म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात गंगेवरील आठवडे बाजाराचे मोठे नुकसान झाले. अर्ध्या तासातच अनेक विक्रेत्यांचा भाजीपाला वाहून गेला, तर पावसापासून बचावासाठी थांबलेल्या ग्राहकांची प्रचंड कोंडी झाली. वीर सावरकर पथ, मधली होळी, बडी दर्गा, मोदकेश्वर मंदिर, भद्रकालीकडे जाणारे सर्वच रस्ते प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे जलमय झाल्याचे चित्र होते. या सर्वच रस्त्यांवर कंबरेएवढे पाणी साचल्याने ग्राहकांना घराकडे परतणेही शक्य झाले नाही. अवघ्या अर्ध्या तासात जुने नाशिक पाण्याखाली गेल्याची स्थिती पाहायला मिळाली.
शहरात बुधवारी तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाला. पूर्वीच्या काळी नऊ टेकड्यांवर वसलेल्या जुन्या नाशिकची दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने कोंडी केली. आज बुधवारचा आठवडे बाजार असल्याने नेहमीपेक्षा या परिसरात प्रचंड गर्दी होती. शंकराचार्य अधोक्षानंद यांचेही रामकुंडावर आगमन झाल्याने गर्दी आणखी वाढली. दुपारी साडेचारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची प्रचंड धावपळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी पावसापासून बचावासाठी उभारलेल्या मांडवाखाली ग्राहकांनी आसरा घेतला. काही वेळात पाऊस थांबेल या आशेवर थांबलेल्या विक्रेत्यांचे अंदाज फोल ठरवत पावसाने तब्बल दीड तास हजेरी लावली. त्यामुळे रामकुंडावर चारही बाजूने येणाऱ्या पाण्याचे लोंढे वाढत गेले. काही वेळातच गुडघाभर पाणी साचले. पाण्याचा वेगही प्रचंड असल्याने भाजीपाला पाण्याने भिजला. अनेकांचा भाजीपाला वाहून गेला. लहान विक्रेत्यांना भाजीपाला आवरता घेता आला, पण मोठ्या विक्रेत्यांना ते शक्य झाले नाही.
ग्राहकांची कोंडी
गंगेवरील आठवडे बाजारात वाढत्या पाण्याच्या भीतीने ग्राहकांनी भरपावसातच घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, अर्ध्या तासात पावसाने सर्वच मार्ग बंद केल्याचे चित्र होते. वीर सावरकर मार्गाने मेनरोड, महात्मा गांधी रस्त्याकडे जाण्याचा मार्ग जलमय झाला होता. वीर सावरकर पथावर कंबरेच्या वर पाणी साचले होते. मात्र, पाण्याची सर्वाधिक पातळी दहीपुलावर पाहायला मिळाली. तेथील वाहतूक काही वेळाकरिता थांबली होती. अनेकांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांचे फक्त आरसे दिसत होते. वीर सावरकर पथावरील ही स्थिती पाहिल्यानंतर अनेकांनी बडी दर्गा, मोदकेश्वर मंदिर, भद्रकाली, मधल्या होळीमार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही पाण्याचे प्रचंड लोंढे वाहत असल्याचे चित्र होते. परिसरातील काही तरुणांनी खबरदारी म्हणून दुचाकी वाहने आडवी लावून मार्ग बंद केला होता. मात्र, ही आडवी लावलेली वाहनेही काही वेळाने पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजीपाला खरेदीसाठी दुचाकीने आलेल्या महिलांची मोठी तारांबळ उडाली. बाहेर पडताच न आल्याने अनेक महिलांमध्ये भीतीने ग्रासले होते. आसराची वेस, डांगर उतार (डिंगर आळी), मेन रोडचा उतार, दहीपूल, नेहरू चौक, सराफ बाजाराबरोबरच मालेगाव स्टँड, कपालेश्वराजवळचा भाग, सरदार चौकाचा भाग येथे प्रचंड पाणी साचले होते.
आपत्ती व्यवस्थापन कागदावरच
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा मार्ग, तसेच भुयारी मार्गांचे काम हाती घेतल्याचे भासवले होते. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात जुन्या नाशिक परिसरात गंभीर स्थिती उद््भवत आली आहे. यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याची खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. या परिसरातील नैसर्गिक नाले बुजल्याने पाण्याची वितरण व्यवस्थाच खुंटली असून, महापालिकेने यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन निव्वळ कागदावरच असते. प्रत्यक्षात या विभागाचा शहराला काहीही उपयोग होत नसल्याचा संताप नागरिकांनी केला.
गोदावरी नदीला शेकडो नाले, झरे, ओहोळ येऊन मिळतात. काळाच्या ओघात ते गडप झाले आहेत. परिसरातील बहुतांश नैसर्गिक नाले बुजले आहेत. पाण्याचा मार्ग बंद झाल्याने येथे कंबरेएवढे पाणी साचणे नवीन नाही. मात्र हे संकट आणखी गडद होत जाणार आहे.
- प्रशांत परदेशी, रहिवासी, जुने नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट