पावसाळा आला, की दर वर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातले दवाखाने हाउसफुल्ल होतात. रोगराई झपाट्याने पसरते. त्याला कारणेही अनेक आहेत. यामध्ये अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात आरोग्य निरोगी राखण्यासाठी घ्यावयाची दक्षता, आहारविहार नियोजन आणि अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या साथरोगांची लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर टाकलेला हा फोकस...
संकलन ः फणिंद्र मंडलिक
--
पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात कचरा साचू न देता रोजच्या रोज स्वच्छता ठेवल्यास रोगराईला निश्चितच आळा बसू शकतो. या कालावधीत सूर्याची किरणे कमी प्रमाणात भूभागावर येतात. त्यामुळे वातावरणात असलेले जीवजंतू नष्ट होत नाहीत. परिणामी रोगराई फैलावते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांची लागण होते. मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डासांची उत्पत्ती जास्त झाल्याने अन्य रुग्णांमध्येही वाढ होते. त्यामुळे पुरेशी दक्षता घेतल्यास जीवजंतू, डासांमुळे फैलावणाऱ्या साथरोगांना आपोआपाच प्रतिबंध होऊ शकतो.
--
पाणी अन् आहाराबाबत राहावे दक्ष
पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात सर्वांनी पाणी उकळून पिणेच श्रेयस्कर ठरते. एक चमचा मध व त्यानंतर पाणी, असे सर्वांनी घेतल्यास उपयुक्त ठरू शकते. आजारपणामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे. लिंबाचा व आल्याचा रस टाकून पाणी घेणेही लाभदायक असते.
--
असा असावा आहार
या दिवसांत मधुर आम्ल लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके व उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्यास एक वेळच जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात. पडवळ, भेंडी, वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा आहारात समावेश करावा. मूग, गहू, ज्वारी, कोरडे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर वाढवावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीटही वापरावे. या ऋतूत वेगवेगळ्या खिरी खाव्यात. बेसन लाडू, टोमॅटो व विविध भाजांचे सूप, उकडीचे मोदक, आवळा व कैरीचा मोरवळा याचा उपयोग करावा.
--
हा आहार करावा वर्ज्य
पावसाळ्याच्या दिवसांत कोबी, सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका, सुके तळलेले मासे, मटकी, मिसळ, ब्रेड, फरसाण, नूडल्स, मैद्याचे तळलेले पदार्थ, तसेच उपवासासाठी शेंगदाणे, भगर खाणे टाळावे. अळूची भाजी, सातूचे पीठ खाऊ नये. थंड पाणी पिणे टाळावे.
--
भाज्यांबाबत जरा जपून...
फळभाज्या किंवा पालेभाज्या विकणाऱ्या व्यक्तीला जंतुसंसर्ग झाला असेल, तर त्या फळभाज्या व पालेभाज्यांतून जंतू घरात येतात. हे जंतू अन्न शिजविताना मरतात. ज्या पालेभाज्या न शिजवता कोशिंबीर करण्यासाठी वापरतात त्या भाज्या मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवल्यास त्यातील अमिबा, जियार्डिया इत्यादी जंतू मरतात आणि जंतांची अंडी पाण्यावर तरंगतात. हे मिठाचे पाणी एका लिटरमध्ये सहा चमचे मीठ घालून तयार करावे. हे पाणी फेकून देऊन नंतर भाज्या स्वच्छ पाण्यात धुतल्या, तर जादा मीठही निघून जाते. त्यामुळे गृहिणींनी ही दक्षता घ्यावी. स्वच्छता म्हणजे निर्मळता, निर्जंतुकता, प्रसन्नता, टापटीपता, नीटनेटकेपणा हे लक्षात ठेवावे आणि ते अंमलात आणावे.
--
ही घ्यावी खबरदारी
-
-पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे. घरातील पाणी साचविण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.
-भांड्यातून अस्वच्छ हाताने किंवा अस्वच्छ भांड्याने पाणी घेणे टाळावे. निर्जंतुक केलेल पाणीच वापरावे.
-पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कपडे धुणे, अंघोळ करणे, जनावरे धुणे टाळावे.
-घराभोवती लहान मुलास शौचास बसवू नये. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घ्यावी.
-केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावावी.
-घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवावेत. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये.
-शिळे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. जेवणापूर्वी, शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
-दात, जीभ व तोंड हे अवयव दररोज सकाळी उठल्याबरोबर चुळा भरून नियमितपणे स्वच्छ करावेत.
-नियमितपणे अंघोळ करावी. स्वच्छ कपडे वापरावेत. बोटांची नखे वाढवू नयेत.
-नेहमी उकळलेले दूध प्यावे.
-गृहिणींनी स्वयंपाकापूर्वी, तसेच बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
--
मलेरिया ः कारणे, लक्षणे अन् उपाय
मलेरिया (हिवताप) हा प्रामुख्याने डासांमुळे होतो. अॅनाफिलीस जातीचे डास चावल्यास याची लागण ताबडतोब होते. संक्रमण पसरविण्याच्या अवस्थेतील डास निरोगी माणसास दंश करतो, तेव्हा काही परजीवी त्वचेतील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. तेथून रक्ताबरोबर ते यकृतामध्ये प्रवेश करतात. यकृतामधील पेशींना संक्रमित करून ते पुढील अवस्थेत विकसित होतात. या अवस्थेत ते पेशींना नष्ट करून रक्तप्रवाहात येतात.
--
रुग्णांमधील लक्षणे
थंडी भरून ताप येणे हे मलेरियाचे प्रमुख लक्षण आहे. जेव्हा रक्तपेशी फुटतात, तेव्हा हानिकारक तत्त्वे रक्तात मिसळण्यामुळे थंडी भरून ताप येतो. आजार प्रस्थापित झाल्यावर ही प्रक्रिया दर २४ किंवा ४८ तासांनी होते. औषधे लवकर सुरू केल्यास असा क्रम दिसण्याची शक्यता कमी होते. यकृताला इजा पोहोचल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात कावीळही होऊ शकते. ताप, यकृताला सूज येऊन रुग्णांमध्ये अशक्तपणा येतो. यातील मेंदूचा हिवताप घातक असतो. यामध्ये रुग्ण बेशुद्ध होणे, आकडी येणे आदी त्रास होऊन शेवटी मृत्यूही ओढावू शकतो. रक्तशर्करा कमी होणे, रक्तपेशी प्लेटलेट्ची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. अतितापामुळे गर्भवती स्त्रियांना, तसेच बाळाला धोका संभवतो.
--
प्रतिबंधात्मक उपाय
मलेरिया होऊ नये यासाठी डास न चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साचू न देणे हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे मच्छर प्रतिबंधक औषधे, घराला जाळ्या बसविणे, फवारणी इत्यादींचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते.
--
डॉक्टरांचा सल्ला मोलाचा
एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाला असल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रक्त तपासणीनंतर तो कोणत्या प्रकारचा आहे, त्याचे उपचार ठरतात. म्हणून रक्ताची तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. गुंतागुंतीच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणेच योग्य ठरते. यावर घरगुती उपाय न करता वेळ न दवडता रुग्णाला दवाखान्यात नेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत.
--
सर्व आजारांचे मूळ आहारविहार आणि विचारांत असते. त्यात नियमितता आणि योग्य व्यायामांची जोड असल्यास आजार दूर पळतात. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आजारांचा फैलाव होतो. या कालावधीत प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतल्यास, परिसराची स्वच्छता राखल्यास आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत. या काळात अतितेलकट, जड, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
-वैद्य विक्रांत जाधव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट