म. टा. वृत्तसेवा, सटाणा
सटाणा शहरालगतच्या आरम नदीपात्रातील देशी दारू दुकान बंद करण्याच्या मागणीकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, मद्यपींकडून होणारी छेडछाड व संसाराच्या होणाऱ्या राखरांगोळीने मळगावच्या रणरागिणींच्या संतापाचा शनिवारी उद्रेक झाला. संतप्त महिलांनी देशी दारू दुकानाची तोडफोड करून पेटविण्याबरोबरच दुकानमालक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनाही चोप दिला. तसेच, पोलिसांना न जुमानता राज्य महामार्गावर रास्ता रोको करीत प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसपाटीलसह चार जणांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य महामार्गावरील दारूचे दुकाने बंद झाल्याने सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावरील आरम नदीपात्रातील देशी दारूचे दुकानात सातत्याने मद्यपींची गर्दी वाढत होती. मळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, याकरिता महिलांसह ग्रामस्थ सातत्याने मागणी करीत होते. दुकानमालकाला या संदर्भात नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करित दुकान सुरूच होते. मद्यपींकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रकारही वाढले होते. या गोष्टींचा परिपाक म्हणून की काय शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महिलांनी एकत्रित येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता मोर्चा देशी दारू दुकानाकडे वळविला. दुकानावर हल्लाबोल करीत दुकानातील साहित्यासह दारू बाटल्यांची तोडफोड करण्यास प्रारंभ केला. पत्र्यांचे शेडही उद्ध्वस्त केले. पोलिसांनी अधिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी जमाव पांगविण्यास प्रारंभ केला असता संतप्त महिलांनी पोलिसांवरच हल्लाबोल केला.
सिलिंडरचा स्फोट
संतप्त झालेल्या महिलांनी दुकानाला आग लावून दारूचे खोके पेटविले. या आगीत दुकानातील गॅस सिलिंडर व फ्रिजचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी आलेला पालिकेचा बंबदेखील महिलांसह ग्रामस्थांनी परतून लावल्याने पोलिसदेखील हतबल झाले होते. या धुमश्चक्रीत महिलांनी अधिक आक्रमक होत आपला मोर्चा राज्य महामर्गावर वळविला. सुमारे २०० हून अधिक महिलांनी शहरातील ताहाराबाद नाक्यावर असलेल्या चौकात रास्ता रोकोस प्रारंभ केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. देशीदारू दुकानाच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी पोलिस पाटलांना या घटनेस जबाबदार धरून ताब्यात घेतले असता, ग्रामस्थ व महिला अधिक संतप्त होत रास्ता रोको केला.
सोमवारी बैठक
शनिवारच्या सुटीमुळे अधिकारी अनुपस्थित असल्याने सोमवारी (दि. २४) मळगाव ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसह महिलांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन नायब तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिले.
कळवणमध्ये अड्डे उद्ध्वस्त
दारू दुकाने ५०० मीटर बाहेर नेण्यास बंधन टाकल्यामुळे ग्रामीण भागात गावठी दारूला मागणी वाढली आहे. खेड्यापाड्यावर गावठीचे पेव फुटल्याने पोलिस यंत्रणेने त्याविरोधात मोहीम उघडली आहे. कळवण तालुक्यातील बेजनंतर गिरणा नदीकाठी पिळकोस शिवारात गावठी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट