म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरात नवीन घंटागाड्या पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांसह ठेकेदारांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची अट ठेकेदारांना घालण्यात आली असून, येत्या सोमवार (दि. १ मे)पासून नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा स्वीकारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ठेकेदारांसोबतच नागरिकांनाही ओला व सुका असा स्वतंत्रपणे कचरा घंटागाड्यांमध्ये टाकावा लागणार आहे. हा नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून पाचशे ते हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक घरात दोन डस्टबिन आणि सोसायट्यांना दोन डस्टबिन ठेवणे आता बंधनकारक राहणार आहे. तसेच, घंटागाडी ठेकेदारांनाही नियमाचे पालन न केल्यास प्रतिदिन पाच हजारांचा दंड केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आता शहरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. महापालिकेचा खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असून, नवीन सर्व २०६ घंटागाड्या दाखल आता झाल्या आहेत. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्याची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. परंतु, नागरिकांकडूनच एकत्रित ओला व सुका कचरा येत नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेने आता १ मेपासून नागरिकांनीच ओला व सुका कचरा घंटागाड्यांमध्ये टाकावा, असे फर्मान काढले आहे. प्रत्येक घरात नागरिकांनी दोन डस्टबिन ठेवावेत, त्यातच ओला व सुका असा कचरा स्वतंत्र करावा. त्यानंतर सोसायटीच्या दोन डस्टबिनमध्ये तो स्वतंत्ररीत्या जमा करावा आणि नंतरच घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा टाकावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दि. १ मेपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागणार आहे. महापालिने ओला व सुका कचऱ्याच्या निर्देशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंडाची तरतूद केली आहे. पहिल्यांदा एकत्रित कचरा आणला, तर पाचशे व त्यानंतर हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. नागरिकांसोबत घंटागाडी ठेकेदारासाठीही दंडाची तरतूद केली आहे. घंटागाडी ठेकेदाराने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर त्यालाही पाच हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांवरच आता ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्याचे बंधन आले आहे.
घंटागाड्यांची बोंब
महापालिकेने नवीन घंटागाड्यांसंदर्भात करार करताना ठेकेदारांना नव्या घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तरतूद करावी, असे म्हटले आहे. परंतु, अद्यापही बहुसंख्य घंटागाड्यांमध्ये स्वतंत्र ओला व सुका करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतंत्रपणे कचरा आणला, तरी ठेकेदार त्याची अंमलबजावणी करतील का, असा प्रश्न आहे. घंटागाडी ठेकेदारांनी आता भाजपसोबतच घरोबा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी कितपत होते याबाबत शंकाच आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट