शहराच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला पुन्हा वेग आला असून, पूर्वीच्या प्रस्तावातील १६ पैकी ५ गावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता केवळ ११ गावांचा नवीन प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत धुळे शहराचे क्षेत्रफळ ४६.४६ चौरस किलोमीटर आहे तर प्रस्तावित ११ गावांचे क्षेत्र ६२.५१ चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे प्रस्तावित शहराचे क्षेत्रफळ एकूण १०८.९७ चौरस किलोमीटर वाढेल. याबाबत अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या नवीन हद्दवाढ प्रस्तावात वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, बाळापूर, मोराणे, पिंप्री या गावांचा हद्दवाढीत समावेश करण्यात आला आहे. तर पूर्वीच्या प्रस्तावातील फागणे, कुंडाणे, बिलाडी, लळिंग व वडजाई ही ५ गावे या प्रस्तावातून वगळण्यात आली आहेत. शहराच्या हद्दवाढीबाबत अंतिम निर्णय घेतांना यात पुन्हा फेरबदल होण्याची शक्यता असून, प्रस्तावित क्षेत्रात पुन्हा घट किंवा वाढ होऊ शकते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
तत्कालीन नगरपालिकेचे २००३ मध्ये महापालिकेत रुपांतर झाले. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने वाढला. चारही बाजूला नवनवीन वसाहती निर्माण झाल्या. १९७३ पासून शहराची हद्दवाढ झालेली नसून, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दि. ३० जानेवारी २००३ मध्ये महापालिका हद्दवाढीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तर २००५ मध्ये १६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेतर्फे २०१५ मध्ये संबंधित गावांना भेटी देऊन नकाशे व आराखडे तयार करून ते सरकारकडे सादर करण्यात आले. त्याआधारे नगरविकास विभागाने दि. १० ऑगस्ट २०१५ रोजी हद्दवाढीबाबत प्रथम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येऊन नाशिक विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. या सुनावणीत बहुतांश हरकतीमध्ये हद्दवाढीला विरोध दर्शविला गेला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने हद्दवाढीला विरोध असल्याचा महासभेत ठराव पारीत केल्यामुळे हद्दवाढीच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट