नालेसफाईच्या कामांवरून महासभेत साडेचार तास चाललेले घमासान आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केलेल्या आरोपांवर महापौर रंजना भानसी यांनी अखेर पाणी फिरवले आहे.
नगरसेवकांच्या आरोपानंतर नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्याची करणाऱ्या महापौरांनी आठ दिवसांत या चौकशीवरून घूमजाव केले आहे. नालेसफाईमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी नव्हे तर माहिती मागवल्याचा दावा महापौरांनी केल्याने संशय बळावला आहे. आता पाणी साठल्यास जाब विचारू असा युक्तिवाद करत महापौरांनी एक प्रकारे नालेसफाईच्या भ्रष्टाचाराला क्लीनचीट दिली आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी आपण कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महापौरांच्या या पारदर्शक क्लिनचीटची चर्चा आता पालिका वर्तुळात रंगली आहे.
१४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकची दैना उडाली होती. शहराच्या सखल भागातही पूरस्थिती निर्माण होवून सराफ बाजारात लाखोंचे नुकसान झाले होते. नालेसफाईची कामे वेळेत न झाल्यानेच शहराला या संकटाचा सामना करावा लागला होता. विरोधकांच्या दबावानंतर महापौरांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती. महापौरांनी आता आठ दिवसानंतर चौकशीच्या घोषणेवर घूमजाव केले आहे. आपण चौकशीसाठी समितीची घोषणा केलीच नसून स्वतःच चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाईच्या कामाची आपण माहिती मागवली आहे. तसेच यापुढे कुठे पाणी साचले तर अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. पावसाळापूर्व कामे झाल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.
नालेसफाईतील भ्रष्टाचार दाबण्यासाठी प्रथम महासभा गुंडाळली. आता चौकशीवरून महापौरांनी घूमजाव केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाला पाठीशी घातले जात आहे.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट