म. टा. वृत्तसेवा, निफाड
शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संयोजकांकडून प्रचार- प्रसार सुरू आहे. संयोजकांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या वेळी अण्णा हजारे यांनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन संयोजकांना केले.
किसान क्रांतीच्या राज्यभरात जिल्हा, तालुका कोअर कमिटी तयार करून प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संपाबाबत जागृती करावी. राज्यभरातील प्रतिनिधींनी त्याचा सविस्तर अहवाल तयार करून संपाची चळवळ अहिंसेच्या मार्गाने पुढे न्यावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी किसान क्रांतीच्या समन्वयक समितीला राळेगणसिद्धी येथील भेटीप्रसंगी केले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारे यांना शेतकरी संपाचे सर्व नियोजन व रूपरेषा याची माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विशेष ठरावही करण्यात आला. सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून किसान क्रांतीचे समन्वयक किशोर जाधव, संदीप थेटे, संदीप जगताप, योगेश रायते, डॉ. योगेश गोसावी, विजय काकडे, शंकर दरेकर, सचिन थेटे, बापू अडसारे, गंगाधर निखाडे, भास्कर भगरे आदींनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंची भेट घेऊन माहिती दिली. शेतकरी संपाचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणार असेल तर मी यात नक्की सहभागी होईन, असे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिले. या वेळी राळेगणचे सुरेश पठारे, पारनेर येथील दिनेश बापू औटी, भाऊ पठारे आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट