पाणीटंचाईची समस्या मनमाडकरांना वर्षानुवर्षे भेडसावत आहे. त्यामुळे या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी शहरवासीयांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवावा. असे केल्याने शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल, असे प्रतिपादन क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्ट इंडियाचे प्रणेते कर्नल शशिकांत दळवी यांनी केले.
मनमाड नगरपरिषद तसेच संस्कार खेळवाडी संस्कार प्रज्ञा जयोस्तुते प्रतिष्ठान संकल्प संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भगीरथ प्रयास २०१७’ या चर्चासत्रात उपक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. या चर्चासत्रात
कर्नल दळवी यांच्यासह, स्वामी कंठानंद, निखील झंवर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनमाड पालिका, तेल कंपन्या, औद्योगिक प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय आदींनी रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन प्रमुख वक्त्यांनी या चर्चासत्रात केले. सराफ असो.चे सुरेश लोढा, अरुण सोनवणे, मनमाड अर्बन बँकेचे संजय वडनेरे, हॉटेल व्यावसायिक राजू रॉय, संकल्प संस्थेचे तुषार गोयल आदींनी मार्गदर्शन केले. किशोर कुडाळ, अमोल देव, मनोज नलावडे यांनी संकल्पना, उद्देश समजावून सांगत या उपक्रमाची गरज स्पष्ट केली. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक गणेश धात्रक, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, विलास कटारे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
संस्कार खेळवाडी, संस्कारप्रज्ञा संस्था, श्री संकल्प बहुऊद्देशीय सेवाभावी संस्था यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट