाली असल्याचे डॉ. ठक्कर यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् चोरट्याने सुरू केला डान्स!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वेळ मध्यरात्री... सातपूर परिसरातील कामगार वस्तीत निरव शांतता... एका दुचाकीवर दोघे चोरटे आले. ते सरळ एका मंदिराच्या बंद कार्यालयाकडे गेले. एकाने पुढे होत अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. दुसरा रस्त्याच्या कडेला उभे राहून फुकटचा मलिदा मिळण्याच्या आनंदाने मस्तीत आला. हातात मोठा सुरा असलेल्या या चोरट्याने चक्क डान्स करूनच आपला आसुरी आंनद साजरा केला. ही घटना सातपूर कॉलनीतील अमृतमानी गणेश मंदिराजवळ घडली असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सातपूर तसेच अंबड अशा दोन एमआयडीसी लगतच वाढलेल्या कामगार वस्तींमध्ये घरफोडीसह इतर गुन्हे नित्याचे आहे. सातपूर कॉलनी परिसरात गुरूवारी (दि. १७) मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. हातात कोयता आणि धारधार शस्त्र घेत घरफोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी सातपूर कॉलनीतील बंद असलेले घर आणि या भागात असलेले अमृतमानी या गणेश मंदिरचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने पुढे जाऊन बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसरा चोरटा आनंदाच्या भरात थेट डान्स करताना दिसतो. भररस्त्यात हातात धारधार शस्त्र घेऊन नाचणाऱ्या चोरट्याचा हा आसुरी आनंद मानायचा की थेट पोलिसांना आव्हान याचे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे.

थेट पोलिसांना आव्हान?
सातपूर भागात घरफोडी, वाहन चोरी तसंच मद्यरात्री कामगारांना धमकावत पैसे काढून घेण्याच्या नवीन नाहीत. अनेक घटना पोलिसांपर्यंत पोहचतही नाही. त्यातच हातात धारदार शस्त्र घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास भररस्त्याने फिरणारे चोरट्यांनी सातपूरकरवासीयांच्या मनात धडकी भरवली आहे. या चोरट्यांचा शोध घेऊन पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् विरोधकांनी पळवला राजदंड!

$
0
0

अन् विरोधकांनी पळवला राजदंड!


म. टा. खास प्रतिनिधी, ना‌शिक

घरपट्टी व पाणीपट्टीवरून भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू झाला. शिवसेना व भाजपचे सदस्य एकमेकांसमोर येऊन घोषणाबाजी देत होते. यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.

विरोधक हौद्यात उतरले असतानाही महापौरांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी स्ट्रॅटेजीप्रमाणे व्यासपीठावर धाव घेतली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, संतोष गायकवाड, डी. जी. सूर्यवंशी, सुधाकर बडगुजर, दीपक दातीर यांनी थेट व्यासपीठ गाठत गडबडीत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. व्यासपीठावरून राजदंड उचलण्यात विरोधकांना यशही आले. परंतु, महापौरांच्या मदतीला सुरक्षारक्षक धावून आले. त्यामुळे राजदंडाची ओढाओढी सुरू झाली. राजदंड खेचताना महापौरांसमोरील माइक तुटला, तर तीन सुरक्षारक्षकही जखमी झाले. शिवसेनेचे नगरसेवक व्यासपीठावरून हौद्यात कोसळले. राजदंडाचा गोंधळ वाढल्याने महापौरांनी राष्ट्रगीताची घोषणा करीत सभाच गुंडाळली. त्यामुळे राजदंड कसाबसा आपल्याकडे राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले.

--

राष्ट्रगीताचाही अवमान

भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू झाला. शिवसेना व भाजपचे सदस्य एकमेकांसमोर येऊन घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे तणाव वाढल्याने व शिवसेनेच्या सदस्यांनी ओढाओढी सुरू केल्याने महापौरांनी राष्ट्रगीताची घोषणा केली. त्यामुळे महासभेत राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतरही सेनेचे सदस्य राजदंड पळवित होते, तर भाजपचे सदस्यही गोंधळ घालत होते.

--

भाजपवर भरोसा नाय काय?

‘बीएमसीवर भरोसा नाय काय’ या गाण्यावरून मुंबईत शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपचा बदला शिवसेनेने नाशिकमध्ये घेतला. ‘दादागिरी नहीं चलेगी’ या घोषणा देण्याबरोबरच हे गीत भाजपवर बूमरँग केले. सभागृहात शिवसेनेच्या सदस्यांनी ‘सोनू, तुला भाजपवर भरोसा नाय काय’ हे गीत गाऊन भाजपला बॅकफूटवर नेले.

सोनू, तुला भाजपवर भरोसा नाय काय नाय काय?

जनतेची केली त्यांनी करवाढ करवाढ

आयुक्तांचे डॉकेट कसे गोलगोल

भ्रष्टाचार जातो किती खोल खोल...

--

मनसे, काँग्रेसचा करवाढीस विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घरपट्टी व पाणीपट्टी करवाढीला भाजपसोबतच सत्तेत असलेल्या मनसेनेही आता विरोध केला आहे. मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी आयुक्तांना पत्र देऊन करवाढीला आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. ही करवाढ मंजूर करून नये, अशी मागणी केल्याने भाजपलाही झटका बसला आहे. दरम्यान, काँग्रेस करवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरली असून, पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी करवाढीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी घरपट्टीत १८ टक्के, तर पाणीपट्टीत पाच वर्षांत १२० टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने बुधवारी या करवाढीला मंजुरी दिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने या करवाढीविरोधात रान पेटविले आहे. राष्ट्रवादी व शिवेसनेने मोर्चा काढून याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शनिवारी महासभेत करवाढीवरून अभूतपूर्व गोंधळ होऊन विरोधकांनी भाजपची कोंडी केली. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या मनसेनेही करवाढीवरून भाजपला घरचा अहेर दिला आहे. करवाढीमुळे भाजपची कोंडी झाल्याचे लक्षात येताच मनसेनेही या करवाढीतून अंग काढून घेतले आहे. स्थायी समितीपाठोपाठ आता मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना पत्र लिहून करवाढीला विरोध दर्शविला आहे. आयुक्तांनी ही करवाढ करू नये, असे सांगत करवाढीऐवजी मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यातून उत्पन्न वाढविण्याचा सल्ला शेख यांनी आयुक्तांसह भाजपला दिला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी अधिकच वाढली आहे.

---

काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

भाजपच्या करवाढीविरोधात शिवेसना, राष्ट्रवादीने मोर्चा काढण्याची घोषणा केली असली, तरी काँग्रेस शनिवारीच रस्त्यावर उतरली आहे. पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी या अन्यायी करवाढीविरोधात शनिवारी गोल्फ क्लब मैदानावर स्वाक्षरी मोहीम राबविली. यावेळी नागरिकांनी करवाढीविरोधात भूमिका घेत करवाढ मागे घेण्याची मागणी या स्वाक्षरी मोहिमेत केली. त्यामुळे करवाढीवरून भाजप बॅकफूटवर गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर येथे २३ रोजी रोजगारभरती मेळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, नाशिक आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे रोजगार मेळावा होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी किमान पाच प्रतींत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणीसह शासकीय औद्योगिक संस्था, देवी मंदिर रोड, नायगाव रोड, सिन्नर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मेळाव्यात एसएससी, एचएचसी, एमसीव्हीसी, आयटीआय व कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांची एकूण १५१ रिक्त पदांसाठी निवड केली जाणार आहे.

सेवायोजन नोंदणी केली नसल्यास http://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. याबाबत काही अडचण असल्यास 18602330133 किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजूस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधांचा उपयोग करावा असे आवाहन मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी केले आहे. यापूर्वी महारोजगार नोंदणी केली असल्यास वरील सुधारित संकेतस्थळावर १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगइन करावे आणि मोबाइल व आधार क्रमांक पडताळणी करावी, तसेच लॉगइन करून जॉब फेअर टॅबवर क्लिक करून Job Fair -3 यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्यांच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समन, पेंटर, ग्रायंडर, ऑटोमोबाइल, मोटार मेकॅनिकल, वेल्डर, शीट मेटल, डी. फार्म., बी. फार्म., नर्सिंग जीएनएम, एएनएम, नर्सिंग बी.एस्सी., डिप्लोमा इंजिनीअरिंग मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, बीई, बी.टेक. सर्व क्षेत्र एचआर, एमपीएम, एमबीए, एमबीबीएस, बीएचएमएस, टॅली, सीएनसी, हार्डवेअर व नेटवर्किंग असलेल्या उमेदवारांनी भाग घ्यावा. मेळाव्यात उद्योग व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी कर्जसहाय्य करणारी सरकारची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, या सर्वांचे स्टॉल लावण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्ष नगरसेवकांचे येवल्यात आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर शहरासाठी वेळ देत नसून, ते आठ ते दहा दिवसांनी पालिकेत येत असल्याने विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप करीत चार अपक्ष नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनास टाळे ठोकले. मुख्याधिकारी दालनासमोर शनिवारी सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर डॉ. मेणकर यांनी येवला पालिकेसाठी बुधवार व गुरुवार असे दोन दिवस कार्यालयीन कामकाजासाठी देणार असल्याचे आश्वासन दिले.

मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. मेणकर यांच्याकडे येवला पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार आहे. डॉ. मेणकर येवला पालिकेला आठ- दहा दिवसांतून क्वचितच वेळ देत असल्याने शहर विकासाचा गाडा ठप्प झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी येवल्यासाठीही वेळ द्यावा या मागणीसाठी पालिकेतील शफिक शेख, अमजद शेख, रूपेश लोणारी व सचिन मोरे या चार अपक्ष नगरसेवकांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनास कुलूप ठोकले होते. मुख्याधिकारी आठवड्यातील वार जोपर्यंत निश्चित करून वेळ देत नाहीत तोपर्यंत हे कुलूप न उघडण्याचा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला. आंदोलनानंतर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉ. मेणकर कार्यालयात आले. ही माहिती माहिती मिळताच अपक्ष नगरसेवक रूपेश लोणारी, अमजद शेख, शफिक शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक दयानंद जावळे यांच्यासमवेत दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मध्यस्थी करत नगरसेवकांची समजूत काढली. मुख्याधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचे विषय ‘मार्गी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीवरून विरोधकांनी महासभेत गोंधळ घातल्याचा फायदा महापौर रंजना भानसी यांनी घेत प्रशासनाकडून आलेली सर्व विकासकामे, तसेच धोरणात्मक विषय विनाचर्चा मंजूर केले. शहरात यांत्रिक पार्किंग, अपंग विकास आराखडा, सीसीटीव्ही कॅमेरे अशा धोरणात्मक विषयांनाही विनाचर्चा मंजुरी दिल्याने भाजप गोंधळाचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा गोंधळाचा फायदा घेऊन विषय मंजूर करणाऱ्या महापौरांनी विरोधक विकासाऐवजी राजकारण करीत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या सभा गुंडाळण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारच्या महासभेत सदस्यांचे विकासकामांच्या प्रस्तावासोबतच विविध धोरणात्मक विषय मंजुरीसाठी ठेवले होेते. त्यामध्ये अपंगांसाठी २० कोटी रुपयांचा विकास आराखडा, राइट टू पीअंतर्गत महिलांना शौचालयांमध्ये मोफत प्रवेश, खतप्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ११ कोटी खर्चून शहरात यांत्रिकी पार्किंग उभारणे या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. परंतु, विरोधकांनी करवाढीचा मुद्दा उपस्थित करीत गोंधळ घातल्यानंतर महापौर भानसी यांनी आयुक्तांचे विषय मंजूर करीत सभा गुंडाळली. गेल्या महासभेतही महापौरांनी अशाच प्रकारे धोरणात्मक विषयांना गोंधळाचा फायदा घेत मंजुरी दिली होती.

महापौरांच्या घोषणेमुळे आता अपंगांसाठीचा २० कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. शहरात शालिमार, जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक स्तंभ, राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, इंद्रकुंड आणि जिल्हा न्यायालयात यांत्रिक पार्किंग तयार करण्यासाठी ११ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

---

विरोधकांवर हल्लाबोल

विरोधकांच्या गोंधळानंतर बॅकफूटवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. महापौरांनी विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शिवसेनेचा खासगी कार्यक्रम असल्याने गोंधळ घालून सभा बंद पाडल्याचा आरोप केला. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी करवाढ केल्याचे पुन्हा एकदा सांगत अंतिम ठराव झाला नसल्याचा दावा केला. शहरात विकासकामे मार्गी लावायची असतील, तर करवाढ आवश्यक असल्याची भूमिका घेतली. भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी शिवसेनेने ३५ कोटी रुपयांचे विषय घुसविल्याच्या आरोपाचा खुलासा करताना सदस्यांच्या विकासकामांचे विषय मंजूर केल्याचे सांगितले.

--

शहराध्यक्षांची सारवासारव

महापालिकेत गोंधळ झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा निरोप सत्ताधाऱ्यांकडून मिळाल्यानंतर शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेत धाव घेतली. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत यावेळी त्यांनी गुफ्तगू केले, तसेच करवाढीसंदर्भात आस्तेकदम घेण्याची भूमिका घेतली. तूर्तास वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. नाशिककरांवर अन्याय होणार नाही, असा निर्णय करवाढीबाबत घेऊ, असा दावा सानप यांनी पत्रकारांसमोर केला. करवाढीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगत, करवाढ करण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार महासभेला आहे. महासभेवर विषय आल्यास त्यावेळी चर्चा होईल, असाही दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणमुक्तीस फेरीवाल्यांचा विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर हागणदारीमुक्त मोह‌िमेला यश मिळाल्यानंतर महापालिकेने आता शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणावर लक्ष केंद्रीत केले आहे. २१ ऑगस्टपासून या मोहिमेस सुरूवात होणार आहे. याबाबत शहरातील अतिक्रमणधारक व फेरीवाले यांच्याशी चर्चा विनिमय करण्यासाठी शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत फेरीवाला समितीच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाकडून विश्वासात न घेता ही करवाई सुरू केली जात असल्याचा आरोप केल्याने अतिक्रमणमुक्त शहर मोहीम सुरू होण्याआधीच त्यास विरोध सुरू झाला आहे.

येथील जाखोटे भवन येथे महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे, पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, उपायुक्त कमरुद्दीन शेख आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आयुक्त धायगुडे म्हणाल्या, शहर हागणदारीमुक्त केल्यानंतर शहर अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्ये वाहतुकीसाठी मोकळे केले जाणार आहेत. तसेच केवळ या उत्सव काळासाठी ही मोहीम राबविण्यात येणार नसून, कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

महापौर रशीद शेख म्हणाले, अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यावर विनाकारण त्यास जातीय रंग दिला जातो. असे होवू नये शहर स्वच्छ सुंदर राहावे यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. तसेच या मोहिमेची सुरुवात स्वतः माझ्यापासून, नगरसेवकांपासून करावी. म्हणजे सामान्य मालेगावकर आपणहून अतिक्रमण काढतील असे त्यांनी सांगितले. गजानन राजमाने यांनी देखील या मोहिमेसाठी पोलीस प्रशासन कायदेशीर सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

फेरीवाला समितीचा विरोध

बैठकीत उपस्थित शहर फेरीवाला समितीचे सदस्य दिनेश ठाकरे यांनी या मोहिमेबाबत फेरीवाला समितीचे व अतिक्रमण धारकांचे म्हणणे ऐकूण घ्यावे अशी विनंती केली असता बैठक आटोपती घेण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे यांनी यावेळी शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फेरीवाला समितीला विश्वासात घेण्यात आलेले नाही. अद्याप शहरातील हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित झालेले नसताना ही मोहीम राबवून रस्त्यावर पोट भरणाऱ्यांचा रोजगार हिरावू घेतला जात आहे. याबाबत फेरीवाला समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी उपस्थित फेरीवाले तसेच अतिक्रमण धारकांनी आम्हाला बोलू दिले जात नसल्यास बैठक का घेतात? असा संतप्त सवाल केला. दरम्यान आयुक्त धायगुडे यांनी याबाबत फेरीवाला यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायक्रो गणेशांचे प्र‘दर्शन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे सिन्नर येथील कलावंत संजय क्षत्रिय यांनी बनविलेल्या दहा हजार मायक्रो शाडूमाती गणेशांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्याद्वारे नाशिककरांना मायक्रो स्वरूपातील विविध रुपांतील गणरायांच्या दर्शनाची संधी उपलब्ध झाली आहे.

अण्णासाहेब मुरकुटे सभागृह, मुरकुटे कॉलनी, नवी पंडित कॉलनी, गंगापूररोड येथे आयोजित केलेले हे प्रदर्शन आज, रविवारी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले. उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, माजी उपमहापौर मनीष बस्ते, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, कलावंत संजय क्षत्रिय यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शनात नाचणारे गणेश, बासरी, तबला वाजविणारे गणेश आदींचा समावेश आहे. या प्रदर्शनात सुपारीवरील गणेशमूर्ती, नखावरील गणेशमूर्ती, ५१ मायक्रो हत्ती, ८१ गणपतींची दहीहंडी, खडू गणेशदेखील बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. दोन लाख मण्यांपासून बनविलेले सुवर्णमंदिरदेखील येथे ठेवण्यात आले आहे. नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे. सागर बनकर, अमोल उबाळे, आकाश जाधव, आशिष बनकर, अभिषेक रहाळकर, प्रमिला पाटील आदी प्रदर्शनाचे संयोजन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘कामायनी’ थांबणार लासलगावला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कामायनी एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून सुरू असलेल्या लासलगावकरांच्या लढ्याला अखेर यश आले. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता लासलगाव रेल्वे स्‍थानकावर कामायनी एक्स्प्रेसचा येऊन थांबली आणि ग्रामस्थ व प्रवाशांनी एकच जल्लोष केला.

मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसला शुक्रवारी सायंकाळी थांबा देण्यात आला. भाजपचे समीर चव्हाण यांच्यासह नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य डी. के. जगताप, जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभापती मनीषा पवार, रेल्वेचे भुसावळचे उपमहाप्रबंधक यादव, ललिता देवढे उपस्थित होते.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लासलगाव येथील कार्यक्रमप्रसंगी लासलगाव रेल्वे स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसला थांबा जाहीर केला होता. त्यानुसार ११०७२ अप कामायनी एक्स्प्रेसला शुक्रवारी लासलगावी थांबा सुरू झाला. यामुळे आता सायंकाळी उश‌िरा नाशिक व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. ही रेल्वे १८ ऑगस्टपासून लासलगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळी सहा वाजून पाच मिन‌िटांनी थांबून पुढच्या दोन मिन‌िटांत निघणार आहे.

लासलगावला गाड्यांच्या थांब्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित होती. लासलगावहून रेल्वेने ये- जा करणारे विद्यार्थी, व्यापारी व नोकरदारांची संख्या मोठी आहे. नाशिकहून लासलगावकडे येण्यासाठी सकाळी साडेअकराच्या पॅसेंजरनंतर सहा तासांनी सायंकाळी सहा वाजता गोदावरी एक्स्प्रेस आहे. विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय होत होती. या गाडीला थांबा मिळाल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे.

निफाडला मात्र ठेंगाच

कामायनी एक्स्प्रेससह पुणे येथे जाणारी पॅसेंजर निफाड येथे थांबावी, यासाठी निफाड येथील नागरिक व प्रवाशांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना अनेकदा निवेदने दिली. मात्र, निफाडकरांच्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. लासलगाव येथील मागणी निफाडनंतरची असूनही त्यांची मागणी पूर्ण झाली. त्यामुळे निफाड येथील प्रवासी व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गठबंधनचा सभात्याग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात मलेरिया औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर खरेदीचा विषय येथील महापालिका महासभेत चांगलाच गाजला. यानिमित्ताने शहरात पसरलेली अस्वच्छता व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासनाकडून उपयोजना केल्या जात नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. तर ट्रॅक्टर खरेदीवरून प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता न आल्याने गठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांच्यासह आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

येथील महापालिका सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थितीत महासभा आयोजित करण्यात आली होती. महासभेच्या प्रारंभी एमआयएमचे गटनेते खालिद परवेज यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या घरकुल योजनेचा विषय चर्चेला आला. यावेळी परवेज यांनी या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना घरकुल मिळाले असून त्यांना देण्यात आलेल्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र हा विषय महासभेच्या अखेरीस चर्चेसाठी घेण्यात आला.

दरम्यान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरात मलेरिया औषध फवारणीसाठी १४व्या वित्त आयोगातून प्राप्त अनुदानातून १० ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या खर्चास मान्यता देण्याचा विषय चर्चेस येताच गटनेते बुलंद इक्बाल यांनी सभागृहाने या आधीच १० ट्रॅक्टर खरेदीस मान्यता दिली असून, ते खरेदी केले असल्याचे स्पष्ट केले. आधीचे ट्रॅक्टर असताना नव्याने अशा खरेदीच्या खर्चास मान्यता घेण्याचा विषय महासभेपुढे येतोच कसा? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच त्या १० ट्रॅक्टरची सध्याची स्थिती काय याबाबत प्रशासनास जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांच्यासह आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. महापौर शेख यांनी हा विषय तहकूब करीत याबाबत सविस्तर माहिती सादर करावी अशी सूचना प्रशासनास केली.

घरकुलच्या चौकशीची मागणी

घरकुल योजने संदर्भातील विषयावर जोरदार चर्चा झाली. यात उपमहापौर घोडके यांनी या योजनेतील निम्मेहून अधिक लाभार्थी बोगस असल्याचे सांगून प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. हा विषय गंभीर असून यावर सविस्तर चर्चा सभागृहात व्हावी यासाठी पुढील महासभेत घेण्यात येईल असे महापौर शेख यांनी सांगितले. यावेळी चर्चेत उपमहापौर सखाराम घोडके , गटनेते नीलेश आहेर, ज्योती भोसले, ताहेरा शेख, असल अन्सारी, युनुस इसा, मदन गायकवाड आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

या विषयांना मंजुरी

पालिकेने नेहरू रोजगार सेंटर शेल्डर योजनेअंतर्गत घर दुरुस्तीसाठी दिलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम माफ करणे, सर्वे न. १०७ मधील कब्रस्थानला संरक्षण भिंत व हॉल बनवणे तसेच मदरसा इनामुल उलुम दरेगाव शिवार व मन्सूर कॉलेज येथे पाणी पुरवठासाठी जलवाहिनी टाकणे आदी विषय चर्चेअंती मंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खंडणी’प्रकरणी तिघांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चौघा जणांविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापैकी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून, कोर्टाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

आबा पाटील, अक्षय परदेशी, केतन क्षीरसागर आणि भगवान घुगे अशी संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. यातील परदेशी वगळता उर्वरित तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कामगार क्रांती माथाडी संघटनाप्रणीत संस्कृती फाउंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नावाखाली संशयितांनी पैसे संकलित करण्याचे काम सुरू केले होते. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संशयितांनी अंबड एमआयडीसीतील प्रणीत मशिन टूल्स या कंपनीमध्ये फिर्यादी दिलीप त्र्यंबक वाघ यांची कोणतीही परवनागी न घेता प्रवेश केला आणि वर्गणी म्हणून ११ हजार रुपये देण्याची धमकी दिली. पैसे न दिल्यास कंपनीत काम होऊ देणार नाही, तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिली. एवढी मोठी रक्कम देण्याची वाघ यांची तयारी नसल्याने त्यांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी लागलीच खंडणीचा गुन्हा नोंदवून घेत तिघा संशयितांना जेरबंद केले. याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक कड यांनी सांगितले, की परदेशी वगळता तीन संशयित अटकेत असून, त्यांना कोर्टाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरारी परदेशीस लवकरच अटक करण्यात येईल. वर्गणी ऐच्छिक असून, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी कोणावरही जबरदस्ती करू नये, याविषयी शांतता कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे कड यांनी स्पष्ट केले.

--

वर्गणीसाठी नागरिकांवर दबाव टाकता येणार नाही. वर्गणी ऐच्छिक असून, एखाद्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून जबरदस्ती होत असल्यास नागरिकांनी थेट पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा.

-मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांबाबत कानावर हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नैसर्गिक नाल्यांवर एकीकडे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या असताना महापालिकेच्या नगररचना विभागाने मात्र नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत संशयास्पद भूमिका घेतली आहे. शहरातील नैसर्गिक नाल्यांवर एकीकडे अतिक्रमण झाल्याचे मान्य करीत दुसरीकडे मात्र किती नैसर्गिक नाले शहरात आहेत, याची माहितीच उपलब्ध नसल्याचा अजब दावा केला आहे.

विशेष म्हणजे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत संकलित माहितीच उपलब्ध नसल्याचा दावा महापालिकेच्या नगररचना विभागाने केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाची माहिती दडवून नगररचना विभागाने बिल्डरधार्जिणे धोरण स्वीकारल्याने सत्ताधारीही चक्रावले आहेत. शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाबाबत सभागृहनेते दिनकर पाटील आणि सदस्य रवींद्र धिवरे यांनी नगररचना विभागाला प्रश्न विचारले होते.

शहरातील नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे नगररचना विभागाने धीवरे यांच्या प्रश्नावर मान्य केले आहे. दुसरीकडे पाटील यांनी नैसर्गिक नाल्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना अजबच उत्तरे दिली आहेत. शहरात किती नैसर्गिक नाले आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला नगररचना विभागाने बगल देत अभिलेखात संकलित स्वरुपात माहितीच उपलब्ध नसल्याचे गजब उत्तर दिले आहे. ब्रिटिशकालीन नाल्यांचे नकाशेही उपलब्ध नसल्याचा दावा करीत नगररचना विभागाने बिल्डरांना नैसर्गिक नाल्यांचे रानच मोकळे करून दिले आहे. विशेष म्हणजे किती नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे, याचीही माहिती उपलब्ध नसल्याचा दावा नगररचना विभागाने केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्यास प्राप्त तक्रारीनुसार कारवाई केली जात असल्याची भूमिका नगररचना विभागाने स्पष्ट केली आहे.

शहरातील नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकाम कधी झाले, याची माहितीही नगररचना विभागाकडे नाही, तर दुसरीकडे तक्रार आल्यानंतर तात्काळ नियमानुसार नाल्यांवरील अतिक्रमण काढले जात असल्याचा गजब दावा केला आहे. परंतु, किती बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त केली याची माहिती मात्र विभागाने पद्धतशीरपणे दडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहराची मातृसंस्था असलेल्या महापालिकेकडे शहरातील नैसर्गिक नाले व त्यांच्यावरील अतिक्रमणांबाबत माहिती नसणे ही शहरासाठीच धोक्याची घंटा आहे. दुसरीकडे नगररचना विभाग नैसर्गिक नाल्यांबाबत बिल्डरधार्जिणी उत्तरे थेट सत्ताधारी नगरसेवकांनाच देत असल्याने आयुक्तांचे या कार्यालयावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

--

मग इमारती उभ्या कशा?

