टीम मटा
कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चांदवड तालुक्यात दोन, तर मालेगाव व बागलाण तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे बोराळे (ता. चांदवड) गावातील एका शेतकऱ्याने वीज प्रवाहाची तार पकडून, तर वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथील एका शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केली.
चांदवड तालुक्यात २० जून रोजी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. त्याचा अहवाल २१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. शिऊर येथील कचरू पुंजा आहेर (वय ६५) यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मुलाच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज आहे. बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे हरिश्चंद्र वसंत आहिरे या शेतकऱ्याने बुधवारी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली. या शेतकऱ्यावर देखील कर्ज असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
वीज तार पकडून आत्महत्या
मनमाड : चांदवड तालुक्यातील बोराळे येथील ३२ वर्षीय तरूण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून वीज प्रवाहाची तार हातात पकडून मंगळवारी (दि. २०) रात्री आत्महत्या केली. आप्पासाहेब खंडेराव जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आप्पासाहेब जाधव यांच्यावर बोराळे येथील विविध विकास सोसायटीचे सन २०१० पासून ५० हजार रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकीनंतर थकबाकी वसुलीसाठी सोसायटीने जप्तीची नोटीस पाठवल्याने जाधव हादरून गेले होते. या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. वडनेर भैरव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वडनेर खाकुर्डीत स्वतःचीच रचली चिता
वडनेर खाकुर्डी येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. सुपडू भिका पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सावकारी तसेच हात उसनवारीचे दोन लाख रुपये व पत्नी सखुबाई सुपडू पवार हिच्या नावे सोसायटीचे ८० हजार रुपयांचे सन २०१२ पासूनचे कर्ज होते. या कर्जबाजारीपणाला कंटाळून सुपडू पवार यांनी घराच्या पाठीमागे स्वतःची चिता रचून व अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना गावातीलच एका तरुणाने बघितल्याने त्याने आरडाओरड केल्याने समोर आली. मात्र तोपर्यंत सुपडू पवार (वय ७५) हे ८० ते ९० टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट