परिसरात गेल्या महिनाभरापासून कोसळत असलेल्या पावसाचा भाजीपाल्यावर चांगलाच प्रभाव पडला आहे. अनेक भाज्यांप्रमाणेच जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या टोमॅटोचे दर सध्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, असे असूनही प्रत्यक्ष बळीराजाला मात्र फारसा फायदा होत नसल्याची स्थिती आहे.
अलीकडच्या काही वर्षांत हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून टोमॅटोकडे बघितले जाते. मात्र, परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसाचा फटका टोमॅटोच्या उत्पादनाला बसला आहे. असंख्य शेतकऱ्यांनी एप्रिल-मेच्या दरम्यान लावलेल्या टोमॅटोचे पिकाचे नेमके फळ लागण्याच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. टोमॅटोच्या रोपांवरील फूलकळी पावसाने झडून गेली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यासोबत बाजारपेठेत आवकही घटल्याने टोमॅटोचे दर दुपटीने वाढून ३० ते ४० रुपये प्रतिकिलोवरून थेट ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मात्र, असे असूनही शेतकऱ्यांना २० किलोंच्या जाळीसाठी केवळ तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फारसा फायदा न होता व्यापाऱ्यांनाच चांगला फायदा होत असल्याची स्थिती आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून टोमॅटो येत आहे.
नाशिकमधील शेतकरी आता आगामी लागवड ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करणार असल्याने ही दरवाढ महिनाभर कायम राहण्याची चिन्हे आहेत. मुंबईसह गुजरात राज्यात मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे व्यापाऱ्यांनी टोमॅटोची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.
सर्वसामान्यांना जरी टोमॅटोसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत असले, तरी शेतकऱ्यांना २० किलोंच्या जाळीसाठी केवळ तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांएेवजी व्यापारीच फायद्यात आहेत.
- बाळासाहेब कडभाने, शेतकरी
विविध भाज्या बनविण्यासाठी व डाळींसाठी टोमॅटो पूरक असल्याने तो वापरण्यावर बहुतांश गृहिणींचा भर असतो. मात्र, आत तोदेखील महाग झाल्याने रुचकर जेवणासाठी अन्य पर्याय शोधावा लागत आहे.
- आशा पाटील, गृहिणी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट