म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पावसाळापूर्व कामांमध्ये प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बुधवारी शहर वेठीस धरले गेले असताना, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मात्र गुरुवारी प्रशासनाची पाठराखण केली. पावसामुळे शहरातील काही भागांत बिकट परिस्थिती ओढावली असताना गुरुवारी महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून या स्थितीचे खापर प्लास्टिक पिशव्या आणि पावसाळी गटार योजनेच्या वहनक्षमतेवर फोडले. भाजपचे गटनेते आणि सभागृहनेते नाले सफाईचे काम केले नसल्याचा आरोप करत असताना महापौर रंजना भानसी यांनी मात्र प्रशासनाला काम झाल्याची पावती दिली. त्यामुळे पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महापौरांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुधवारी दोन तास चाललेल्या मुसळधार पावसाने शहराची चांगलीच धूळधाण उडाली. पावसाळापूर्व कामे पालिकेने केली नसल्याने शहरातील सखल भागासह जुने नाशिक, सराफ बाजार व पंचवटीतल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबून पुरासारखी स्थिती निर्माण झाली होती. दुकाने आणि घरांमध्ये पाणी घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले. विशेष म्हणजे पालिकेने चारशे कोटी रुपये तयार करून उभारलेली पावसाळी गटार योजनाही कूचकामी ठरली आहे. शहरात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वप्रथम पावसाळी गटार योजनेबाबत जाब विचारण्यात आला. तो यू. बी. पवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलने टोलवला.
पावसाळी गटाराची वहन क्षमता ही तासाला २७.५० मिलिमीटर पाऊस वाहून नेण्याची आहे. प्रत्यक्षात बुधवारी ९२ मिलिमीटर पाऊस झाल्याने पाणी साचल्याचा दावा पवार यांनी केला. तर गटारींमध्ये व चेंबर्सवर प्लास्टिक पिशव्या अडकल्याने पाणी रस्त्यावरच तुंबल्याचा जावईशोध पवारांनी लावला. आरोग्य विभागाकडून पिशव्या उचलण्याचे काम सुरू असल्याचा दावाही यावेळी आरोग्य विभागाने केला. अधिकाऱ्यांच्या या उत्तराला महापौरांनीही मम म्हणत प्रशासनाला एक प्रकारे क्लिनचीट देऊन टाकली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दिनकर पाटील यांनी नियोजन नसल्याने जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. पदाधिकारी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत असताना महापौर अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले. पंधरा दिवसांपूर्वीच आपण नालेसफाई करण्याचे आदेश दिल्याचा दावा करीत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रशासन काम करत आहे ना, असा जप त्यांनी बैठकीत केला. बैठकीनंतर नुकसान झालेल्या सराफ बाजाराची पाहणी करून सोपस्कारही पार पाडले.
पदाधिकाऱ्यांमध्येच विसंवाद
सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी बैठकीतच नालेसफाई केली गेली नसल्याचा दावा केला. त्यावर यू. बी. पवार यांनी कामांचे फोटो दाखवतो असे सांगत पावसाळीपूर्व कामे केल्याचा दावा केला. उपमहापौर प्रथमेश गिते यांनीही परिस्थिती वाईट असल्याचे मान्य केले. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी मात्र कामे झाल्याचा दाखला देत, प्रशासनाला क्लिनचीट देऊन टाकली. त्यामुळे गटनेते व सभागृहनेतेही तोंडघशी पडले. महापौरांच्या या पावित्र्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.
नालेसफाईचे गौडबंगाल
शहरात दरवर्षी पावसाळापूर्व कामे करण्यासाठी जाहीर निविदा काढून काम दिले जाते. यावेळी मात्र या प्रक्रियेला फाटा देण्यात आला. जवळपास तीने ते चार कोटींच्या कामांची प्रभागानुसार विभागणी करण्यात आली. आयुक्तांच्या अधिकारांमध्ये थेट प्रभागानुसार ठेका देण्यात आला. त्यामुळे ३१ ठेकेदार नियुक्त करण्यात आले. चार महिने सफाईचे काम सुरू राहणार असल्याचा दावा पवार यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात शहरात कुठेच काम झाले नसल्याचा दावा सत्ताधारी नगरसेवक करत असताना प्रशासनाकडून मात्र काम झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे पावसाळापूर्व नालेसफाईच्या गौडबंगालाचे गूढ वाढले आहे.
नैसर्गिक नाल्यांवर मौन
पावसाळी गटार योजनेची वहन क्षमता नसली तरी, शहरातील नैसर्गिक नाल्यांचे काय झाले, असा प्रश्न विचारल्यावर महापौरांसह अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवरच बांधकाम झाले आहे. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. नैसर्गिक नाले बंद झाल्याने आणि अवैध बांधकामामुळे पावसाचे पाणी गटारीत जाण्याऐवजी थेट रस्त्यावरच येऊन तुंबले. यावर महापौरांसह अधिकाऱ्यांनी मौन बाळगत प्लास्टिक व वहन क्षमतेची जपमाळ कायम ठेवली. विशेष म्हणजे शहरात किती नैसर्गिक नाले आहेत, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नव्हती.
पावसाळापूर्व कामांत भ्रष्टाचाराचा आरोप
पहिल्याच पावसात शहराचा तलाव झाला असताना, महापौरांकडून केली जाणारी प्रशासनाची भलामण संशयास्पद असून, पावसाळापूर्व कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. मे महिन्यातच पावसाळापूर्व कामे होणे अपेक्षित असतानाही ते झाले नसल्याचा दावा करत, या कामांची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. पावसाळी पाण्याचा प्रश्नही प्रशासन सोडवू शकत नसल्याने सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील नाल्यांची सफाई पारदर्शक न झाल्याचा आरोप करत, महासभेत लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली.
बुधवारी शहरात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली स्थिती सत्ताधारी व प्रशासन हाताळण्यास अपयशी ठरल्यामुळे शिवसेनेने गुरुवारी भाजपची कोंडी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपवर हल्लाबोल केला. पहिल्याच पावसात भाजपच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडल्याचे ते म्हणाले. पावसाळापूर्व कामे मे महिन्यातच होणे अपेक्षित होते. परंतु, ऐनवेळी ३१ प्रभागांत काम वाटून देण्यात आले. नालेसफाई, चेंबर्स दुरुस्तीसह स्वच्छतेचे विषय स्थायी समितीवर येऊन मंजूर केले गेले नाहीत. याउलट भूसंपादनासारखे मलिद्याचे विषय वारंवार स्थायीवर का आणले जातात, यावर त्यांनी आक्षेप घेतला. शहराचा तलाव होण्याची गोम यात असल्याचे सांगून स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना प्रशासन पावसाळी पाण्याचाही प्रश्न सोडवू शकत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचा जाब प्रशासनाला विचाणार असल्याचे ते म्हणाले.
नालेसफाई ‘पारदर्शक’
यावेळी बोरस्ते यांनी भाजपच्या कारभारावर बोट ठेवले. शहराचा पहिल्याच पावसात तलाव झाला असताना प्रशासनाने नालेसफाई व स्वच्छता पारदर्शक झाली तर नाही ना, असा चिमटा काढला. प्रशासनावर अंकुश नसणे हे सत्ताधारी भाजपचे अपयश असून, भाजपचे आमदार नागरिकांना मदत करण्याऐवजी प्रशासनातील अधिकाऱ्यांना घेऊन फिरत होते असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या या ‘पारदर्शक’ कारभाराचा जाब आपण विचारणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीची तक्रार
पावसाळापूर्व कामांवरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन शहरात तातडीने नालेसफाई व स्वच्छता करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व नगरसेवकांनी पावसाळापूर्व कामे झालीच नसल्याचा आरोप करत तातडीने पावसाळी गटार योजनेची तपासणी आणि नालेसफाई मोहीम हाती घेण्याची मागणी केली. पावसाची तीव्रता जास्त असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण आयुक्तांनी दिल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
तीन दिवसांत नालेसफाई करा
पहिल्याच पावसात शहराची दैना उडाल्यानंतर व प्रशासनाच्या कामावर चौफेर टीका झाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. पावसाची तीव्रता जास्त असली तरी, सर्व परिस्थितीला पालिकाच जबाबदार असल्याची कबुली आयुक्तांनी दिली. तीन दिवसांत शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई तातडीने करण्याचे फर्मान त्यांनी काढले. दरम्यान, पावसाळी गटार योजनेवर अतिक्रमण झाले असून ते तातडीने काढण्याचे निर्देशही दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पहिल्या पावसात कचरा वाहून येत असल्याने चेंबर्स ब्लॉक होत असले तरी, परिस्थितीची जबाबदारी पालिकेची असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हॉकर्स, गाळेधारकांमुळे पाणी अडवले जात असल्याने हे अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम करून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.
आयुक्तांना ठेवले अंधारात
सार्वजनिक बांधकाम विभागाने यावेळेस नालेसफाईचे एकत्रित काम देण्याऐवजी प्रभागानुसार काम दिले आहे. विभागाच्या या प्रकारावर आयुक्तांनीही संताप व्यक्त केला असून, असे उद्योग का करतात असा जाब विभागाला विचारला आहे. या सर्व कामांचे केंद्रीकरण करण्याऐवजी प्रभागानुसार वाटणी केल्यावरुन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट