मराठी भाषेचा महिमा हा मराठीदिनापुरता न राहता वर्षभर मराठीचे गोडवे गायले जावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या चैत्रपालवी कार्यक्रमाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफण्यात आले. या वेळी प्रसिद्ध संगीतकार संजय गिते यांनी विविध गीते सादर केली.
बारमाही मराठी या शीर्षकाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी सुरू झालेला हा कार्यक्रम आता वर्षभर सुरू राहणार असून, त्यानिमित्ताने रसिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. दर महिन्याला मराठीबाबत एक नवीन प्रयोग करून तो रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संजय गिते यांची आहे. यातील प्रत्येक पुष्पात ऋतूनुसार गाणी व कविता सादर करण्यात येणार आहेत.
रविवारी झालेल्या कार्यक्रमात सोर्स म्युझिक अॅकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सूर निरागस हो, मिटुनी लोचने, चैत्र मास आला, बुद्धी दे, हिरवा निसर्ग, ऋतुरंग उधळी, ही गुलाबी हवा, वाऱ्यावरती गंध पसरला, माझ्या देवीचा रहिवास, कोलंबसाचे गर्वगीत ही गाणी व कविता सादर झाल्या. यातील दोन कविता नाशिकचे कवी विनय पाठारे यांच्या होत्या. त्याला संगीत संजय गिते यांनी दिलेले होते. कार्यक्रमास आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले उपस्थित होते.
पियाली घोष, निषाद गिते, सोनल निकम, राहन दाणी, निशांत भोसले यांनी गीतगायन केले. तबल्यावर नंदकुमार जोशी, गिटारवर संकेत बराडिया, संवादिनीवर संजय गिते यांनी साथसंगत केली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट