दरवेळी कुणी ना कुणी यायचे आणि बापूंना म्हणायचे, काय हा माणूस नसती उठाठेव करतोय. याच नसत्या उठाठेवीचे आता शहरातील एका मोठ्या संस्थेत रुपांतर झाले असून, या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या संस्थेचे खरे सूत्रधार आहेत ते प्रमोद कोतवाल, ज्यांना लोक आदराने बापू म्हणतात. आज वयाच्या ६३ व्या वर्षातदेखील त्यांची सामाजिक कार्याची धडपड तरुणांना लाजवणारी आहे.
बापू कोतवाल यांचा जन्म नंदुरबार येथे झाला. त्यांचे वडील पोस्टमन असल्याने अत्यंत तुटपुंज्या पगारात त्यांना पत्नी आणि ९ मुलांचा गाडा ओढावा लागायचा. वडील १९६२ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना ४० रुपये पेन्शन मिळू लागली. या ४० रुपयांतील ३० रुपये घरभाडे जात असे अाणि उरलेल्या १० रुपयांत ९ भावंडे आणि आई-वडील यांचा खर्च भागवावा लागायचा. आपल्या वडिलांची होणारी अशी ओढाताण पाहून बापूंना स्वस्थ बसवले नाही. एका नगरसेवकाला निवडणुकीत मदत केल्याने त्याने बापूंना एक पायजमा, एक सदरा व पाणपोईवर पाणी वाटण्याचे काम दिले. या कामातून बापूंना दिवसाला तीन रुपये मिळू लागले. त्यामुळे कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागत असे. याचदरम्यान तहानलेल्या व्यक्तींची तृष्णा भागत असल्याचे समाधान पाहताना बापूंचे मन हेलावून जायचे. या कामातील त्यांची तत्परता पाहून रोटरी क्लबनेही त्यांना काम करण्याची संधी दिली. यावेळी समाजातील दुःख जवळून पाहता आले. त्यामुळे आयुष्यात जेव्हा जेव्हा काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा बापूंनी आपल्या कमाईतील काही हिस्सा समाजासाठी राखून ठेवला. नंदुरबार येथून बी. कॉम.ची पदवी मिळवल्यानंतर बापू नाशिकच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत स्टोअरकीपर म्हणून कामाला लागले. येथे काम करीत असताना ज्या ठिकाणी ते राहतात त्या भागातील गंगापूररोडवर असलेल्या पुरातन मारुती मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ ज्ञानयज्ञ व्हावा म्हणून सन २००२ पासून रामनवमी ते चैत्र पौर्णिमा यादरम्यान प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन केले. त्यात विश्वास साक्रीकर, प. वि. वर्तक, डॉ. यशवंत पाठक, प्रवीण दवणे, सच्चिदानंद शेवडे, हभप मिलिंदबुवा बडवे आदी अनेक नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आहे. यंदा त्यांच्या व्याख्यानमालेचे सोळावे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे विषय निवडतानाही अाध्यात्मिक विषयांबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, हा त्यांचा आग्रह असतो. १६ वर्षांत या व्याख्यानमालेचा दर्जेदार श्रोतृवर्ग तयार झाला आहे. बापूंचे लहानपण गरिबीत गेल्याने त्यांना अनेक वेळा उपाशीपोटी झोपावे लागायचे. आपल्यासारखे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी बापूंनी पितरांचा महोत्सव ही कल्पना अंमलात आणली. पितृपक्षात लोक पितरांना जेवण म्हणून चार लोकांना घरी जेवायला बोलवतात. जेवायला येणारे पण काही आनंदाने येत नाहीत. आढेवेढे घेऊनच येत असतात. यातून बापूंनी समाजाला विनंती केली, कि पितरांचे जेवण घाला, पण त्याच वेळी समाजात जे एका घासाची वाट पाहत आहेत, अशा गरजू व गरीब लोकांना एक घास द्या. एक मूठ धान्य द्या. त्यांच्या पोटात अन्न गेले, तर ते खरोखर तृप्त होतील, या ध्यासाने त्यांनी धान्याचे संकलन सुरू केले. जमा झालेले धान्य अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वेदाध्यायन करणारे विद्यार्थी, मूकबधिर अादींच्या संस्थांना दिले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या माध्यमातून दर सर्वपित्री अमावास्येला शंभर क्विंटलच्या वर धान्य व लाखो रुपये न जमा होतात. बापू म्हणतात, हे कार्य माझे एकट्याचे नाही. या कामासाठी परिसरातील प्रशांत काटकर, सुनील आहिरे, प्रवीण काळे, सचिन आहिरे, दिलीप कुलकर्णी,
सुनील पोफळे, रवींद्र जोशी, अनंत मोहाडीकर, विजय काटकर, अरुण कुलकर्णी, राजेश खाउसकर, राजा सूर्यवंशी, विठ्ठल सावंत आणि इतर अगणित व्यक्तींचे सहकार्य मिळत असते. त्यामुळेच ‘हा नसती उठाठेव’चा डोलारा उभा आहे. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य चिकित्सा शिबिर, दिवाळी पहाट, विद्यार्थी दत्तक योजना अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. ज्या गरजूला मदत मिळते, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सर्व पुरस्कार मिळाल्याची भावना मनात येते.
नाशिककरांनो, लिहिते व्हा!
ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक.
समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.
ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com
(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट