Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सांडपाण्यावरून वादावादी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात राज्यातून नव्हे तर देशातून कामगार वास्तव्यास आले आहेत. त्यातच सातपूर भागात झोपडपट्टी भागातील संख्याही मोठी आहे. लहान बोळींच्या असलेल्या गल्ल्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग होत असतात. स्वारबाबानगरमधील सांडपाण्याचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला होता. संबंधित महिलांना सांडपाण्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. या झोपडपट्टी भागात किरकोळ कारणांवरून होणारे वाद पोलिसांनादेखील डोकेदुखी ठरत आहेत. स्थानिक नगरसेवकांनी किरकोळ वाद मिटवावे, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सातपूर भागात स्वारबाबानगर, महादेवनगर, प्रबुद्धनगर (सीपीटूल), संतकबीरनगर, संतोषीमातानगर, भीमनगर, कांबळेवाडी व जेपीनगर या भागांचा समावेश आहे. याठिकाणी राहणारे बहुतांश मिळेल ते काम करणारे कुटूंब आहेत. लहानशे घर करून राहणाऱ्या स्लम भागातील कामगारांनी टुमदार घरांची उभारणी केली आहे. यामुळे मोकळे असलेल्या रस्त्यांना बोळीचे रूप आले आहे. एकाने घर बांधले म्हणून दुसऱ्यांनी ते पाहून त्यांचेही घर बांधले. यात मोठे असलेल्या रस्तेच दिसेनासे झाले आहेत. साहजिक अरुंद झालेल्या रस्त्यांवरून सांडपाणी वाहताना घरासमोरूनच जात असते. महापालिकेने स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्थादेखील केली असून, सांडपाण्यावरून होणारे वाद नित्याचेच झाले आहेत.

वाद जागेवर मिटवा

विशेष म्हणजे संबंधित महिलांनी पोलिसांना गुन्हाच दाखल करण्याचा आग्रह धरला. महिलांचा आक्रोश पाहून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. परंतु, स्थानिक नगरसेवकांनी या भागात होणारे वाद जागेवर मिटवण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक सायकलिस्टचे जसपालसिंग यांचे निधन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (वय ३८) यांचे शनिवारी सकाळी सायकलिंग करीत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आजोबा गुरुदेवसिंग, वडील कुलजीत सिंग, काका प्रीतपाल सिंग, एक भाऊ, एक बहीण, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमात शनिवारी ते सहभागी झाले होते. नाशिक-मुंबई महामार्गावर पाथर्डी फाटा येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी विर्दी यांना ताबडतोब जवळील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आपत्कालीन विभागात उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय रुग्णालयात विर्दी यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी सिंग हाऊस, नाईस एरिया, सातपूर येथे ठेवण्यात आला. मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

जसपाल सिंग विर्दी यांच्याकडे नाशिक सायकलिस्टचे सारथ्य आल्यानंतर त्यांनी प्रत्येक महिन्यात एक सामाजिक उपक्रम राबवत सायकलिंगचा प्रचार केला. त्यांच्या अचानक व अवेळी जाण्याने नाशिकमधील सायकलिस्ट समुदायाला मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरपत्रकाची होळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने क‌तिीही दर दिला तरी समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेत संतप्त शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकांची शनिवारी होळी केली. सरकारने जमिनी संपादनाचा प्रयत्न केला तर तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाद्वारे त्यास उत्तर दिले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे समृद्धीचा लढा चिघळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सरकारला जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. परंतु वडिलोपार्जित जम‌निी देण्यास शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने लढा सुरू केला असतानाच शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय जिरायत जमिनींना दिल्या जाणार असलेल्या मोबदल्याचे दरपत्रक जाहीर केले. परंतु सरकार आणि जिल्हा प्रशासन आता पैशांचे प्रलोभन दाखवू लागल्यामूळे शेतकरी संतापले आहेत. दरपत्रक जाहीर झाल्यानंतरची भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी आयटकच्या सीबीएस येथील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीला किसान सभेचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, सोमनाथ वाघ, कचरू डुकरे पाटील, भास्कर गुंजाळ, शहाजी पवार आदी उपस्थ‌ति होते. कुठल्याही परिस्थ‌तिीत सरकारला समृद्धी महामार्गासाठी जमिनी द्यायच्या नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जमले. तेथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, देणार नाही देणार नाही समृद्धीसाठी जमिनी देणार नाही, सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. जमिनी घेण्याचा प्रयत्न केलाच तर स्वत:सह इतरांनाही संपविण्याची तयारी असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.

१२ जुलैपासून गावोगावी बैठका

सरकार आणि जिल्हा प्रशासनाने जमिनींसाठी जाहीर केलेले दरपत्रक अमान्य असल्याचे शेतकरी संघर्ष कृती समितीने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत असे सांगणारे सरकार शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार, असा सवाल आंदोलकांनी उपस्थ‌ति केला आहे. १२ ते १४ जुलै या कालावधीत सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यामुळे समृद्धी विरोधातील लढ्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी संघटीत आहेत. सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादीत करण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये.

- राजू देसले, समन्वयक जमिनी बचाव कृती समिती

सिन्नर तालुक्यातील १५ आणि इगतपुरी तालुक्यातील १६ प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना दरपत्रक जाहीर करणे हा न्यायालयाचा अवमान आहे.

- अॅड. रतनकुमार इचम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् सरपंच मात्र सातवी पास

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्याच्या शैक्षणिक कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थाला नापास करायचे नाही, या निर्णयाची अंमलबजावणी २०१० मध्ये करण्यात आली. हा निर्णय माहिती असूनही सरपंचनिवडीसाठी उमेदवार सातवी पास असणेे अनिवार्य असल्याचा निकष नव्याने लागू केला गेला आहे. या निर्णयाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर सध्या चांगलीच खिल्ली उडविली जात अाहे.

‘आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही आणि सरपंच मात्र सातवी पास असणे अनिवार्य -शासनाचे अभ्यासू धोरण’ या आशयाखाली सोशल मीडियावर सरकारी निर्णयाची टर उडविली जात आहे. एकीकडे राज्यात सर्वच क्षेेत्रांत शिक्षणाला प्राधान्य दिले जात असताना दुसरीकडे संपूर्ण गावाचा कारभार पाहणारा सरपंच फक्त सातवी पास असला पाहिजे, असा निर्णय घेतला गेल्याने सोशल मीडियावर या निर्णयासंदर्भात चांगलीच चर्चा झड आहे. इतर राज्यांप्रमाणेे महाराष्ट्रातदेखील जनतेच्या बहुमताने सरपंच निवडला जावा हा निर्णय योग्य असला, तरीही सरपंचपदासाठी लावण्यात आलेले निकष हे त्या मानाने पटण्यासारखे नसल्याने विनोदाच्या माध्यमातून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बहुतांश नेट यूजर्सनी या निर्णायाची खिल्ली उडविताना त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरजदेखील व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्टेंबरअखेर उड्डाण!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उडान योजनेंतर्गत सप्टेंबरअखेर नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे ही विमानसेवा सुरू करण्याला एअर डेक्कन विमान कंपनीने ग्रीन सिग्नल दिला आहे. नवी दिल्लीत झालेल्या विंग २०१७ सब उडो सब जुडो चर्चासत्रात एअर डेक्कनतर्फे यासंदर्भात आश्वासन देण्यात आले. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राजू, जयंत सिन्हा, हवाई वाहतूक विभागाचे सचिव चोभे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष खुल्लर, केंद्रीय अधिकारी, प्रत्येक राज्यातील विमानतळ व हवाई वाहतूक अधिकारी, विविध विमान कंपन्यांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.

उडान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय सवलती दिल्या जातील याची माहिती प्रत्येक राज्याने दिली. महाराष्ट्राच्या हवाई वाहतूकच्या प्रधान सचिव वत्सला नायर सिंग यांनी महाराष्ट्र सरकार काय सवलती देणार हे सांगितले. त्या म्हणाल्या, की प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत नो एअरपोर्ट चार्जेस, लँडिंग, पार्किंग आणि टीएनएलसी माफ केले आहे. करपात्र मूल्य सेवाकर १० टक्क्यांच्या वर आकारला जाणार आहे. राज्य सरकार मोफत पोलिस आणि अग्निशमन सेवा देणार असून, वीज, पाणी, तसेच इतर सेवादेखील सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. विमान कंपनीतर्फे स्वतः ग्राउंड हाताळणी, एटीएफवर एक टक्का किंवा त्यापेक्षा कमी कर असल्यास त्या राज्य विमानतळासाठी आरसीएस कार्यान्वित होते.


चर्चेअंती झाला निर्णय

प्रधान सचिव नायर, यू. पी. ककाणे, खासदार हेमंत गोडसे व एअर इंडियाचे अधिकारी यांच्यात महाराष्ट्र व नाशिकमध्ये विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. नाशिक हे धार्मिक व औद्योगिकदृष्ट्या कसे आघाडीवर आहे याबाबत विमान कंपन्यांना माहिती देण्यात आली. विमानसेवा सुरू करण्यातील अडचणी सांगण्यात आल्या. नाशिक विमानसेवेसाठी एअर डेक्कनशी खास चर्चा झाली. ‘डीजीसीए’कडे परवानगीची व मुंबईला टाइम स्लॉट मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. नाशिकच्या विमानसेवेसाठी पंधराशे ते अठराशे रुपयांदरम्यान भाडे असेल व सप्टेंबरअखेर विमानसेवा सुरू होईल, असे आश्वासन एअर डेक्कनने दिले.

या कंपन्यांचा सहभाग

चर्चासत्रात एअर एशिया, टाटा सिआ एअरलाइन्स, स्टार एअर, घोडावत एंटरप्राइज, ट्रू जेट, जेट एअरवेज, स्पाइसजेट, झेक्सस एअर सर्व्हिसेस, डेक्कन चार्टस, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट, इंडिगो आणि एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस या दहा विमान कंपन्यांनी सहभाग घेतला. प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी महाराष्ट्राच्या पुढाकाराने ऑगस्ट २०१६ मध्ये एनसीपीएमध्ये आरसीएसअंतर्गत भारत सरकार, एएआय, जीओएम यांच्यात सामंजस्य करार झाला. नाशिक, शिर्डी, जळगाव, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे विमानतळ आरसीएसअंतर्गत राहणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती कळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळा करूया सुकर

0
0

पावसाळा आला, की दर वर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातले दवाखाने हाउसफुल्ल होतात. रोगराई झपाट्याने पसरते. त्याला कारणेही अनेक आहेत. यामध्ये अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात आरोग्य निरोगी राखण्यासाठी घ्यावयाची दक्षता, आहारविहार नियोजन आणि अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या साथरोगांची लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर टाकलेला हा फोकस...

संकलन ः फणिंद्र मंडलिक

--

पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात कचरा साचू न देता रोजच्या रोज स्वच्छता ठेवल्यास रोगराईला निश्चितच आळा बसू शकतो. या कालावधीत सूर्याची किरणे कमी प्रमाणात भूभागावर येतात. त्यामुळे वातावरणात असलेले जीवजंतू नष्ट होत नाहीत. परिणामी रोगराई फैलावते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांची लागण होते. मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डासांची उत्पत्ती जास्त झाल्याने अन्य रुग्णांमध्येही वाढ होते. त्यामुळे पुरेशी दक्षता घेतल्यास जीवजंतू, डासांमुळे फैलावणाऱ्या साथरोगांना आपोआपाच प्रतिबंध होऊ शकतो.

--

पाणी अन् आहाराबाबत राहावे दक्ष

पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचे प्रमाण ‍वाढते. त्यामुळे या काळात सर्वांनी पाणी उकळून पिणेच श्रेयस्कर ठरते. एक चमचा मध व त्यानंतर पाणी, असे सर्वांनी घेतल्यास उपयुक्त ठरू शकते. आजारपणामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे. लिंबाचा व आल्याचा रस टाकून पाणी घेणेही लाभदायक असते.

--

असा असावा आहार

या दिवसांत मधुर आम्ल लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके व उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्यास एक वेळच जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात. पडवळ, भेंडी, वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा आहारात समावेश करावा. मूग, गहू, ज्वारी, कोरडे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर वाढवावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीटही वापरावे. या ऋतूत वेगवेगळ्या खिरी खाव्यात. बेसन लाडू, टोमॅटो व विविध भाजांचे सूप, उकडीचे मोदक, आवळा व कैरीचा मोरवळा याचा उपयोग करावा.

--

हा आहार करावा वर्ज्य

पावसाळ्याच्या दिवसांत कोबी, सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका, सुके तळलेले मासे, मटकी, मिसळ, ब्रेड, फरसाण, नूडल्स, मैद्याचे तळलेले पदार्थ, तसेच उपवासासाठी शेंगदाणे, भगर खाणे टाळावे. अळूची भाजी, सातूचे पीठ खाऊ नये. थंड पाणी पिणे टाळावे.

--

भाज्यांबाबत जरा जपून...

फळभाज्या किंवा पालेभाज्या विकणाऱ्या व्यक्तीला जंतुसंसर्ग झाला असेल, तर त्या फळभाज्या व पालेभाज्यांतून जंतू घरात येतात. हे जंतू अन्न शिजविताना मरतात. ज्या पालेभाज्या न शिजवता कोशिंबीर करण्यासाठी वापरतात त्या भाज्या मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवल्यास त्यातील अमिबा, जियार्डिया इत्यादी जंतू मरतात आणि जंतांची अंडी पाण्यावर तरंगतात. हे मिठाचे पाणी एका लिटरमध्ये सहा चमचे मीठ घालून तयार करावे. हे पाणी फेकून देऊन नंतर भाज्या स्वच्छ पाण्यात धुतल्या, तर जादा मीठही निघून जाते. त्यामुळे गृहिणींनी ही दक्षता घ्यावी. स्वच्छता म्हणजे निर्मळता, निर्जंतुकता, प्रसन्नता, टापटीपता, नीटनेटकेपणा हे लक्षात ठेवावे आणि ते अंमलात आणावे.

--

ही घ्यावी खबरदारी

-

-पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे. घरातील पाणी साचविण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.

-भांड्यातून अस्वच्छ हाताने किंवा अस्वच्छ भांड्याने पाणी घेणे टाळावे. निर्जंतुक केलेल पाणीच वापरावे.

-पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कपडे धुणे, अंघोळ करणे, जनावरे धुणे टाळावे.

-घराभोवती लहान मुलास शौचास बसवू नये. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घ्यावी.

-केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावावी.

-घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवावेत. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये.

-शिळे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. जेवणापूर्वी, शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

-दात, जीभ व तोंड हे अवयव दररोज सकाळी उठल्याबरोबर चुळा भरून नियमितपणे स्वच्छ करावेत.

-नियमितपणे अंघोळ करावी. स्वच्छ कपडे वापरावेत. बोटांची नखे वाढवू नयेत.

-नेहमी उकळलेले दूध प्यावे.

-गृहिणींनी स्वयंपाकापूर्वी, तसेच बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

--

मलेरिया ः कारणे, लक्षणे अन् उपाय

मलेरिया (हिवताप) हा प्रामुख्याने डासांमुळे होतो. अॅनाफिलीस जातीचे डास चावल्यास याची लागण ताबडतोब होते. संक्रमण पसरविण्याच्या अवस्थेतील डास निरोगी माणसास दंश करतो, तेव्हा काही परजीवी त्वचेतील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. तेथून रक्ताबरोबर ते यकृतामध्ये प्रवेश करतात. यकृतामधील पेशींना संक्रमित करून ते पुढील अवस्थेत विकसित होतात. या अवस्थेत ते पेशींना नष्ट करून रक्तप्रवाहात येतात.

--

रुग्णांमधील लक्षणे

थंडी भरून ताप येणे हे मलेरियाचे प्रमुख लक्षण आहे. जेव्हा रक्तपेशी फुटतात, तेव्हा हानिकारक तत्त्वे रक्तात मिसळण्यामुळे थंडी भरून ताप येतो. आजार प्रस्थापित झाल्यावर ही प्रक्रिया दर २४ किंवा ४८ तासांनी होते. औषधे लवकर सुरू केल्यास असा क्रम दिसण्याची शक्यता कमी होते. यकृताला इजा पोहोचल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात कावीळही होऊ शकते. ताप, यकृताला सूज येऊन रुग्णांमध्ये अशक्तपणा येतो. यातील मेंदूचा हिवताप घातक असतो. यामध्ये रुग्ण बेशुद्ध होणे, आकडी येणे आदी त्रास होऊन शेवटी मृत्यूही ओढावू शकतो. रक्तशर्करा कमी होणे, रक्तपेशी प्लेटलेट्ची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. अतितापामुळे गर्भवती स्त्रियांना, तसेच बाळाला धोका संभवतो.

--

प्रतिबंधात्मक उपाय

मलेरिया होऊ नये यासाठी डास न चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साचू न देणे हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे मच्छर प्रतिबंधक औषधे, घराला जाळ्या बसविणे, फवारणी इत्यादींचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते.

--

डॉक्टरांचा सल्ला मोलाचा

एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाला असल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रक्त तपासणीनंतर तो कोणत्या प्रकारचा आहे, त्याचे उपचार ठरतात. म्हणून रक्ताची तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. गुंतागुंतीच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणेच योग्य ठरते. यावर घरगुती उपाय न करता वेळ न दवडता रुग्णाला दवाखान्यात नेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत.

--

सर्व आजारांचे मूळ आहारविहार आणि विचारांत असते. त्यात नियमितता आणि योग्य व्यायामांची जोड असल्यास आजार दूर पळतात. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आजारांचा फैलाव होतो. या कालावधीत प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतल्यास, परिसराची स्वच्छता राखल्यास आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत. या काळात अतितेलकट, जड, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

-वैद्य विक्रांत जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमद्या मनाचा तरुण गेल्याने नुकसान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी (३८) यांचे शनिवारी निधन झाले. अतिशय मनमिळाऊ आणि उमद्या मनाचा हा तरुण नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष झाल्यानंतर या संस्थेला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या निधनाने नाशिककरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत नाशिक सायकलिस्ट असोसिएशन आणि मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

नाशिकची मोठी हानी

कालच आम्ही सोबत होतो. नाशिक कलेक्टरकडे अडीच तास मीटिंग चालली. त्याच्यासारखा प्रेमळ माणूस शोधून सापडणार नाही. असामान्य आणि डिव्होटेड, प्रत्येकाची मदत करणारा, त्याने कधीही कुणाकडेही दुर्लक्ष केले नाही. सर्वांना एकत्र घेऊन चालणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे. नाशिकची ही मोठी हानी झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे. त्याचे स्वप्न होते की नाशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल कॅपिटल बनवायचे. आता नाशिककरांनी हे स्वप्न पूर्ण करायला हवे. तिच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

-डॉ. राजेंद्र नेहते


हृदय हरपले

नाशिक सायकलिस्ट कम्युनिटीचे हृदयच हरपले आहे. नाशिककरांचे मोठे नुकसान झाले. जसपालसिंग खूप प्रेमळ व्यक्ती होता. कुणालाही न सांगता मदत करणारा, कोणत्याही गोष्टीचा कधीही अहंकार त्याने बाळगला नाही. त्याला नाशिककरांना निरोगी राहण्याची सवय लावायची होती. नाशिकला सायकल कॅपिटल करण्याचे त्याचे ध्येय होते. त्याची जागा भरून काढणे अवघड आहे. त्याची मदत करण्याची तऱ्हाच वेगळी होती. आणि हे केवळ जसपालच करू शकत होता. मनमिळाऊ मित्र हरवल्याची भावना आहे.

- डॉ. हितेंद्र महाजन

नाशिक सायकलिस्टचा शिवाजी
जसपाल हा नाशिक सायकलिस्टचा शिवाजी होता. लाखजण गेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगायला हवा म्हणतात ते त्याच्याबाबतीत खरे ठरायला हवे होते. नाशिक त्र्यंबक रस्त्याला सायकल हब बनविण्याचे त्याचे स्वप्न होते. अतिशय निःस्वार्थी, हाडाचा कार्यकर्ता आपण गमावला आहे. त्याचबरोबर मोठी सायकलिंग करायची असेल तर बेसिक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे. हृद्याची तपासणी, बीपी, ईसीजी करून मगच मोठी सायकलिंग करावी. सिरियस व्यायाम करताना या बेसिक तपासण्या सर्वांनीच करणे गरजेचे आहे. तसेच बेसिक लाइफ सपोर्टचे ट्रेनिंग घेण्याचीही गरज आहे. असा एखादा प्रसंग आल्यावर त्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छ्वास देता आला पाहीजे त्यामुळे हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यात त्याची मदत होऊ शकते.

- डॉ. रमाकांत पाटील


अतिशय वाईट अशी ही घटना आहे. धक्कादायक आणि अविश्वसनीय असेच तिचे वर्णन करावे. अतिशय सभ्य तरूण आपल्यातून निघून गेला आहे. त्याने सायकलिंग मध्ये खूप काम केले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- राजीव जोशी

पोकळी न भरणारी

अतिशय दु:खद घटना आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका उंचीवर त्यांनी संस्थेला नेऊन ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव होता. कधी कुणाला दुखावले नाही. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

- शैलेश राजहंस


द्रष्टा तरुण पडद्याआड

सायकल कल्चर वाढविण्यासाठी त्यांना एक दृष्टी होती. कालच कलेक्टर साहेबांसोबत अडीच तास सायकल चळवळीवर चर्चा झाली. नाशिक ते त्र्यंबकेश्वर सायकल ट्रॅक होण्यासाठी त्यांनी प्रपोजल दिले होते.

- किरण चव्हाण


अतिशय दु:खद घटना आहे, नाशिकला व नाशिककरांना हा मोठा धक्का आहे.

- योगेश शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावर बसू नका...

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका प्रशासनाकडून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी तीन व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आठवडाभरात गुड मॉर्निंग पथकाकडून एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

शनिवारी पालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, स्वच्छता निरीक्षक अमित सौदे आदींसह गुड मॉर्निंग पथक गस्त घालत असतांना संगमेश्वर भागात मोसम नदी किनारी सार्वजनिक ठिकाणी आकाश शेलार, भारत चव्हाण, राजाराम खैरनार हे उघड्यावर शौचास बसलेले आढळले. या तिघांना पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांना छावणी पोलिसांच्या हवाली केले. या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आधीदेखील एक महिलेसह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेकडून अशा पद्धतीने पहिल्यांदाच कारवाई होत असल्याने मालेगावकरांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

दिंडोरीतही जनजागृती

दिंडोरी : शहर दुर्गंधी, रोगराईमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीतर्फे नागरिकांना शौचालय वापराची सक्ती करण्यात येत आहे. नगरपंचायतीतर्फे गुड मॉर्निंग पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. दिंडोरी नगरपंचायतीतर्फे प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय योजना राबविण्यात येत आहे. शहरात एक हजार शौचालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक पहाटेपासून उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना रोखत असून त्यांना समज देत आहे. शौचालयाचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई तसेच शासकीय योजना लाभ दाखले मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाकप उभारणार कर्जमाफीसाठी लढा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, त्यांना निवृत्ती वेतन, स्वामिनाथन शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्र सरकारने एक लाख कोटींचा स्थिरता निधी उभारावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महाराष्ट्रात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय मनमाड येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय राज्य बैठकीत घेण्यात आला.

भाकप राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य शमीम फैजी, राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो व ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील छोटा गुरुद्वारा कार्यालयात झालेल्या या बैठकीत पक्षाची पुढील कार्याची दिशा ठरविण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीच्या १० जुलैपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात व यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर देश बचाओ देश बदलो, या स्टुडंट व युथ फेडरेशनच्या १५ जुलै पासून सुरू होणाऱ्या देशव्यापी आंदोलनात भाकपचा सक्रिय सहभाग राहणार आहे. जीएसटीला पाठींबा देत असतांनाच केंद्राने पुरेशी तयारी न करता तो राबविण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्थ असल्याचे मत भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केले. राज्य कार्यकारिणीचे मनोहर देशकर, सुकुमार दामले, राजू देसले, तुकाराम भस्मे, सुभाष लांडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नाशिक-धुळे एसटीला अपघात; २४ प्रवासी जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकहून धुळ्याला जाणाऱ्या विना वाहक बस व टँकर यांच्यात मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला. चांदवड टोल नाक्याजवळ दुपारी चारच्या सुमार हा अपघात झाला. यात २४ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

चांदवड नजीक आडगाव टप्पा येथे बसला ओव्हर टेक करून पुढे जाणाऱ्या टँकरची बसला धडक बसली. यामुळे हा अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी रचली स्वत:चीच चिता

0
0

मटा ऑनलाइन वृत्त | नाशिक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला सुरु असलेला विरोध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शिवडे येथील ग्रामस्थांनी तर स्वत:चीच चिता रचून महामार्गाला विरोध करण्याचं आंदोलन सुरु केलं आहे. इतकचं नाही, तर झाडाला दोर बांधून गळफास घेण्याचाही इशारा गावकऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
शिवडे गावातील एकूण ४९ ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.



समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास या गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनही तितकच जुंपून कामाला लागलं आहे. गावकऱ्यांचा मात्र जमिनी देण्यास ठाम विरोध असून शेतकऱ्यांनी सरकारी दरपत्रकाची होळी देखील केली होती. गावात ठिकठिकाणी झाडांना दोरखंडाचे फास लटकवले आहेत. सरकारने जबरदस्तीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या करु, असा थेट इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता दिवसेंदिवस अधिक चिघळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपास धुळे बसचा चांदवडजवळ अपघात

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड नजिक भरवस फाट्याजवळ नाशिकहून धुळ्याकडे जाणाऱ्या विनावाहक (बायपास) बस आणि गॅस टँकरला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात २६ प्रवासी किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

नाशिक येथून धुळ्याकडे जाणारी धुळे आगाराची बस (एमएच २० बीएल ३४६८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास चांदवड नजिक हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर पुढे जाणाऱ्या पेट्रोलियम कंपनीचा भरलेल्या गॅस कंटेनर (एमएच ४३ वाय १८६७) यास पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बसचालक महिंद्र सनैट (३१, रा. धुळे) यांच्यासह बसमधील इतर २५ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येथील सोमा टोलवे कंपनीचा अपघात विभाग व चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने चांदवड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना महामंडळाच्या विशेष बसने धुळ्याकडे रवाना करण्यात आले. याबाबत पोलिस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट्टा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या एका विद्यार्थ्यास क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. संशयिताविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ८) सांयकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गंगापूररोड परिसरातील आकाशवाणी टॉवरजवळ करण्यात आली.

भूषण कैलास नांद्रे (२३, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) असे अटक झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. युनिट दोनच्या पथकातील पोलिस नाईक मोतीलाल महाजन यांना अवैध गावठी कट्ट्याबाबत माहिती मिळाली होती. एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्टल बाळगून ते विक्री करण्यासाठी गंगापूररोड परिसरातील आकाशवाणी टॉवरजवळ येणार असल्याच्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लागलीच आकाशवाणी टॉवरजवळ सापळा रचून नांद्रेला अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम तसेच मुंबई पोलिस अॅक्टनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. संशयितास कोर्टात हजर करण्यात आले. नांद्रेला मंगळवार ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबाराचे उलगडेना गूढ

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या तरुणावर वडनेरगेट येथे चौघांनी आर्थिक देवाणघेवाणीतून केलेल्या गोळीबाराचे गूढ उलगडलेले नाही. या प्रकरणाचा सर्व अंगांनी सखोल तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि. ८) चौघांना ताब्यात घेतले असून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. शिवमिलन रामराज सिंह (४२, तुलसी निवास, आनंदनगर, कदम लॉन्सजवळ, नाशिकरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शहर पोलिस ठाण्यामध्ये शिवरामविरूध्द खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. आर्थिक व्यवहारातून गोळीबाराचा बनाव केल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवरामने याआधी अनेक लोकांकडून उसने पैसे घेतले असून त्याच्याकडे पैसे मागणाऱ्यांचा तगादा असतो.

शिवराम जिम व्यावसायिक आहे. तो शुक्रवारी (दि. ७) आपल्या फोर्ड फिगो कारने (एमएच १५ डीसी २५३७) पाथर्डी फाटा येथून वडनेर गेटकडे जात होता. एल अॅण्ड टी कंपनीच्या जुन्या गेटसमोर साडेअकराच्या सुमारास दोन वाहनांनी त्यांची गाडी थांबवली. त्यातून अनिल अपसुंदे (दिंडोरी), तरुण सामनानी, योगेश सामनानी, शंकर सामनानी हे चार जण उतरले. त्यातील एकाने शिवरामच्या डोक्यावर पिस्तोल टेकवली. तू आमचे पैसे कधी देतो, जीम कधी खाली करतो, अशी विचारणा करून धमकी दिली. शिवरामने गोळी चुकवण्याच्या इराद्याने डोक्यावरून हात झटकल्याने गोळी सुटून ती त्याच्या डाव्या हाताच्या पंजाला लागली. हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर मला कोणीतरी बिटको हास्पिटलमध्ये दाखल केले, असे शिवरामने पोलिसांना सांगितले. या घटनेची पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घेत तपासाची सूत्रे फिरविली होती.

जबाबात आढळली विसंगती

पोलिस उपयुक्त श्रीकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक बिजली, बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहेत. घटनास्थळावरून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. शिवरामचे हाताचे ठसे आणि त्याने दिलेली माहिती यावरुन डॉक्टर आणि फोरेन्सिक तज्ञांनी तपास केला तेव्हा शिवरामचा जबाब आणि घटना यामध्ये विसंगती आढळली.

मृतदेह आढळला
नाशिकरोड : गोरेवाडी रेल्वे लाइन परिसरात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या उपप्रबंधकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्याला माहिती दिली. मंगला एक्स्प्रेसचे चालक एस. पी. पाटील यांना शनिवारी (दि. ८) सकाळी रेल्वेमार्गावर मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्ही, मोबाइलची सातपूरला चोरी

0
0

नाशिक ः बंद घराचा कडीकोयडांतोडून चोरट्यांनी घरातील टीव्ही तसेच मोबाइलची चोरी करण्यात आली आहे. हा प्रकार सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील महावीर भवनजवळ घडली.
या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाफीस उल्ला हाबीब अन्सारी (३२, गिरीराज रो हाऊस, फ्लॅट क्रमांक १७, महावीरभवन जवळ, मूळ रा. बिहार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ ते २७ जून दरम्यान अन्सारी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील पॅनासॉनिक कंपनीचा टीव्ही तसेच एक मोबाइल असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वाळेकर करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लुटणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पाथर्डी फाटा येथील बॉम्ब सेलच्या दुकानात गेलेल्या तिघा जणांनी कपड्यांच्या मालासह रोख रक्‍कम लंपास केली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्या अन्य दोघा साथीदारांचा पोलिस तपास करीत आहेत. भारत किसन साळवे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील बॉम्बे सेल या दुकानात कपड्यांची विक्री सुरू असताना अचानकपणे गाडीवरून आलेल्या तिघा जणांनी या दुकानातील कपडे पाहण्यास सुरुवात केली. यावेळी इमसन रमजान अली याने यांना कपडे अंगावर घालण्यास विरोध केला मात्र याचा राग आल्याने या तिघापैकी एकाने इमसनला मारहाण करून तेथील कपडे गोळा केले. दुसऱ्या व्यक्तीने दुकानातील गल्ल्यातील रोख पाच हजार रुपये लंपास केली. तिघांनी दुचाकीवरून पळ काढला. यानंतर इमसनने इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलदास भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पाथर्डी परिसरात गस्त घालत असतांना तीन संशयित मोटारसायकलवर आढळून आले. त्यांची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात करताच दोघे फरार झाले. पोलिसांनी भारत किसन साळवे यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता भारतने गुन्ह्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोलकरणीस जबर मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामाला न आलेल्या मोलकरणीच्या घरी जाऊन एका महिलेसह तिच्या काही साथीदारांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. संशयितांनी मोलकरणीच्या घरातील टीव्हीसह इतर किंमती साहित्याचेही नुकसान केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिलोनी (पूर्ण नाव नाही), ऋषिकेश पानसरे, भूपती अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मारहाण करणारे त्यांच्यासोबत अन्य व्यक्तींही होते. या प्रकरणी रामबहादूर धनबहादूर बीके (सिम्फनी अपार्ट. कर्मयोगीनगर, गोंविदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बीके यांच्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी धुणे भांडे करण्यासाठी मिलोनी हिच्या घरी जाते. बीके यांची पत्नी शुक्रवारी, ७ जुलै रोजी मलोनी यांच्या घरी कामासाठी गेली नाही. त्यामुळे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित मद्य प्राशन करून बीके यांच्या घरी पोहचले. घराची चावी दे असे म्हणत त्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, तुमच्या घराची चावी माझ्याकडे नसल्याचे बीके यांच्या पत्नीने सांगितले असता मिलोनीसह तिच्या मित्रांनी बीके यांच्या पत्नीचे केस धरून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी टीव्ही, लाइट फोडून इतर सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. मारहाणीच्या या घटनेमुळे इमारतीतील इतर लोक बीके यांच्या मदतीला धावले. डॉ. काळे यांचा मुलगा वाद सोडवण्यासाठी पुढे आला असता संशयितांनी त्यालाही मारहाण केली. इतरांनी कोणी जर वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर मारहाण करण्याची धमकी संशयितांनी दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पीएसआय राकेश शेवाळे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलमोहर कॉलनीत तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील मोतीवाला कॉजेल पाठीमागील गुलमोहर कॉलनीत राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

नीलेश पोपट हुजबंध (रा. गुलमोहर कॉलनी, मोतीवाला कॉलेजमागे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नीलेशने शनिवारी सकाळी ७ वाजेपूर्वी केव्हातरी दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गळफास लावून घेतला होता. सकाळी ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद

करण्यात आली. अधिक तपास बी. एस. झनकर करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश नाशिकरोड येथे जावून येतो, असे सांगून घराबाहेर पडला असता तो बेपत्ता झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मिसींग दाखल करण्यात आली होती. मात्र, नातेवाइकांनी त्याचा शोध घेऊन आपल्या घरी आणले. मात्र, त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने आत्महत्येसारखे पाऊल का उचचले याबाबत अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा लाखांचे मोबाइल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरलेल्या मोबाइलचा आयएमईआय हा युनिक क्रमांक बदलण्याचा उद्योगच सुरू झाल्याचे ग्रामीण पोलिसांनी शोधून काढले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मालेगाव शहरातील सहा जणांना अटक झाली असून, त्यांच्याकडील ५९८ मोबाइल जप्त केले आहे. नाशिकमध्येच नाही तर राज्यात पहिल्यांदाच असा प्रकार उघड झाला असावा. यामुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्यावर खऱ्या अर्थाने प्रकाश पडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जात आहे.

मालेगावसह जिल्ह्यात मोबाइल चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. शहर परिसरही अपवाद नाही. मात्र, चोरीस गेलेले मोबाइल सापडत नाही. आयएमईआय क्रमांकावरून शोध घेऊनही मोबाइलचा सुगावा लागत नसल्याने पोलिस हैराण झाले होते. पोलिस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबाबतचा आढावा घेऊन तपासकामी सूचना केल्या. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक गजानन शिवलिंग राजमाने यांना मालेगावात काही मोबाइल दुकानदार चोरीस गेलेल्या मोबाइल हॅण्डसेटचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करीत असल्याची माहिती समजली. त्यानुसार, राजमाने यांनी पुढील तपासासाठी वेगवेगळी पथके तयारी केली. पोलिसांनी शनिवारी (दि. ८) एकाच वेळी वेगवेगळ्या छापे मारले. पोलिसांनी आयशानगर परिसरातील सुपर मार्केट येथील सेल झोन मोबाइल शॉप दुकानावर छापा मारून अबुलईस इक्बाल अहमद यास अटक केली. तसेच, सुफियान देशमुख अबुबकर देशमुख (देशमुख मोबाइल शॉपी), इजाज अहमद मोहम्मद (मोहमद मोबाइल शॉपी), सोहेल अहमद निसार अहमद (हिंदुस्थान मोबाइल शॉपी), तमसील बशर इकबाल अहमद (राजू मोबाइल) आणि लईक अहमद मोहम्मद मुर्तुजा (फाईन टच मोबाइल शॉपी) या संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून क्रमांक बदलण्यासाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, कम्प्युटर, तसेच मोबाइल सॉफ्टवेअर मारण्यासाठी वापरले जाणारे टूल्स आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व संशयितांकडून १४ लाख ५६ हजार ९२० रुपयांचे ५९८ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. संशयिताविरोधात आयटी अॅक्ट ६६ मधील तरतुदीनुसार, इंडियन कॉपी राईट अॅक्ट ६३ तसेच कलम ४८३, ४८५ आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ठिकाणांवरून चोरीस गेलेल्या मोबाइल फोनचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. या संशयितांकडे चोरीचे मोबाइल विक्री करणाऱ्या चोरांचाही यामुळे उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक राजमाने यांच्यासह पोलिस निरीक्षक व्ही. डी. ससे, सहायक पोलिस निरीक्षक टकले, करपे, दुनगहू, पीएसआय खैरनार, इंगळे, चव्हाण आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, आयएमईआय क्रमांक बदलण्याचे काम मुंबईत देखील होते. नाशिकमधून चोरीला गेलेल्या अनेक मोबाइलचा वर्षांपासून पत्ताच लागलेला नाही. मुंबईत क्रमांक बदलल्यानंतर हे मोबाइल परराज्यात विक्रीसाठी पाठवले जातात.

नाशिकला दिलासा

शहरातून मोबाइल चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यातील अनेक मोबाइल ट्रेसच झालेले नाहीत. ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या गुन्ह्यामुळे शहरातील मोबाइल चोरट्यांचा आणि मालेगावचा काही संबंध आहे काय? हे शोधून काढण्याची संधी निर्माण झाली आहे.

यामुळे येतात अडचणी

आयएमईआय हा क्रमांक प्रत्येक मोबाइलसाठी युनिक असतो. याच क्रमांकाच्या आधारे पोलिस चोरट्याचा माग काढू शकतात. मात्र, आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्याने चोरी गेलेल्या मोबाइलचा कोणताही मागमुस लागत नाही. यातून मोबाइल चोरीचा तसेच विक्रीचा मोठा बाजार सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकराजाचे लवकरच ऑनलाइन दर्शन

0
0

देवस्थान ट्रस्टतर्फे वेबसाइटचे अपग्रेडेशन सुरू

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन लवकरच ऑनलाइन उपलब्‍ध होणार आहे. यामुळे देश-‌विदेशातील भाविक घरबसल्या त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊ शकतील. सध्या शिवप्रासाद निवासी खोल्यांचे ऑनलाइन बुकिंग व देणगी दर्शन पावतीचीही ऑनलाइन बुकिंग सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे भाविकांची निवासाची व दर्शनाची गैरसोय टळणार आहे.

चार ते पाच तास प्रतीक्षा करूनही काही सेकंदात त्र्यंबकराजाचे दर्शन घेताना भाविक नाराज होतात. येथे शिवलिंग शाळुंकास्वरूप नाही. त्र्यंबकराजाचे वेगळेपण गाभाऱ्यात निटपणे पाहता येत नाही. यामुळे भाविक नाराज होतात. ऑनलाइन दर्शन सुरू झाल्यास देश-विदेशातील भाविकांना याचा लाभ होईल. त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंग कसे आहे, याची माहिती मिळाल्यास भाविकांचेही समाधान होणार आहे. यासाठी देवस्‍थान ट्रस्टच्या वेबसाइटचे अपग्रेडेशन सुरू आहे.

निवासाची गैरसोय टळणार

त्र्यंबकेश्वर येथे निवासी येणाऱ्या भाविकांना रूम मिळेल की नाही याची धास्ती असते. रूम मिळेल पण त्याचे दाम किती मोजावे लागतील, अशा नानाविध शंका असतात. त्या शंका बुकिंग सुविधेने दूर होणार आहेत. शिवप्रासादातील निवासी रूमचे दर सुविधेनुसार २५० ते १८०० रुपयांपर्यंत आहेत. भाविकांना http://trimbakeshwartrust.com या संकेतस्‍थळावर निवासासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्‍ध आहे.

देणगी दर्शनाची ऑनलाइन बुकिंग

सध्या देणगी दर्शन पावतीचा २०० रुपये दर आहे. ही पावती देऊन उत्तर दरवाजाने थेट दर्शनास जात येते. ऑनलाइन सुविधा झाल्यास काही ठराविक संख्येपर्यंत भाविकांना ही सुविधा दिली जाणार आहे. बुकिंग केल्यानंतर २४ तासांत दर्शन घेण्याची मर्यादा असेल. दूर अंतरावरून नियोजन करून येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ऑनलाइन दर्शनाकरिता काम सुरू आहे. पंढरपूर, शिर्डी आदी देवस्थानांप्रमाणे जगभरातील भाविकांना ऑनलाइन दर्शन देण्याचा आमचा मानस आहे. तत्पूर्वी शिवप्रासाद निवासी खोल्यांचे ऑनलाइन बुकिंग आणि देणगी दर्शन पावती ऑनलाइन सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

- डॉ. सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images