टीम मटा
सिडकोतील उत्तमनगर परिसरात भटक्या कुत्र्याने तब्बल पंधराहून अधिक बालकांना चावा घेतल्याच्या घटनेने संपूर्ण नाशिकमध्येच याबाबत हळहळ आणि चिंता व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, महापालिकेचा हलगर्जीपणा आणि अतिरेकी श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला नाशिककरांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडूनही पालिकेकडून फारशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येबद्दल टीम मटाने घेतलेला हा आढावा
पंचवटी -अपघातांचे प्रमाण वाढले
महापालिकेने थांबवलेली निर्बीजीकरणाची मोहीम आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पंचवटी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना पंचवटी परिसरात घडलेल्या आहेत. कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. महापालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबविली होती. ती थंडावल्यानंतर कुत्र्यांच्यी संख्या वाढल्याचे दिसत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने शहर परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. पंचवटीतील सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या पाचशेच्यावर भरले असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पंचवटीत नांदूर, मानूर, आडगाव, मखमलाबाद आणि म्हसरुळ या पाच गावांच्या परिसरात अजूनही शेती पिकते. या गावांच्या बहुतांशी रस्त्यावर नॉनव्हेज खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्स आहेत. या हॉटेलच्या भोवताली कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. तसेच गोठ्यांच्या भोवताली कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसते. वाढलेल्या पिकांमध्ये कुत्र्यांचा मोकाट वावर होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उन्हाळ्यात पाणी दिलेल्या पिकांच्या शेतात गारव्याला बसण्यासाठी येणाऱ्या या कुत्र्यांमुळे पिके तुडविली जात आहेत.
पंचवटीत गांधी तलाव, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, गणेशवाडी, तपोवन, मखमलाबाद नाका, म्हसरुळ, मखमलाबाद, अमृतधाम, नांदूर, मानूर आदी भागात तसेच कचरा साचणाऱ्या रस्त्यांवरच्या ठिकाणांवर हमखास मोकाट कुत्री दिसतात.
कुत्र्यांची संख्या वाढण्यास रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे हे प्रमुख कारण आहे. या कचऱ्यात खाद्यपदार्थही असल्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकणे बंद केल्यास कुत्र्यांच्या संख्येवर निश्चित आळा बसू शकेल
- कैलास पोटे
मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
- शशिकांत निमसे
उघड्यावर होणारी मांसाची विक्री आणि काही हॉटेलच्या आजूबाजूची अस्वच्छता यांच्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. अमृतधाम आणि हनुमान नगर परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना ताज्या आहेत. महापालिकेने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे अधिकाऱ्यांना सांगूनही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत.
- सुरेश खेताडे, नगरसेवक
महापालिकेची श्वान निर्बीजीकरणाची मोहीम थंडावल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करायला हवा.
- अरुण पवार, नगरसेवक
आडगाव- रस्त्यावरील मांसविक्रीची लालूच
आडगाव परिसरातील सागर व्हिलेज कॉलनी, मेट होस्टेल,कोणार्कनगर, श्रीरामनगर, आडगाव गावठाणामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले, वयोवृध्द नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरात रस्त्यावर होणारी मांस विक्री, हॉस्टेल, हॉटेल आणि घरगुती शिळ्या अन्नपदार्थांची नागरिक व व्यावसायिक आजूबाजूच्या परिसरात विल्हेवाट लावतात. त्यामुळे कुत्र्यांनादेखील अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागत नाही.
सकाळी ७ ते १० आणि रात्रीच्या वेळी या मोकाट कुत्र्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वेळेत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्याच फिरत असतात. त्यामुळे वॉकला, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणारे व लहान मुले, वृध्द, महिला, मोटारसायकल चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा कुत्रे पाठलाग करून चावा घेतात.
मागील वर्षी वसंतदादा नगरमधील एका घटनेमध्ये एक महिन्याच्या लहान मुलाला आई पाणी भरण्यासाठी गेली असता घरातून ओढून नेऊन लचके तोडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिवाय परिसरातील अनेक लोकांना चावा घेतला आहे. पण प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
आमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. लहान मुलांना बाहेर खेळणे मुश्किल झाले आहे. परिसरातून जाताना-येताना लहान मुले, वृध्द, महिलांना या कुत्र्यांची भीती असते. अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील प्रशासन कोणतीही कारवाई केली जात नाही.
- भारत निकम, स्थानिक रहिवासी
सातपूर- वाहनचालकांना कुत्र्यांची धास्ती
न्यायालयाच्या आदेशावरून भटक्या श्वानांना जिंवत मारणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे महापालिकेकडून भटक्या श्वानांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी स्वतंत्र ठेकाच महापालिकेने दिला आहे. असे असतांना देखील भटक्या श्वानांचा त्रास नित्याचाच झाला आहे. भटक्या श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त महापालिकेने केला पाहिजे. रस्त्यावर, उद्यानात अथवा रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची धास्ती वाहनचालकांसह पायी चालणाऱ्या नागरीकांमध्ये असते. नुकतेच सातपूर भागातील जाधव संकुल येथे झालेल्या घटनेत एका भटक्या कुत्र्याने तब्बल १० ते १२ मुलांना चावा घेत जखमी केले होते. जखमी झालेल्या मुलांचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, नेहमीच होणाऱ्या भटक्या श्वानांच्या त्रासाला रहिवाशी वैतागले आहेत.
महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करून पुन्हा सोडून दिले जाते. महापालिकेचा ठेका घेतलेल्यांकडून नसबंदी झाल्यावर खतप्रकल्पाच्या भागातच भटक्या श्वानांना सोडले जाते. मात्र ते पुन्हा आहे त्या परिसरात परत येतात. महापालिकेकडून डॉग व्हॅनही कार्यरत आहे. ही व्हॅन आल्याचे कळताच कुत्री पोबारा करतात. जाधव संकुल भागात गेल्याच आठवड्यात १० ते १२ मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले होते. यानंतर महापालिकेच्या यंत्रणेकडून डॉग व्हॅनही पाठविण्यात आली. परंतु कुत्रे आढळले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कुत्र्यांवरून राजकारण
सातपूर कॉलनी भागात एकाच दिवशी अनेक मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर नागरिकांनी त्या कुत्र्याला ठार मारले होते. यानंतर मनसे व भाजपची सत्ता असतांना माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी सातपूर कॉलनी भागात पाहणी दौरा केला होता. याप्रसंगी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सातपूर कॉलनीतील मटनाच्या दुकानांमुळेच भटके कुत्रे वाढत असल्याचा आरोप केला होता. मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मुद्दा खोडत गेल्या अनेक वर्षांत कुत्र्यांचा त्रास झाला नाही, त्यावेळी मटणाची दुकाने नव्हती का असा सवाल उपस्थित केला होता. यावेळी उपमहापौर कुलकर्णी यांनी शांत राहणे पसंत केले होते.
अशोकनगर, श्रमिकनगर भागात सर्वाधिक भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ असतो. याबाबत वेळोवेळी महापालिकेकडे समस्या मांडल्याही आहेत. महापालिकेकडून काही प्रमाणात भटकी कुत्री पकडलीही जातात. परंतु, त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई होणे गरजेचे आहे.
- संदीप भावले
अशोकनगर भागातील जाधव संकुलमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. अनेक लहान मुलांना चावा घेत जखमीही केले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे.
- सुभाष गुंभाडे
सिडको - भाजीबाजाराचा कचरा कारणीभूत
सिडको परिसरात गल्लीबोळात शेकडो मोकाट कुत्री आढळून येतात. दत्त चौक, त्रिमूर्ती चौक, तोरणानगर यासारख्या परिसरात उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीच्या ठिकाणी या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. त्याचबरोबर सिडकोतील भाजी बाजारासाठी अद्याप स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था नसल्याने अनेक वेळा उरलेला, सडका भाजीपाला हा भाजीबाजाराच्या आवारातच टाकला जात असतो. त्यामुळे याठिकाणी या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. दुचाकी किंवा चारचाकी वाहने रस्त्याने येजा करताना या कुत्र्यांच्या टोळ्या या गाड्यांच्या मागे धावतात. त्यामुळे अनेकवेळा अपघातही होत असतात. सिडको भागातील उघड्यावरील मांस विक्री व भाजीबाजारांजवळील केरकचरा, सडका भाजीपाला हेच या कुत्र्यांचे केंद्रस्थान असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. सिडकोतील या मोकाट कुत्र्यांबाबत अनेकवेळा नागरिकांनी आंदोलनेसुद्धा केली आहेत. मात्र, महानगर पालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सिडकोतील पेलिकन पार्क हे कुत्र्यांचे मुख्य ठिकाण असून, सिडकोपासून जवळच असलेल्या पाथर्डी फाट्यावरील कचरा डेपोच्या परिसरातूनही अनेक कुत्रे सिडकोत येत असतात. पूर्वी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी शहरातील कुत्री पाथर्डी फाट्याच्या पुढील निर्बीजीकरण केंद्रात आणले जात होते. हीच कुत्री पुन्हा सिडकोतच सोडली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असतो. त्यामुळे शहराच्या तुलनेत सिडकोत मोकाट कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या मोकाट कुत्र्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही तर नगरसेवकही यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सिडकोतील भाजीभाजारांच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत हे मोकाट कुत्रे दिसून येतात. त्यामुळे रात्री अपरात्री कंपनीतून घरी जाणाऱ्या कामगारांची खूपच कसरत होत असते.
उघड्यावर मास विक्री बंद केली पाहिजे. काही दुकानदार स्वच्छता ठेवत असले तरी सर्वच जण मांस विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवत नसल्याने याच दुकानांसमोर सर्वाधिक कुत्र्यांची गर्दी दिसून येते.
- प्रकाश पाटील, कामगार
उत्तमनगर भागात अजूनही दोन पिसाळलेले कुत्रे असल्याचा नागरिकांकडून सांगण्यात येते. महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. नवनिर्वाचित नगरसेवकांनीसुद्धा हा महत्वाचा प्रश्न सोडविला पाहिजे.
- डॉ. मंजुषा दराडे
नाशिकरोड - वाहनचालकांचा करतात पाठलाग
नाशिकरोड विभागातही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पायी चालणाऱ्या वाटसरूंसह वाहनचालकांनाही या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्याच आठवड्यात नांदूर नाका येथील एका रिक्षाचालकाच्या दहा वर्षीय मुलाला एका कुत्र्याने चार ठिकाणी चावा घेऊन गंभीर जखमी केले होते.
नाशिकरोड प्रभागातील सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, देवळालीगाव, वडारवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, चेहेडी, रोकडोबावाडी, जेतवननगर, पाण्याची टाकी, कॅनॉलरोड, गोसावीवाडी, चव्हाण मळा या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागात अस्वच्छतेचे प्रमाणही जास्त असल्याने भटके कुत्रे मोठ्या संख्येने आढळून येतात. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांवर दररोज भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ बघायला मिळतो.
रेल्वे स्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वेने उतरलेल्या प्रवाशांना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. सिन्नर फाटा प्रवेशद्वाराने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचे कळप बिनधास्त बसलेले दिसतात. बऱ्याचदा हे कुत्रे वाहनांच्या मागे भुंकत धावतात. त्यामुळे घाबरलेल्या वाहनचालकांचे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
ठेकेदार सुस्त, प्रशासन मस्त
मनआने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘नवोदय व्हेट सोसायटी’ या एजन्सीला एक वर्षासाठीचा ठेका दिला आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास अशा भागातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना पालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निर्बीजीकरणाची प्रक्रिया करुन त्यांना पुन्हा मूळ जागेवर सोडून देण्याची, लसीकरणाची जबाबदारी या एजन्सीवर आहे. मात्र, सध्या ही एजन्सी सुस्त तर प्रशासनही मस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षी ८ हजार तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत ६०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले.
भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी असून ते वाहनांच्या मागे धावतात. बऱ्याचदा दुचाकीस्वार घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी रेल्वेने उतरलेल्या प्रवाशांना तर जीव मुठीत धरुनच रस्त्याने प्रवास करावा लागतो.
-गौतम बागूल, नागरिक
भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीस्वार घसरुन पडल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करुन चावा घेतल्याचे प्रकारही अधूनमधून घडतात. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करुनही उपयोग होत नाही. दुसरीकडील कुत्री येथे आणून सोडली जातात.
- सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. गेल्या वर्षी ८ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले. ज्या भागातील नागरिकांची तक्रार येते त्या भागातील भटके कुत्रे पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जमा करुन त्यांच्यावर निर्बीजीकरणाची प्रक्रिया करुन त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी सोडले जाते. नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये.
-डॉ. प्रमोद सोनवणे, पशु वैद्यकीय अधिकारी, मनपा
जेलरोड - मच्छिमार्केटमध्ये कुत्र्यांचे ठाण
जेलरोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक, बालके जखमी झाल्याच्या घटना गेल्या सहा महिन्यांत घडल्या आहेत. मांस विक्रेत्यांच्या टपऱ्यांजवळ कुत्र्यांची संख्या जास्त असते. जेलरोडच्या इंगळेनगर चौकात पन्नास वर्षे जुने मच्छी मार्केट आहे. येथे मटण आणि चिकन विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असते. दसक, पंचक, सायखेडारोड, टाकळीरोड, उपनगर, जयभवानीरोड, आर्टिलरी सेंटर, विहीतगाव, रोकडोबावाडी आदी ठिकाणी मटणविक्रेत्यांच्या टपऱ्या सुरू झाल्या आहेत. तेथेही कुत्र्यांचा मुक्काम असतो. कॉलन्यामध्ये मांसाहारानंतर त्यातील तुकडे कचऱ्यात टाकले जातात. तेथेही कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास हा पहाटे क्लास जाणारे विद्यार्थी, कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दूधवाले, कचरा वेचणारे यांना होतो. सायंकाळी उशिरा क्लासवरुन येणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्या मागे कुत्रे लागतात. जेलरोडला इंगळेनगर, पवारवाडी, जेलरोड-कॅनलरोड तसेच उपनगर पोलिस ठाण्याच्या रोडवर हा त्रास होतो. ही कुत्री धबा धरुन बसलेली असतात. सातपूर, अंबड येथून मध्यरात्री उशिरा कामावरुन नाशिकरोडला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर जीव मुठीत धरुनच घरी यावे लागते. द्वारका व डीजीपीनगरपासून कुत्री पाठलाग करायला सुरुवात करतात.
दहशतीच्या घटना
जयभवानी रोडच्या जाचक मळ्यात गेल्या फेब्रुवारीत तीन बालकांसह आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. प्रकाश रहाणे यांचा पावणेतीन वर्षाचा मुलगा सिध्दार्थ शेजाऱ्यांबरोबर फिरायला निघाला असता कुत्र्याने सिध्दार्थला कानाच्या मागे व दंडावर खोलवर चावा घेतला. थोडा वेळाने निवृत्त प्रेस कामगाराच्या कोपऱ्याला आणि नंतर पाच वर्षांच्या मुलाच्या दंडावर चावा घेतला. या कुत्र्याने पाटील कॉम्पलेक्सजवळ प्रथम दीर-भावजयीला चावा घेतला. नंतर लहान मुलीला व नंतर वास्तु पार्कजवळ भाजी विक्रेत्याला ते चावले. कुत्रे पकडण्यासाठी गाडी न आल्याने नागरिकांनी दुपारी साडेतीनपर्यंत वाट पाहून कुत्र्याला मारुन दूरवर नेऊन टाकले. ते उचलण्यासाठीही गाडी आली नाही. जेलरोडच्या ययातीनगर भागात काही महिन्यांपूर्वी चार वर्षांच्या मुलीला, तसेच एका ज्येष्ठाला कुत्र्याने चावा घेतला होता. ते गंभीर जखमी झाले होते. जेलरोडच्याच भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटी येथील नागरिकांना, तसेच दुचाकीसारख्या वाहनांवर जाणाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी अनेकदा हल्ला चढवला आहे.
काही महिन्यांपूर्वी ययातीनगरमध्ये चार वर्षांच्या मुलीला तसेच एका वयस्क व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. रात्री महिला, नोकरदार व नागरिकांना घरी परतणे मुश्किल झाले आहे. कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा.
-किशोर सोनवणे, नागरिक
माझ्या मुलाला फेब्रुवारीत श्वानदंश झाला. उपचारासाठी सहा हजाराची दोन इंजेक्शनची नाशिकहून मागवली. दोन दिवसात १५ हजार खर्च झाला. महापालिकेचे अधिकारी सोनवणे यांना फोन करुनही कुत्रे पकडण्यासाठी गाडी आलीच नाही.
-प्रकाश रहाणे
जेलरोडच्या वर्दळीच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटीतील नागरिकांना तसेच दुचाकी चालकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, दूधविक्रेते, पेपरविक्रेते व प्रेस कामगारांचा पाठलाग ही कुत्री करतात.
- गणेश कुलथे, पेपर विक्रेते
देवळाली कॅम्प - महिन्याभरात ५५ जणांना चावा
देवळाली परिसरासह ग्रामीण भागात शेकडोच्या संख्यने भटकी कुत्रे असून, या कुत्र्यांकडून वारंवार नागरिकांसह बालकांना चावण्याचे प्रकार घडत आहेत. याशिवाय रस्त्याने चालणाऱ्या दुचाकीधारकांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. अपघातास कारण ठरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांना आवर घालावा अशी मागणी नेहमीच होते. गेल्या अनेक दिवसांपासून देवळालीसह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यातच येथील जैन बांधवांकडून जीवदया म्हणून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे व चपात्या टाकण्यात येत असल्याने त्यांची संख्या वाढतीच आहे. रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकावर ही कुत्री भुंकून चावा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी तर वाहनचालक घसरून पडतात. ६ नंबर नाका, महालक्ष्मी मंदिर, लामरोड, आनंद रोड, हौसन रोड, स्टेट बँक कॉर्नर, वडनेर रोड, रेस्ट कॅम्प रोड अशा भागात या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कॅन्टोन्मेंट प्रशासनास ही मोकाट कुत्री डोकेदुखी ठरत आहेत. याशिवाय गेल्या सहा महिन्यांपासून कुत्र्यांच्या चावण्याचे प्रकारदेखील वाढीस लागले आहेत. एप्रिल महिन्यात देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलासह दोन खासगी डॉक्टरांकडे साधारणपणे ५५ नागरिकांना १२५ हून अधिक इंजेक्शन देण्यात आली आहेत.
कुत्रे चावण्याच्या घटना
(कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल नोंद)
नोव्हेंबर :- ४७
डिसेंबर :-४६
जानेवारी :- ७३
फेब्रुवारी :- ३९
मार्च :- २२
एप्रिल :- ५५
कुत्रे मारणे व पकडणे दोन्हींवर बंदी
देवळाली कॅम्प परिसरात कॅन्टोन्मेंट हद्दीलगत असलेली कुत्री प्रशासनाने पकडून लष्कराच्या मोकळ्या हद्दीत सोडून दिली होती. मात्र, त्यातील काही कुत्री मेल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच चेन्नईच्या एका खासगी संस्थेने तत्कालीन बोर्ड अध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे आरोग्य निरीक्षक भातखळे यांनी सांगितले. याशिवाय कुत्र्यांना मारण्याची अथवा पकडण्याचीदेखील परवानगी नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हतबल झाले आहेत.
निर्बीजीकरणाचा खर्च आवाक्याबाहेर
शहर परिसरातील मोकाट कुत्र्यांना मारू नये, त्याऐवजी त्यांच्या निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करावी, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, निर्बीजीकरणासाठी एका कुत्र्यामागे सुमारे एक हजार रुपये एवढा खर्च होत असतो. तो प्रशासनाला परवडण्यासारखा नसल्याने तीन चार वर्षांपूर्वी असे निर्बीजीकरण करण्यात आले होते. मात्र, आता खर्च वाढल्याने प्रत्येक कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी होणारा खर्च परवडणारा नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट