खत प्रकल्पावर आणल्या जाणाऱ्या घंटागाड्यांतील कचऱ्याच्या वजनावरून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आता चाप बसणार आहे. प्रशासनाने येत्या १ जूनपासून घंटागाड्यांद्वारे खत प्रकल्पावर वाहून आणण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या वजनाची आता ऑनलाइन नोंद घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली. कोणत्या प्रभागातून दिवसभरात किती कचरा आला, याचीही थेट माहिती महापालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कचऱ्यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
स्थायी समितीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी अनियमित घंटागाड्यांकडे लक्ष वेधत आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रभागातील केरकचरा संकलनासाठी ६ घंटागाड्या नियुक्त असल्या, तरी गाड्या दिसतच नसल्याचा आरोप तिदमे यांनी केला. त्यावर आयुक्त कृष्णा यांनी खुलासा करताना सांगितले, की सर्व घंटागाड्यांवर जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात आल्याने कोणती घंटागाडी प्रभागात कुठे फिरत आहे, हे आरोग्याधिकाऱ्यांच्या दालनातील नियंत्रण कक्षात प्रत्येक नगरसेवकाला पाहता येणे शक्य आहे. परिणामी घंटागाड्यांच्या संख्येच्या बाबतीत घोटाळा करता येणे आता शक्य नाही. त्यामुळे त्यांनी हा आरोप फेटाळून लावला.
शहरातून संकलित केला जाणारा केरकचरा घंटागाडीद्वारे वाहून नेण्यात आल्यानंतर तेथे अत्याधुनिक वजनकाट्यावर त्याची नोंद घेतली जाते. हा वजनकाटा संगणकीय उपकरणांशी जोडलेला असल्यामुळे कोणत्या प्रभागातील कोणत्या क्रमाकांच्या घंटागाडीने किती कचरा वाहून आणला याची नोंद आता येत्या १ जूनपासून महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागाच्या संगणकावर ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वजनात भ्रष्टाचार होणे आता अशक्य असल्याचेही आयुक्त कृष्णा यांनी स्पष्ट केले. सोबतच नोंद लगेच होणार असल्याने कचरा वजनात फेरफार करता येणार नाही. त्यामुळे ठेकेदाराचे वेतन देणेही सोपे होणार आहे.
--
ठेकेदारांचं चांगभलं थांबणार!
मानवी हस्तक्षेपामुळे कचऱ्याच्या वजनात भ्रष्टाचार करून ठेकेदारांचे चांगभले करण्याचा डाव काही अधिकाऱ्यांकडून खेळला जात असल्याचा प्रकार मुख्य लेखापरीक्षकांच्या लक्षात आला होता. ही बाब त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कचऱ्याची ऑनलाइन नोंद घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट