उपनगर नाक्यावरील अपघातप्रवण वळणावर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसच्या धडकेने कष्टकरी महिला जागीच ठार झाली. त्यामुळे वाहतूक दीड तास विस्कळीत झाली. पोलिसांनी पाठलाग करून बसचालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिस व घटना पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास आंध्र प्रदेश, सोलापूर व अकलूजच्या भाविकांना देवदर्शनाला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने (एमएच १५ एएक्स ०९०३) उपनगर नाक्यावरील चौकात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने ही महिला जागीच ठार झाली. तिचा मृतदेह तासभर पडून असल्याने गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या महिलेचे नाव कमलबाई सुपडू कुमावत (४६, सुंदरनगर, देवळालीगाव) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या पश्चात तीन मुले आहेत. ही महिला विवाह समारंभात केटरर्सकडे काम करत असे. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने तीच मुलांना सांभाळत होती. तिला घेण्यासाठी आलेल्या मुलाच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला. त्यामुळे त्यालाही भोवळ आली. थोड्यावेळाने त्याचे कुटुंबीय तसेच देवळालीगावातील रहिवाशी घटनास्थळी आले. बसचालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाइकांनी घेतली. उपनिरीक्षक ए. ए. येवले, उपनिरीक्षक काळे, सहाय्यक निरीक्षक कडभाने, हवालदार गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. तासभराने अॅम्ब्युलन्स आली व कमलाबाई यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.
मृत्यूचा सापळा
उपनगर नाका व परिसरात अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. तीन वर्षापूर्वी बसखाली महिला तर ट्रकखाली जवान ठार झाला होता. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर सिग्नल बसविण्यात आला. मात्र, अडथळा ठरणारा बसथांबा अजूनही हलविण्यात आलेला नाही. त्यामुळे अपघात होत असतात. हा परिसर अपघातप्रवण असूनही वाहतूक पोलिस नसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. बसथांबा त्वरित हलविण्याची मागणी होत आहे.
मटा भूमिका
उपनगर नाक्यावरील बेधुंद वाहतुकीने आणखी एक बळी घेतला. गेल्या वर्षभरात येथे काही बळींसह अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. अत्यंत वर्दळीच्या नाशिक-पुणे रस्त्यावर आडनीड जागेवर सिग्नल, रस्त्यातच आडवी झाडे, मधोमध बस थांबा अन् उलट्या दिशेने जाणारे वाहनधारक असा विचित्र गुंता झाला आहे. या समस्येची तीव्रता सामान्य नागरिकांनी वारंवार दाखवून दिली होती. आंदोलनादी उपायही करून झाले; पण गेंड्याच्या कातडीच्या मंडळींवर काहीच परिणाम झाला नाही. किमान आता तरी आणखी बळी जाण्याची वाट न पाहाता संबंधित शासकीय विभागांनी संयुक्तपणे या प्रश्नी उपाय शोधायला हवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट