भगूर परिसरातील शेतकऱ्याकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याकडे विविध समस्यांचे निवेदन देतानाच, शेतकऱ्यांनी कांद्याची माळ भेट देत ‘अच्छे दिन’ची आस दाखवणाऱ्या भाजप सरकारला ही माळ देण्यात यावी, अशी विनंती करीत आपला संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक गोरखनाथ बलकवडे, ज्ञानेश्वर गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन करंजकर, विशाल बलकवडे, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, अशोक ठुबे, कांगणे, मुन्ना अन्सारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
अवघ्या राज्यभरात अन्यायकारक समृद्धी महामार्ग, संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या होत असून, या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, युनायटेड जनता दलातर्फे राज्यभर काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे भगूर येथे आगमन झाले. त्या वेळी सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष, कांदा, भाजीपाला आदींसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमी भाव देण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी देवळाली कॅम्प, भगूर पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
भगूरसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारे पाणीदेखील उचलू दिले जात नसून, लष्करासह कॅन्टोन्मेंट प्रशासन शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करीत आहेत. यामुळे आधीच पिकांना भाव नसल्याने पाण्याअभावी पिके करपण्याची भीती काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन करंजकर यांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट