नाशिक-पुणे महामार्गालगत गांधीनगर पोस्ट ऑफिसच्या अखत्यारित असलेल्या डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातली टपालसेवा महिनाभरापासून ठप्प आहे. मोबाइल आणि बिलांव्यतिरिक्त अन्य कोणतीही पत्रे, पाकिटे, नियतकालिके मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.
डीजीपीनगर पसिररात नाशिकरोडहून द्वारकेकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेडकरनगर आणि शिवाजीनगरसमोरील भाग येतो. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक घरे म्हणजे १० हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती तेथे आहे. या परिसरात नोकरदार कुटुंबीयांसह अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. या भागात ज्येष्ठ नागरिक संघही कार्यरत आहेत. परिसरात अभ्यासिकाही आहे. तेथे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धा परीक्षा, तसेच अन्य नियतकालिकांसाठी वार्षिक वर्गणी जमा केलेली आहे. त्यामुळे दर आठवड्याला किंवा दरमहा मासिके येणे अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही मासिकांचे वाटप केले जात नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी गांधीनगर पोस्ट ऑफिसला वारंवार कळविले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकलेला नाही, असेही नागरिकांनी सांगितले.
मनुष्यबळाचे दुखणे
डीजीपीनगर क्रमांक एकमधील काही ज्येष्ठ नागरिकांसह स्थानिकांनी टपाल मिळत नसल्याची तक्रार गांधीनगर पोस्ट ऑफिसकडे केली. ‘आम्ही कोणतेही टपाल शिल्लक ठेवत नाही. सर्व टपालांचे वेळेत वाटप केले जाते’, असा दावा पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला केला. मात्र, वार्षिक वर्गणी भरल्याच्या पावत्या आणि नियतकालिके मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोस्ट कर्मचाऱ्यांनी नमते घेतले. त्यांनी आपल्याकडे कमी मनुष्यबळ असल्याचे कारण पुढे करीत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
टपाल जाते तरी कोठे?
डीजीपीनगरमधील वाटप करण्यासाठी जमा होणारे टपाल स्थानिक रहिवाशांपर्यंत पोहोचत नाही. मग असे टपाल जाते तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण, टपाल घेण्यासाठी गांधीनगर पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतरही मिळत नाही. नागरिकांचे महत्त्वाचे टपाल थेट कचऱ्यात जाते का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट