टीम मटा
तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी दिवसभर इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा भागात चांगला पाऊस झाला. याउलट मालेगाव, बागलाण, नांदगाव, देवळा, चांदवड, येवल्यात मात्र अद्यापही पावसाने पाठ फिरवली आहे. कसमादे पट्ट्यात शेतकऱ्यांनी पावसासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
गोदाकाठच्या गावांना अलर्ट
निफाड ः तालुक्यात पावसाचे गुरुवारी रात्रीपासून पुनरागमन झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. गोदावरी व कादवा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी दिला आहे.
या पावसामुळे मका, सोयाबीनला जीवदान मिळाले आहे. तालुक्याती काही भागातील शेतात पावसाचे पाणी शिरले होते. निफाड, विंचुर, लासलगाव, पालखेड, शिरवाडे वणी, सायखेडा, चांदोरी, सुकेणे, पिंपळगाव, कुंदेवाडी, उगाव या भागात संततधार पाऊस झाला. दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या तडाख्यात सापडणाऱ्या सायखेडा पुलाच्या कठड्याला पाणवेली अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह पुलाजवळ मंदावला आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. दारणा आणि गोदावरी नदीला पाणी आल्यामुळे नांदूरमध्यमेशवर धरण ओहरफ्लो झाले आहे.
नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी, दारणा नदीला पूर आला. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीला जायकवाडीच्या दिशेने सकाळी ११ वाजता ३७ हजार ५२१ क्यूसेक, दुपारी १२ वाजता ५० हजार २८ क्यूसेक तर दुपारी एकनंतर २२ हजार ३८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दिंडोरीत पिकांना मिळाले जीवदान
दिंडोरी ः गेल्या पंधरा दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस परतल्याने तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील नदी, नाले वाहू लागले असून, धरणसाठ्यातही वाढ होत आहे. १५ जुलैपर्यंत गतवर्षीपेक्षा निम्माच पाऊस पडल्याने अजूनही शेतकरी चिंतेत आहे.
तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. तालुक्यात पेरण्या पूर्ण आटोपल्या असून, बहुतांश भागात भाजीपाल्याची लागवड झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी खरीप व भाजीपाला पिके संकटात सापडली होती. मात्र या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
दारणा, भाम, वाकी नद्यांना पूर
म. टा. वृत्तसेवा, घोटी
इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. इगतपुरी, घोटी परिसरासह पूर्ण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळे दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. दारणा नदीचे पूरपाणी परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने भात पिकांचे नुकसान झाले. इगतपुरी तालुक्यात २४ तासात १९३ मि.मि. पावसाची नोंद झाली.
त्र्यंबकमध्ये मुसळधार
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुरुवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी वेग कायम ठेवला. शुक्रवारी पहाटे पासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवार सायंकाळपासून ते शुक्रवार सकाळपर्यंत परिसरात १२५ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी सकाळी तेली गल्ली, मेनरोड आदी भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. गटारी नाल्यांतून पाणी बाहेर फेकले जात असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नीलगंगा बाजेने येणाऱ्या प्रवाहात लालमाती वाहून आल्यामुळे मेनरोडवर चिखल झाला होता. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी मनेरोड आणि परिसरात पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली.
चांदवड, नांदगावमध्ये दमदार पावसाची गरज
मनमाड ः शहरासह चांदवड व नांदगाव तालुक्यात पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागात समाधान पसरले आहे. भिजपावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरण्यांचे संकट तुर्तास टळले असले तरी दमदार पावसाची गरत आहे.
कळवणमध्ये संततधार
कळवण ः शहर व तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. लहान मोठ्या धरणांच्या क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १२५.७९ मि.मि. पावसाची नोंद आहे. गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली. कळवण शहरात ५३ मिमि पाऊस झाला असून, तालुक्यातील नवी बेज परिसरात ११, मोकभनगी भागात केवळ तीन मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील आभोणा परिसराती ७५ मिमि, कनाशी ५१, दळवट ६० मिमि पावसाची नोंद झाली आहे. चनकापूर धरणक्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
येवल्यात तुरळक सरी
येवला ः गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने तालुक्यात काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. यामुळे शेतकरी सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले आहे. जूनमध्ये दमदार श्रीगणेशा केल्यानंतर दहा पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळले आहे.
मालेगावात लपंडाव
मालेगाव : गेल्या महिन्यातील जूनच्या दुसऱ्या पंधरवाडापासून शहर व तालुक्यात पावसाने दडी मारली असून, जुलै अर्धा संपला तरीही पावसाचा लपंडाव सुरूच आहे. शहर व तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाचे ढग दिसत असले तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तालुक्यात अनेक गावांतील पेरण्या खोळंबल्या आहेत.
आतापर्यंत सरासरीच्या १०८ मिमि इतका पाऊस झाला असून, गेल्या पंधरा दिवसात फक्त ९ मिमि पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी शेतातील ओलचा अंदाज घेवून पेरण्यांना सुरुवात केल्याने जून अखेर ७५ टक्के पेरण्य पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे. येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर संकट गडद होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट