Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवैध मद्य तस्करी उघड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाच्या अवैध धंदेविरोधी पथकाने घोटी परिसरातील चार हॉटेलवर छापे टाकून बेकायदा मद्यसाठा हस्तगत केला. याच दरम्यान, पोलिसांनी घोटी सिन्नर मार्गावर वाहन तपासणी करीत अहमदनगर जिल्ह्यात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या कारचालकास अटक केली. या कारवाईत सुमारे ८० हजाराच्या दारू साठ्यासह कार असा पाच लाख ७९ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. याबरोबरच पथकाने म्हाळसाकोरे गावातील हॉटेल व किरणा दुकानावर छापा टाकून सुमारे साडे दहा हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

गुरुवारी पहाटे झालेल्या या कारवाईत चौघा हॉटेलचालकांसह कारचालकाविरूद्ध घोटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हायवेवरील बिअरबार आणि दारू विक्री दुकाने बंद पडले असून, तस्करांनी आपला मोर्चा येथे वळवला आहे. घोटी परिसरातील हॉटेल व ढाब्यांवर मद्याची विक्री होत असल्याची माहिती अधीक्षक संजय दराडे यांना मिळाली होती. विशेष भरारी पथकाने गुरूवारी छापा सत्र राबवून ही कारवाई केली. घोटी परिसरातील पिंपळगाव मोर शिवारातील हॉटेल दिपाली, मुंडेगाव शिवारातील हॉटेल चैतन्य आणि हॉटेल तनिष्का तसेच हॉटेल किनारा समोरील ढाब्यावर पोलिसांनी छापे टाकले असता अनुक्रमे गौतम संकला यादव (२४ रा.पिंपळगाव मोर मुळ मध्यप्रदेश) मारूती रूपचंद गतीर (३० रा.मुंडेगाव),नीलेश सुरेश पदमेरे व भालचंद्र गोपीनाथ बागडे (३७ रा. नांदगाव सदो ता. इगतपुरी) आदी विनापरवाना मद्याची विक्री करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगारेंचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज फेटाळला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नामंजूर केला आहे. पालिकेत अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने त्यांचा अर्ज स्विकारता येणार नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे पगारे यांना सेवेत कायम रहावे लागणार असले तरी, त्यांच्याकडील कामांचा भार कमी करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

पगारे यांनी आयुक्तांकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी दोन ऑगस्ट रोजी अर्ज केला होता. पालिकेत आधीच अधिकाऱ्यांची कमतरता असताना लागोपाठ तिसऱ्या अधिकाऱ्याने स्वेच्छा निवृत्त‌ीसाठी अर्ज केल्याने प्रशासन पेचात सापडले होते. पगारेंच्या अर्जामागे वैयक्तिक कारण असले तरी, सध्या पालिकेत पावसाळी गटार योजनेवरून सुरू असलेले राजकारण त्याला कारणीभूत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. पगारे यांच्याकडे भुयारी गटार योजनेचा पदभार होता. परंतु, सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला जात असल्याने ते त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याची चर्चा आहे. परंतु आयुक्तांनी आता त्यांचा अर्ज फेटाळून लावला असून त्यांच्यावरील कामाचा भार काहीसा हलका करण्याचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वदेशी राखी जपतेय बंधूप्रेम

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अवघ्या काही तासांवर भावा बहिण्याच्या नात्याचा पवित्र सण अर्थात रक्षाबंधन आला असून, शहरातील बाजारपेठा आकर्षक, देखण्या राख्यांनी फुलली आहे. लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करण्याकरिता दुकानांत गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे यंदा स्वदेशी राखीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

शहरातील मोसमपूल सर्कल, संगमेश्वर, सटाणा नाका, रावळगाव नाका, सोमवार बाजार येथे राख्यांची दुकाने सजली आहेत. सायंकाळी या दुकानामध्ये तरुणींसह महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. विद्युत रोषणाईमुळे राख्या अधिकच सुरेख दिसत आहेत.

यंदा बाजारात विविध प्रकराच्या राख्या दाखल झाल्या आहेत. यात फॅन्सी, स्टोन, जरी, लुम्बा, किड्स राखी असे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसाठी मात्र बाहुबली, छोटा भीम, बाळ श्रीकृष्ण, क्रिश, मोटू पतलू यांच्या छबी असलेल्या राख्यांना मोठी मागणी आहे. किमत वाढल्या तरीही खरेदीचा उत्साह

बाजारात रक्षाबंधननिमित्त राख्यांची दुकाने सजली असली तरी यंदा या राख्यांवर देखील जीएसटी लागू झाल्याने किमतीत वाढ झाल्याचे होलसेल विकेते सांगतात. राखी बनवण्यासाठी लागणारे कच्चा माल महाग झाल्याने किमतीत वाढ झाली आहे. मात्र दुकानात पाच रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत. किमंत वाढलेली असली तरी राख्या खरेदीचा उत्साह कायम आहे.

देशाच्या सीमांवर सध्या भारत चीन यांच्यात तणावाचे वातावरण असल्याने अनेकांनी चायना मेड राख्यांपेक्षा स्वदेशी राख्यांना पसंती दिली आहे काही विक्रेते ‘स्वदेशी राखी’ असे फलक लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वर अक्षर गणेश १५ ऑगस्टला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संवेदना फाउंडेशन आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता विश्वास लॉन्सवर स्वर अक्षर गणेश कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका मीना परूळकर- निकम आणि सुलेखनकार अच्युत पालव प्रथमच एकत्रितपणे सुरांच्या साथीने अक्षरगणेशाचे दर्शन घडविणार आहेत.

मीना परूळकर-निकम यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली असून, हा कार्यक्रम अथर्व मोशन पिक्चर्स प्रस्तुत आहे. या कार्यक्रमात जवळ जवळ १८ गाणी सादर होणार असून, मीना परूळकर-निकम यांना पार्श्वगायक ज्ञानेश्वर कासार व संदीप थाटसिंगार साथ देणार आहेत. या कार्यक्रमात कीर्ती भवाळकर गणेशावर आधारित ३ गणेशरचना नृत्यामार्फत सादर करणार आहेत. अच्युत पालव तीन फूट, दोन फुटांचे सहा कॅन्व्हास पेंटिंग करणार आहेत.

कार्यक्रमाची संहिता किशोर पाठक यांनी केली असून, पूर्वी भावे निवेदन करणार आहेत. अमोल पाळेकर हे वाद्यवृंदाचे संयोजन करणार असून, त्यांच्या साथीला नाशिकमधील सर्व प्रसिद्ध वादक कलाकार आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम नाशिकमध्ये प्रथमच होत आहे.

संवेदना करणार जनजागृती

संवेदना फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून समाजातील विविध विषयांवर जनजागृतीचे काम करीत असते. यंदाही संस्थेने कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह गणेशाबाबतची जनजागृती करण्याचे ठरविले आहे. हल्ली गणेशमूर्तीची होत असलेली विटंबना, मूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्याचा भाविकांचा आग्रह, शाडू मातीऐवजी प्लाटर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वाढता वापर अशा कारणांमुळे गोदामाईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून, पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. या विषयी समाजप्रबोधन करून या कार्यक्रमातून जागृती निर्माण करणे हा संस्थेचा उद्देश आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

पत्रकार परिषदेस सुलेखनकार अच्युत पालव, कार्यक्रमाचे संयोजक अ‍ॅड. अजय निकम, अविनाश बोडके, गणेश भोरे, प्रशांत कदम, हर्षद मटकर, तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, अथर्व मोशन पिक्चर्सचे प्रमोद गोरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समता परिषदेच्या बैठकीत भुजबळांबाबत चिंता

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप समता परिषदेकडून होत आहे. याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यकार्यकारिणी बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला. १ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय समता परिषदेचा २५ वर्धापन दिन आहे त्यांचे नियोजन करण्यासाठी रविवारी वर्धा सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे, आमदार जयवंत जाधव, रवींद्र पवार, पार्वती शिरसाठ, शिवजीराव नलावडे, डॉ. डी. एन. महाजन, प्रा. दिवाकर गमे, अॅड. बाबुराव बेलसरे, अॅड. सुभाष राऊत, अंबादास गारुडकर, किशोर कन्हरे, प्रितीश गवळी, सुशीलकुमार जाधव, डॉ.संजय गव्हाणे, बाळासाहेब कर्डक, मनोज घोडके, विनायक डहाके, नीलकंठ पिसे, दत्ता खरात, आदींसह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीत निशुल्क सभासद नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, डॉ. कैलास कमोद, बापू भुजबळ, अॅड. बाबुराव बेलसरे, दत्ता घाडगे, पार्वतीबाई शिरसाठ आदींनी मनोगत व्यक्त केले.

मराठवाड्यात मेळावा

राज्य व केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती सुरू करून त्यांना ती लवकरात लवकर देण्यात यावी. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतील संघटनात्मक बदल करून संघटना मजबूत करणे, ओबीसींच्या प्रश्नावर जिल्हा पातळीवर मोर्चे, आंदोलने, निदर्शने करण्यात यावीत याबाबत ठरावही या बैठकीत मांडण्यात आले. दरम्यान १ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला २५ वर्ष पूर्ण होत असून, रौप्य महोत्सवी वर्षाच्या तयारीसंबंधी चर्चा करण्यात आली. हा मेळावा मराठवाड्यात घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकले हरखले अन् पालक भारावले...

0
0

श्री गणरायाला कुणी लंबोदर म्हटलेय, तर कुणी गजवक्र. गणेशाची जेवढी नावे तेवढीच रुपे. विघ्नहर्त्याची अशी नानाविध रुपे साकारण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स आणि लायन्स क्लबच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमुळे बच्चेकंपनीला रविवारी मिळाली. शिल्पकार आनंद तांबट यांनी चिमुकल्यांना मूर्ती बनविण्याच्या टिप्स दिल्या. त्यानुसार बाप्पांची मूर्ती स्वतः साकारताना हे चिमुकले हरखून गेले होते. पालकांनी त्यांना मार्गदर्शन करतानाच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. चिमुकल्यांच्या नाजूक हातांनी गणेशाची लोभसवाणी मूर्ती साकारली जात असताना पालकही भारावल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनचालकांना दणका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक शाखेने मागील १८ महिन्यांत तब्बल ७८ लाख २१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. या दरम्यान तब्बल ५८ हजार ५२१ वाहने ‘टोइंग’ करण्यात आली.

शहरात काही प्रमुख रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. वर्दळीच्या भागात ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनते आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने हटवण्यासाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये टोइंग व्हॅन सुरू करण्यात आल्या. दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्याचे काम सुरू झाले. मात्र, ही पद्धत तितकी फायद्याची ठरली नाही. विशेषतः एमजी रोड, शरणपूर रोड, तसेच सिटी सेंटर मॉल रस्त्याशिवाय ही यंत्रणा कुचकामी ठरली. तरीही २०१६ मध्ये टोइंग व्हॅनद्वारे ४०,६४८ वाहने हटवण्यात आली. याद्वारे ४४ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २,२११ चारचाकी वाहने टोइंग करीत दोन लाख ३४ हजार ३०० रुपयांचा दंड वाहतूक शाखेने संकलित केला. २०१७ मध्ये जुलैपर्यंत १५ हजार ५१७ दुचाकी चालकांवर कारवाई करीत ३० लाख ८८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुसरीकडे याच वर्षात फेब्रुवारीमध्ये चारचाकी वाहने उचलण्याचे काम बंद करण्यात आले. या दोन महिन्यांत फक्त १४५ चारचाकी वाहनांवर कारवाई झाली. अशास्त्रीय पद्धतीने चारचाकी वाहने हटवण्यात येत असल्याने हे काम आजमितीस बंदच आहे. दरम्यान, हा ठेका रद्द करीत पोलिसांनी आधुनिक पद्धतीची १२ वाहने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची टेंडरप्रक्रिया सुरू असून, टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत ३ ऑगस्टपर्यंत होती. आता ही मुदत ११ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. साधारणतः या महिन्याअखेरपर्यंत नवीन यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नवीन टोइंग वाहने अॅटोमॅटिक असून, त्याद्वारे दुचाकी, चारचाकी आणि तीन चाकी वाहने हटवता येणार आहेत. हटवण्यात येणाऱ्या वाहनांचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ शूटिंग काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवराय’चा युनिक उपक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या शिवराय ढोल पथकाने ५१ श्लोक ६४ कला, ५१ तालात, तीनशे वादकांद्वारे रविवारी केलेल्या पाच विश्वविक्रमांमागे तीन महिन्यांचा सराव आहे. या उपक्रमाचा प्रस्ताव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वंडर बुक्स ऑफ रेकॉर्ड लंडन, वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांना पाठवल्यानंतर या संस्थांच्या प्रतिनिधींनी हे वादन युनिक असल्याचे सांगून हजेरी लावण्याचे निश्चित केले. या उपक्रमाचा सराव गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होता. ढोल पथकात ६० टक्के महिला, तर ४० टक्के पुरुष होते. यातील वादक हे इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील असे उच्च विद्याविभूषित आहेत.

गणेशोत्सवात सादरीकरण

गणेशोत्सवानिमित्त ५१ तालांचा नैवेद्य बाप्पाला देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डीजे आणि ढोलपथकांची अनोखी जुगलबंदी नाशिककरांना पाहायला मिळणार आहे. असा प्रयोग भारतात प्रथमच सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक वाद्यांबरोबर ढोल पथकाचा स्टेज शोदेखील सादर होणार आहे. यात सुशीर वाद्य, तंतुवाद्य, त्याचप्रमाणे तालवाद्यांचा समावेश असेल. या वाद्य पथकाची सुरुवात ११ जानेवारी २०१६ रोजी झाली होती. सुरुवातीला ४० वादकांची संख्या असलेले पथक आता ३५० वादकांवर येऊन पोहोचले आहे. या पथकाने जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही आपले वादन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावचे पोलिस निरीक्षक निलंबित

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील शहर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षकपदी नियुक्त असलेले व तत्कालीन तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांना विविध गुन्ह्यांच्या तपासात बेशिस्त, बेपर्वाई व बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी पोलिस महानिरीक्षक व्ही. के. चौबे यांनी सेवेतून निलंबित केले आहे.

तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी असताना बडगुजर यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासात आरोपींना मदत करणे, न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल न करणे, गुन्हा विलंबाने दाखल करणे अशी कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मालेगावचा रहिवासी असलेले सागर प्रल्हाद हिरे याने बडगुजर यांच्या जाचाला कंटाळून पोलिस महासंचालकांच्या दालनाबाहेर विषप्राशन करून आत्पहत्येचा प्रयत्न केला होता. या संबंधीचे सविस्तर वृत्त ‘मटा’ने ४ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या प्रकरणी बडगुजर यांचा निलंबन आदेश काढण्यात आला असून, त्यात गेल्या वर्षीच्या चार वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्यांनी कामात कसूर करून गुन्हेगारांना मदत केल्याचे आढळून आले आहे.

सागर हिरेचे प्रकरण भोवले

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा सागर हिरे याचे वडील प्रल्हाद हिरे व चुलते दादाजी हिरे यांच्यात जमिनीवरून वाद होते. या वादातूनच सागरवर चाकू हल्ला झाल्याची घटना ६ जुलै २०१६ रोजी घडली होती. याबाबत सागरने येथील तालुका पोलिस ठाण्यात दादाजीविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, त्याला १३ ऑगस्ट रोजी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नेले असता त्याच्याविरुद्ध दादाजी यांनी सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे होता. त्यांनी सागरकडून या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यावर सागरने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतरही त्याच्यावर दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतरही तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी झाल्याने अखेर सागरने पोलिस महासंचालकांकडे दाद मागण्यासाठी मुंबई गाठले होते. अखेर या प्रकरणासह अन्य प्रकरणांतील बेशिस्त आणि बेपर्वाईमुळे बडगुजर यांना निलंबित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविकांचा पूर आटला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरवर्षी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी शिवभक्त तिसऱ्या श्रावणी सोमवारची आतुरतेने वाट पाहतात. परंतु, यंदा या फेरीसाठी तीर्थक्षेत्र त्र्यंबकनगरीत दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारीच नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा सण असून खंडग्रास चंद्रगहणदेखील आहे. त्यामुळे यंदा फेरीकडे बहुतांश भाविकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळाले.

त्र्यंबकेश्वरचा परिसर हिरवाईने नटला आहे. पुरेसा पाऊस झाल्याने शेती बहरली आहे. अशा निसर्गरम्य वातावरणातच श्रावणातील सोमवारी ब्रह्मगिरीला फेरी मारण्याचा योग चालून येतो. ही फेरी म्हणजे महादेवाच्या भक्तांसाठी अभूतपूर्व पर्वणी ठरते. त्यामुळे भाविक या पर्वणीची आतूरतेने वाट पाहत असतात. या पर्वणीसाठी यंदा पाच लाख भाविक येतील असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, हा अंदाज फोल ठरला आहे. यंदा या पर्वणीला तुरळक गर्दी असल्याचे पहावयास मिळाले. रविवारी सायंकाळपासूच खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वर रोडवर अडविण्यास सुरूवात झाली. ही वाहने पार्कींगसाठी ठरलेल्या जागेवर उभी करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जाते. परंतु यंदा गर्दी खूपच कमी असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. बसद्वारे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्याही तुलनेने कमी असल्याचे पहावयास मिळाले.

बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला राखी पोर्णिमेचा सण यंदा तिसऱ्या श्रावणी सोमवारीच (दि. ७ ऑगस्ट) रोजी आहे. या सणानिमित्त बहिणी माहेरी येतात किंवा भाऊ बहिणीकडे जातो. या कौटुंब‌िक जबाबदारीला प्राधान्य देत बंधुरायांनी यंदा फेरीकडे पाठ फिरविली. सोमवारी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहणात शक्यतो बाहेर जाणे टाळले जाते. त्यामुळेही भाविकांची संख्या यंदा रोडावली असेल, असे बोलले जात आहे.

श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी तसेच ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी लोक खासगी वाहने घेऊन ‌त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होतात. परंतु, त्र्यंबकेश्वरपासून पाच-दहा किलोमीटर अलीकडेच ही वाहने पोलिसांकडून थांबविली जातात. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून घेतली जाणारी ही खबरदारी भाविकांना अतिरेक वाटू लागली आहे. त्यामुळेच भाविकांनी यंदा गर्दी केली नसल्याचे त्र्यंबकेश्वरमधील स्थानिकांचे म्हणणे आहे.

फेरीसाठी जादा बसेस
नाशिकहून तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळा बसस्थानकावर रविवारी गर्दी होती. शहरात सर्वत्र फ्रेंडशिप डेचा फिव्हर असल्यामुळे तरुणाई रस्त्यावर होती. तर शिवभक्त त्र्यंबकेश्वरला फेरीसाठी सकाळपासून बसने रवाना होत होते. राखी पौर्णिमा व तिसरा सोमवार एकत्र आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तीनशेहून अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळा बसस्थानकावरुन १५० बसेस ठेवण्यात आल्या आहेत. नाशिकरोड, निमाणी येथून २५ बसेसची व्यवस्था आहे. रविवारीही या बसस्थानकावर गर्दी होती. पहिल्या व दुसऱ्या सोमवारी गर्दीचे प्रमाण कमी असल्यामुळे बसेसची संख्या कमी होती. पण तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या गर्दीमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गर्दी वाढल्यानंतर या स्थानकारुन सिटी बसेसचे नियोजन केले आहे. रक्षाबंधनमुळे काही शाळांनी सुट्टी जाहीर केल्यामुळे शहरातून धावणाऱ्या सिटी बस त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहेत.

प्रवाशांच्या प्रतीक्षेत बस

त्र्यंबकेश्वर ः तिसऱ्या सोमवारच्या ब्रह्मगिरी फेरीसाठी पाच लाख भाविक दाखल होतील, अशी आशा फोल ठरण्याची शक्यता आहे. शहरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. तुरळक संख्येने भाविक येत होते, तर नवीन बस स्थानकावर बस प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दिसून आल्या. सायंकाळी भाविकांचा ओघ सुरू झाला, मात्र पाच लाख भाविकांचा प्रशासनाने केलेला अंदाज पोकळ असल्याचे स्पष्ट झाले.

तिसरा सोमवार असल्याने ब्रह्मगिरी फेरीनिम‌ित्त होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खंबाळे येथे रविवारी सकाळपासून खासगी वाहने अडविण्यास सुरुवात झाली. तळेगाव (अं) येथूनच वाहने खंबाळा पार्किंगकडे वळविण्यात येत होती. येथे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. तिसरा सोमवारबाबत काहीही कल्पना नसलेल्या परप्रांतीय भाविकांची मात्र चांगलीच दमछाक झाली. अनेकांनी खंबाळ्याच्या माळरानावर बेवारस वाहने उभी करण्यास नकार देऊन नाशिकच्या दिशेने टर्न घेतला.

भाविकांना जादा भाड्याचा भुर्दंड

दोनशे रुपयांच्या इंधनात नाशिक-त्र्यंबक प्रवास करणे भाविकांना खासगी वाहनाने शक्य होते. खंबाळे येथे वाहन पार्क केल्यानंतर ५० रुपये, पाच प्रवासी असल्यास त्र्यंबकपर्यंत प्रत‌िप्रवासी २० रुपये असे शंभर रुपये आणि परतीसाठी पुन्हा शंभर रुपये असा अडीचशे रुपयांचा भुर्दंड भाविकांना बसला. बसभाडे वीस रुपये घेण्याचे प्रयोजन काय असा सवाल जिल्हा प्रवासी महासंघ अध्यक्ष नरेंद्र पेंडोळे यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी नगरपालिकांच्या सेवासुविधांबाबत आढावा घेऊन मागर्दशन केले. तीर्थराज कुशावर्तावर प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था याबाबत पाहणी केली असता दुपारपर्यंत सर्वसज्जता झालेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईने जपले मैत्रीचे बंध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा ‘फ्रेंडशिप डे’ तरुण-तरुणींनी रविवारी उत्साहात सेलिब्रेट केला. आपल्या मित्रांसोबत फिरायला जात, फोटोसेशन करत या दिवसाची मजा लुटली. फ्रेंडशिप बँड, चॉकलेट्स, गिफ्ट्स एकमेकांना देत आपल्या प्रिय मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देण्यात या दिवसानिमित्त देण्यात आल्या. सोशल मीडियावरही मित्र मैत्रिणींना फोटोज् टॅग करुन फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्यात आला.

कॉलेजियन्समध्ये फ्रेंडशिप डेची विशेष उत्सुकता असते. ऑगस्ट महिन्याचा पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. आपल्याकडेही या दिवसाचे आतुरता कॉलेजियन्समध्ये असते. यंदाही उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. विविध प्रकारचे बँड, रिबिन्स, चॉकलेट्स, गिफ्ट्सनी फुललेल्या मार्केटमधून खरेदी करण्यास तरुणांनी पसंती दिली. एखाद्या मित्र मैत्रिणीसोबत भांडण झालेले असो किंवा अबोल असो, हे सगळं विसरुन त्या मित्राशी पुन्हा नाते जोडण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरला.

आउटिंगला पसंती

मित्र मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाण्यास नाशिककर तरुणांनी पसंती दिली. बापू पूल, कॉलेजरोड, बॅकवॉटर, कॅफेज् अशा ठिकाणी आउटिंगला जाण्याचे प्लॅन आखले होते. एक दिवस केवळ फ्रेंडशिपसाठी म्हणत मित्र-मैत्रिणींसोबत हा दिवस धमाल करीत साजरा करण्यावर भर दिला गेला.

सोशल साइट्सवर सेलिब्रेशन

कोणताही सण किंवा स्पेशल दिवस असल्यावर हल्ली अनेकजण सोशल साइट्सवर त्याविषयी पोस्ट्स टाकत असतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानेही अनेकांनी सोशल साईट्सचा आधार घेतला. आपल्या मित्र मैत्रिणींना टॅग करुन शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या ग्रुपसोबत काढलेला सेल्फी, मित्रांसोबतचे जुने फोटोजही अनेकांनी शेअर करत मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही आंदोलनकर्ते आहोत गुन्हेगार नाही’

0
0

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांचा ठिय्या

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आम्ही आंदोलन करणारे आहोत, गुन्हेगार नाहीत, तुमचे तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने वागवतात का? आम्ही तर शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत, असे अनेक प्रश्न पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी शनिवारी (दि. ५) जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना विचारले.

यावेळी जिल्हाधिकारी आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याने सोनवणे आणि कार्यकर्ते हे थेट जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या दालनातच ठिय्या आंदोलनाला बसले, यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

शनिवारी (दि. ५) पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे हे शेतकऱ्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी, पोलिस बोलावण्याची भाषा आणि आम्हाला आत टाकण्याची भाषा करू नका, आत्महत्या करण्यापेक्षा जेलमध्ये राहिलेले काय वाईट? शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना तत्काळ बोलवा अशा प्रश्नांचा मारा जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यावर करीत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आंदोलन कर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी स्टेट बँकेचे अधिकारी माझ्या अधिकार कक्षेतील नसल्याने त्यांना बोलावता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर शानाभाऊ सोनवणे यांनी तुमच्या अधिकार कक्षेत नसले तरी तुम्ही विनंती केली तर ते नक्कीच येतील, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐकतील, तुम्ही त्यांना बोलवाच असा आग्रहही शानाभाऊ सोनवणेंनी यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे धरला.

यानंतर जिल्हाधिकारी आपली मागणी मान्य करीत नसल्याने शानाभाऊंसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी दालनातच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी दालनात आंदोलन करता येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितल्यानंतर वातावरण आणखीनच तणावपूर्ण बनले.

आंदोलनकर्त्यांनी यावर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत, तो आमचा अधिकार आहे, तुम्ही तो हिरावून घेऊ शकत नाहीत असे सांगितले. जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी आंदोलनकर्तेे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना बोलवितो, असे सांगितले. मात्र हे ऐकूनही आंदोलन करणारे आणखीन आक्रमक होऊन आम्हाला जेलमध्ये पाठवा, काही फरक पडणार नाही. आत्महत्या करण्यापेक्षा जेलमधील जीवन जगण्यात काही वाईट नाही, असे त्यांनी जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना सांगितले. दरम्यान, काही वेळातच त्याठिकाणी पोलिस दाखल झाले. तसेच जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनीही शांततेच्या मार्गाने सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन शानाभाऊ सोनवणे आणि कार्यकर्त्यांनी मागे घेतले. आणि या आंदोलन नाट्यावर पडदा पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांनी साकारली लंबोदराची विविध रुपं!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाप्पा सर्वांचाच लाडका… त्याची विविध रुपं मनाला मोहिनी घालणारी.. परंतु, बाप्पाची मूर्ती बाजारातून खरेदी करण्यापेक्षा आपणच आपल्या हातांनी ती साकारण्याचा आनंदच वेगळाच. भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या हातांनी जेव्हा मातीच्या गोळ्यातून गणरायाची मूर्ती साकारली, त्यावेळी अबालवृध्दांच्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या त्या जणू ‘आनंदाचे डोही आनंद तरंगच’.

महाराष्ट्र टाइम्स आणि लायन्स क्लब पंचवटीच्या वतीने खुटवडनगर परिसरातील माहेरघर मंगल कार्यालयात शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने बच्चे कंपनीने हजेरी लावली. कुणी आजी-आजोबांसमवेत आले, तर कुणी आई-बाबांसमवेत. शिल्पकार आनंद तांबट यांनी ‘वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ’ या मंत्राने या कार्यशाळेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर चिमुकल्यांना सहजगत्या समजेल अशा सोप्या भाषेत गणपती मूर्ती बनविण्याच्या टिप्स सांगितल्या. कोन, लंबगोल, दंडगोल असे आकार वापरून मूर्ती कशी बनविता येते याचे प्रात्यक्षिक यावेळी तांबट यांनी दाखविले. पहिल्यांदाच शाडू माती हाती घेणारी बच्चेमंडळी काही मिनिटांतच गणेश मूर्ती बनविण्यात तल्लीन झाली. कार्यशाळेत प्रवेशताना बच्चेमंडळीच्या मनाला नाना शंकांनी घेरले होते. परंतु, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर देऊन तांबट यांनी शंकांचे निरसन केले. लहान मुलेच नव्हे तर त्यांचे पालकही गणरायाची विविध रुपे साकारण्यात रममाण झाल्याचे पहावयास मिळत होते. गणपतीचे हात, डोळे, चेहरा बनविणे तसे आव्हानात्मक काम असते. परंतु, तांबट यांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठीवर असलेला कौतुकाचा हात यामुळे प्रत्येकाने आपल्या मनातील बाप्पाची मूर्ती प्रत्यक्षात साकारली.


पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविणे हा अबालवृद्धांना अत्यंत आनंद देणारा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या आयोजनात लायन्स क्लबचे वैद्य विक्रांत जाधव, राजेश कोठावदे, अविनाश शिरोडे, डॉ. नील‌िमा जाधव, प्रवीण जयक्र‌िष्णीया, अरुण अमृतकर, अभय नेरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. लायन्सचे पुण्याहून आलेले हेमंत नाईक, राजेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


मी दुबईजवळील मस्कतमध्ये राहतो. शाळेला सुटी असल्याने येथे आजी-आजोबांकडे आलो होतो. गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी झाल्याने मला या सुटीत खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन शिकायला मिळाले. उद्या आईसमवेत मस्कतला जाणार असून, तेथील मित्रांशी हा अविस्मरणीय अनुभव नक्की शेअर करेन.

- अवनीश आफळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यातही टँकरने पाणी

0
0

वरुणराजाने पाठ फिरवल्याने गावे अन् वाड्यांवर पाणीपुरवठा

म. टा. वृत्तसेवा, येवला

तहानलेल्या येवला तालुक्याच्या झोळीत गतवर्षी भरभरून पावसाचे दान टाकणाऱ्या वरुणराजाने यंदा पाठ फिरवल्याने तालुक्यातील बळीराजाला उभारी घेतलेल्या खरीप पिकांची काळजी लागली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील अर्धा कालावधी उलटून गेल्यानंतरही अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. श्रावणातल्या रिमझिम श्रावणसरीदेखील पडत्या होत नसल्याने तालुक्यासमोरील संकट गडद बनले आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यातही पावसाअभावी तालुक्यातील १४ गावे अन् दोन वाड्यांची तहान शासकीय टँकरद्वारे भागवावी लागत असल्याचे चित्र आहे. येवला तालुक्याचे एकूण सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४८९ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत अद्याप तालुक्यात निम्मादेखील पाऊस झालेला नाही.

गेली काही वर्षे लागोपाठ दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या येवला तालुक्याला तीन ते चार वर्षांच्या कालखंडानंतर गतवर्षी वरुणराजाची साथ लाभली होती. यंदाच्या पावसाळ्यात अद्यापपर्यंत मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेत शिवारातील खरीप पिकांसमोरील संकट उभे राहिले आहे. तालुक्यात जून महिन्याच्या पावसात काही ठिकाणची पेरणी मार्गी लागली होती. तर काही ठिकाणी नंतरच्या पावसात पेरण्या झाल्या होत्या. मात्र, जुलै महिन्याच्या मध्यानंतर वरुणराजाची तालुक्यावर म्हणावी तशी कृपादृष्टी न झाल्याने खरीप पिकांना बऱ्याच अंशी झटका बसला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना देखील टँकरने पाणी द्यावे लागत होते. मात्र या भागातील बंधारे पालखेडच्या पिण्याच्या पाणी आवर्तनातून भरून देण्यात आल्याने टँकर बंद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोडण्यात आलेल्या पालखेडच्या पाण्याने तालुक्याच्या पूर्व भागातील नारंदी नदीवरील २२, कोळगंगा नदीवरील सर्वच लहानमोठे बंधारे नुकतेच भरले आहेत. परिणामी या भागातील तहानलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या तालुक्यातील पूर्व भागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ वरील बंधारेदेखील पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये आता भरून मिळणार आहेत. याशिवाय कालव्याच्या तालुक्यातील हेडवरील बंधारेदेखील भरून मिळणार असल्याने तहानलेल्या येवला तालुक्याला दिलासा मिळणार आहे.

पालखेडने पिकांना थोडा दिलासा

पाण्याअभावी मक्याची पोटरी धरू पाहणारी कणसे पोकळ तर राहणार नाहीत ना?, हा प्रश्नदेखील बळीराजाला पडला आहे. पावसाने धरलेला रुसवा तत्काळ न सोडल्यास मका, कापूस, सोयाबीन अशा सर्वच पिकांची उत्पादकतादेखील घटण्याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. पालखेड डाव्या कालव्यामार्फत तालुक्यातील ठिकठिकाणचे बंधारे नुकतेच भरून दिले जात आहे. या कालवा तसेच काही छोट्या नदींमार्फत बंधाऱ्यांमध्ये पाणी दिले जात असल्याने पालखेड वहनमार्गावरील परिसरातील विहिरींचा जलस्रोत उंचावून काही भागातील खरीप पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. मात्र, पालखेडचे पाणी न फिरलेल्या अर्थातच ‘नॉन कमांड’ परिसरामध्ये संकट कायम आहे. तालुक्यातील जनता वरुणराजाने पावसाचे भरभरून बरसावे, गायब झालेल्या श्रावणसरींनी फेर धरावा, अशी आस ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटायझेशनचा बदल स्वीकारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेअर बाजाराला घाबरू नका आणि अधिकृत शेअर ब्रोकरमार्फतच व्यवसाय करा. देशामध्ये आर्थिक चळवळ सुरू झाली आहे; पण त्यासाठी देशातील जनतेची साथ असावी. कारण देश डिजिटलकडे वळत आहे. त्यामुळे आपणसुद्धा बदलायला हवे, असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.

एलकेपी, सीडीएसएल आणि बजाज ऑलिअन्सतर्फे ‘शेअर बाजाराचा दृष्टिकोन २०१७-१८ आणि यापुढील दिशा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ठाकूर बोलत होते. नाशिककरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रारंभी विश्वनाथ बोदडे, गौरव बिस्सा, रजनी तांडेल यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. ठाकूर म्हणाले, की सीडीएसएलच्या माध्यमातून सर्व माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचली जाते. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही भीती न बाळगता शेअर बाजारात व्यवहार करावेत. खंत हीच वाटते, की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा सीडीएसएल माहीत नाही. गुंतवणूकदारांसाठी सीडीएसएलच्या माध्यमातून चांगली सुरक्षा घेतली जाते. शेअर बाजाराला भविष्यातसुद्धा चांगले दिवस आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केट खाली येते, तेव्हा तेव्हा आपण आपली गुंतवणूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलीच पाहिजे. शेती आणि शेतीसाठी लागणारी अवजारे, ट्रॅक्टर, टू व्हीलर, मीडिया, ग्राहकांना लागणाऱ्या वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या, चप्पल, बूट, दळणवळण, लॉजिस्टिक कंपन्यांना भविष्यात चांगले दिवस असतील, असेही ते म्हणाले.

बचत साक्षर होण्याची गरज

या वेळी एलकेपीचे सहउपाध्यक्ष विश्वनाथ बोदडे म्हणाले, की आज आपण बघतो आहे, जनता कर्जमाफी मागते आहे. मुलींचे लग्न होत नाही किंवा शिक्षण थांबते. याला मुख्य कारण म्हणजे जनतेमध्ये आर्थिक साक्षरतेचे वातावरण नाही. म्हणजेच भारतीय जनता बचतीबद्दल साक्षर नाही. त्यासाठीच हे कार्यक्रम घेतले जातात. ज्याप्रमाणे आपल्या देशात आर्थिक चळवळ सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आपण आपल्या अर्थव्यवस्थेकडे वेधून घेतले आहे. भारतीय अर्थव्यवस्था बदलत आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या गुंतवणुकीचा मार्ग बदलला पाहिजे. जुन्या पद्धतीचे गुंतवणूक प्रकार बदलून त्या वातावरणानुसार गुंतवणूक करावी.

एलकेपीचे संशोधक गौरव बिस्सा म्हणाले, की ज्याप्रमाणे विदेशी वित्तीय संस्था आता आपले मार्केट विदेशी संस्थांवर अवलंबून नाही. भारतीय वित्तीय संस्थांचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंडाद्वारे आणि भारतीय गुंतवणूकदारांकडून चांगली गुंतवणूक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेततळ्यामुळे बहरली फळबाग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरली आहे. चांदवड तालुक्यातील दिघवद येथील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी आपल्या शेतात शेततळे बांधल्याने आणि सूक्ष्म सिंचनाची सुविधा केल्याने त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गांगुर्डे आणि त्यांचे दोन भाऊ साडेबारा एकरावर शेती करतात. बोअरवेलच्या माध्यमातून मका आणि सोयाबीनची पारंपरिक शेती करण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे उत्पादनही मर्यादित होते. मात्र गेल्या वर्षी शेततळ्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यावर शेतीत परिवर्तन झाले. पेरू आणि द्राक्षबागेचे क्षेत्र वाढले.

गांगुर्डे यांनी आपल्या शेतात ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे बांधले आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून ४७ हजार ५०० रुपये अनुदान मिळाले. या शेततळ्याची क्षमता एकूण ३२ लाख लिटर एवढी आहे. पाणी उपलब्ध झाल्यावर त्यांनी दीड एकरातील पेरूच्या बागेपर्यंत आणि चार एकर द्राक्षबागेला पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. संपूर्ण शेतात ठिबक सिंचनाची सुविधा करून त्याच्या अनुदानासाठीदेखील त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे. ‘उन्नत शेती’ अभियानांतर्गत सहा एकर क्षेत्रावर सोयाबीनचे प्रात्यक्षिकही कृषी विभागामार्फत करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. पवार यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरल्याचे गांगुर्डे सांगतात.

या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून गांगुर्डे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न १८ लाखांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या बागेतील पेरू मुंबईच्या बाजारपेठेत, तर द्राक्षे स्थानिक बाजारपेठेत पाठविली जातात. सिंचन सुविधेमुळे द्राक्ष आणि पेरूच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे ज्ञानेश्वर सांगतात. यंदा उन्हाळी कांद्यातून एक लाख मिळविल्यावर पुढच्या वर्षी भाजीपाला घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त करून दाखविला. शाश्वत सिंचन सुविधेमुळे शेतात झालेले परिवर्तन इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शक ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर व पोलिस प्रशासनावर दगडफेक केल्यावरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ते गुन्हे मागे घेण्याची विनंती आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

धुळे व साक्री तालुक्यासाठी वरदान ठरलेला अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिंचन विभागाला सूचना कराव्या आणि डाव्या कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळून पिकांचे नुकसान होऊ नये, असा प्रयत्न शेतकऱ्यांचा होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन व सिंचन विभागाला निवेदने देण्यात आली होती.

मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २० सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कालव्यातून पाणी सोडावे यासाठी आंदोलन केले. प्रशासनाला निवेदन दिले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्याबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतांना अज्ञात लोकांनी प्रवेश करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक सुरू केली. या प्रकाराचे सर्व खापर शेतकऱ्यांवर फुटले आणि आंदोलन करणाऱ्यांपैकी ७९ शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... आणि ग्रुमिंग झाले सुरू

0
0

नाशिक प्लस टीम
‘डिस्को डिस्को बोले सारी रात सजना..., बॉयफ्रेंड बना ले इसको तू पटा लें..., हाय हिल दे नचें...’ या वेस्टर्न स्टाइल गाण्यांच्या ठेक्यावर रॅम्पवॉक करत ‘मटा श्रावणक्वीन’ स्पर्धेच्या ग्रुमिंग सेशनचा पहिला दिवस रंगला. हाय हिल्स आणि रॅम्पवॉकचा कसून सराव घेत प्रसिद्ध कोरिओग्राफर नवीन तोलानी यांनी पहिल्या दिवसाच्या ग्रुमिंग सेशनची सुरुवात केली. मॉडेल, अभिनेत्री होण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करायला हवीत, याच्या ट‌िप्स स्पर्धकांना देण्यात आल्या.
नवीन डान्स अकॅडमी आणि फिटनेस लाऊंज स्टुडिओमध्ये ‘श्रावणक्वीन’ची ग्रुमिंगची प्रॅक्ट‌िस दिमाखात सुरू झाली आहे. दैनंदिन आयुष्यात स्वतःला सिद्ध करणं फार महत्त्वाचं असतं. तुमचे पहिले इम्प्रेशन्स समोरच्यांचं मन जिंकतं. सौंदर्यासोबतच तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्याला मोहित करते. अशा अनेक टिप्स देत स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवत ग्रुमिंग सेशनची सुरुवात झाली. अभिनेत्री किंवा मॉडेल होण्यासाठी वेळ पाळणे महत्वाचे असते. आत्मविश्वासच तुम्हाला जिंकवून देतो. रॅम्पवरच्या स्टेप्स या परफेक्ट असाव्यात. रॅम्पसाठी हिल्स तुम्हाला कम्पर्टेबल असायला हव्यात. तुमचा कम्फर्ट झोन ओळखून तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करायला हवे. स्वतःला कसे प्रेझेंट करतात यावर रिझल्ट अवलंबून आहे. यासोबतच परिक्षकांना सामोरं जातांना प्रश्नांची उत्तरं हजरजबाबीपणे देता यायला हवी. सेल‌िब्रेटी होताना उक्तृष्ट पर्सनालिटीसाठी स्वतःकडे गांभीर्याने बघायला शिका. अशा अनेक टिप्स देत रॅम्पसाठीची माहिती स्पर्धकांना मिळाली. नाशिकमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये एकूण १५ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. आता ‘श्रावणक्वीन’च्या झळाझळत्या मुकुटासाठी त्यांच्यात स्पर्धा रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदिजनांच्या विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असते. स्पर्धेच्या युगात जगाशी सामना करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणही आवश्यक आहे. मुक्त विद्यापीठाने या वर्षापासून राज्यातील बंदिजनांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या सहकार्याने बी. ए. मूल्य आणि आध्यात्मिक पदवी शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या बंदिजनांना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, तुरुंग अधिकारी वामन निमजे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर, संतोष कोकणे, विष्णू राठोड, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे, ब्रह्माकुमारी पुष्पादीदी आणि यशब्रह्माचे नोडल सेंटर अधिकारी विकास साळुंखे होते.

प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, की शिक्षण हे मानवीय सत्याची प्रगती, परिवर्तन आणि प्रेरणा यांचे आधारस्तंभ आहे. शिक्षणाचा खरा आधारस्तंभ मूल्यशिक्षण आहे. मूल्यशिक्षणाच्या आवश्यकतेबद्दल असलेली नवी शैक्षणिक जागृती होताना दिसत आहे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील सर्व कारागृहांत शिक्षणाची ज्ञानगंगा विनामूल्य पोहोचविण्यात येणार असून, बंदिजनांना बाहेर पडल्यानंतर समाजात वावरताना मानसन्मानासोबतच उच्चशिक्षणामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळू शकतील. राजकुमार साळी म्हणाले, की शिक्षण हेच मनुष्याची वैचारिक पातळी किती चांगली आहे हे ठरविण्यास मदत करते आणि त्यामुळे जीवनात लक्ष्यप्राप्ती होते.

या समारंभात ‘सदगुणांची राखी’ हा रक्षाबंधनाचा कार्यक्रमही साजरा करण्यात आला. सर्व बंदिजनांना सदगुणांची राखी बांधण्यात आली. ब्रह्माकुमारी गोदावरीदीदी यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. यशब्रह्मा नोडल सेंटर अधिकारी विकास साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चासाठी नाशिकरोडला रॅली

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईत येत्या बुधवारी (दि. ९) सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे रविवारी बाइक रॅली काढण्यात आली. तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देत या रॅलीद्वारे मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले. सुमारे दीड हजार दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाले होते.

मुक्तिधामजवळील शाळा क्रमांक १२५ येथून सकाळी नऊ वाजता या बाइक रॅलीस प्रारंभ झाला. नितीन चिडे, किशोर जाचक, बंटी भागवत, संतोष सहाणे, विशाल संगमनेरे, शिरीष लवटे, शरद जगताप, श्याम गोहाड, बाजीराव मते, राजेश फोकणे, शिवाजी हांडोरे, शिवाजी भोर, विक्रम कदम, संतोष क्षीरसागर, शिवा ताकाटे, नितीन खर्जुल, विकास भागवत, बंटी भागवत, संतोष हांडोरे, गणेश कदम, विजय जाधव आदींनी नेतृत्व केले.

चेहेडी, जेलरोड आणि शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. ही रॅली नाशिकरोड, दत्त मंदिर, शिखरेवाडी, डावखरवाडी, जय भवानीरोड, खोले मळा, सुराणा हॉस्पिटल, देवळालीगाव, विहितगाव, सौभाग्यनगर, सत्कार पॉइंट, डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, सिन्नर फाटा, बिटको, जेलरोड, दसक, पंचक, राजराजेश्वरी, पवारवाडीमार्गे भगवती लॉन्स येथे आली. तेथे शाहिरांचा पोवाडा झाला. बुधवारच्या मोर्चाबाबत समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. येथील सर्व रस्ते व चौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यात आल्यामुळे परिसर भगवामय झाला होता. रॅलीवेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images