सातपूर, नाशिक पश्चिम, सिडको, पंचवटी या विभागांतील नैसर्गिंक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होऊन थेट गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे या इमारतींना याच नगररचना विभागाने मंजुरी दिली आहे. या इमारतींबाबत असंख्य तक्रारी असतानाही केवळ बिल्डरांच्या दबावापोटी व आर्थिक उलाढालीमुळे त्यांना भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, तर दुसरीकडे अनेक झोपडपट्ट्या या नैसर्गिक नाल्यांवर उभ्या राहिल्या असतानाही नगररनचा विभागाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस उपनिरीक्षक अपघातात मृत्युमुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या नारायणबापू चौकापासून टाकळीकडे जाणाऱ्या मार्गावर आज दुपारी दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात सिन्नर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. अपघातात दुसरा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सिन्नर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे उपनिरीक्षक रमेश नारायण साळी टाकळी रोड परिसरात राहत होते. ते आपल्या अॅक्टिवा दुचाकीवरून (एमएच १५/ईझेड ०५०४) दुपारी जात होते. टाकळी रोडवरील शेलार फार्म हाऊसजवळ समोरून येणाऱ्या पॅशन प्रो (एमएच १५/सीए ११०३) या मोटारसायकलने अॅक्टिवाला जोरदार धडक झाली. त्यात साळी रस्त्यावर पडून घसरत गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर व उपनगरचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांनी मृतदेह उचलण्यास विलंब केल्याचा आरोप या वेळी केला. ठाकूर यांनी नातेवाइकांची समजूत घातली, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर समाजाची स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात

$
0
0

समस्यांचे ग्रहण सोडविण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पालिका प्रशासनाकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने देवळाली गावातील वालदेवी नदीच्या काठावर असलेल्या धनगर समाजाच्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमीला सध्या विविध समस्यांचे ग्रहण लागल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावर उपाययोजना करून या समस्यांच्या विळख्यातून स्मशानभूमीची सुटका करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

देवळाली गावात वालदेवी नदीच्या काठावर इदगाह शेजारी धनगर समाजाची स्मशानभूमी आहे.या स्मशानभुमीच्या देखभालीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सध्या ही स्मशानभूमी विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. या ठिकाणी पालिकेकडून कोणत्याही स्वरूपाची मूलभूत सुविधा पुरविली जात नसल्याने येथे धार्मिक विधीसाठी येणाऱ्या धनगर समाजातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

स्वच्छतेचा अभाव

या स्मशानभूमी परिसरात पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडून दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने आजूबाजूस अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिक या जागेचा वापर शौचविधीसाठी करीत असतात. याशिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रानगवत व झाडी-झुडपेही वाढलेली आहेत. येथील शेडमध्येही मोठ्या प्रमाणात धूळ व अस्वच्छता झालेली आहे. त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

डेब्रिजमुळे गैरसोय

या स्मशानभूमीजवळील जागेचे जणू काही डंपिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. स्मशानभूमी शेडच्या मागील बाजूसही मोठ्या प्रमाणात डेब्रिज व कचरा पडलेला आहे. या कचऱ्यामुळे या स्मशानभूमीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. संरक्षण भिंत नसल्याने या जागेचा वापर डंपिंग ग्राऊंडप्रमाणे होत आहे.

पथदीप बंद, पाणी नाही

या स्मशानभूमीजवळ एकच पथदीप असून, तोही काही वर्षांपासून बंद आहे. या ठिकाणचा बंद पथदीप दुरुस्त करण्याची पालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार मागणी केली असली तरी अद्यापही येथील बंद पथदीप दुरुस्त करण्यात आलेला नाही. याठिकाणी पाण्याचीही सुविधा नाही. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोट००

देवळाली गावातील धनगर समाजाच्या स्मशानभूमीकडे पालिका प्रशासनाचे आजवर सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसून परिसरात स्वच्छता होत नाही. जवळच इतर काही मंदिरे आहेत तेथे मात्र पालिका प्रशासन सुविधा पुरविण्याबाबत दक्षता घेते. मग स्मशानभूमीकडे दुर्लक्ष का?

-किशोर वाघ, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images