भारतात वाहन उत्पादनात अग्रेसर असलेली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवीत असते. त्याअंतर्गत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी महिंद्राने जिल्ह्यात रस्त्यांवर पडलेल्या एक लाख प्लास्टिक बॉटल्स संकलित केल्या होत्या. या संकलित केलेल्या एक लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा मॉन्स्टर महिंद्राने उभारला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकमुक्त अभियानात महिंद्राने पुढाकार घेतला असल्याचे औपचारिक कार्यक्रमात महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी सांगितले.
महिंद्राचे उमेश जोशी, महिंद्रा इगतपुरी प्लँटचे व्यवस्थापक नासिर देशमुख, सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक प्रभावळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुढे, इगतपुरीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी इगतपुरी महिंद्रा राबवीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे सादर करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी उपक्रमात महिंद्राचे योगदान मोठे आहे. परंतु, पर्यावरणरक्षणाचा संदेश समाजातील सर्वच घटकांमध्ये पोहोचावा या हेतूने महिंद्राने प्लास्टिकमुक्त अभियान हाती घेतले आहे. महिंद्रा कंपनीच्या इगतपुरी प्लँटमधील कामगार व अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात रस्त्यांवर व फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स संकलित करण्याचे काम हाती घेतले होते. विविध ठिकाणांहून तब्बल एक लाख प्लास्टिक बॉटल्स महिंद्राने संकलित केल्या होत्या. याप्रसंगी महिंद्राचे अधिकारी जोशी यांनी महिंद्रा विविध सामाजिक उपक्रम राबवीत असल्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविली. विशेष म्हणजे प्लास्टिकमुक्त अभियानात कामगार व अधिकाऱ्यांनी मोठा सहभाग दाखविल्याचेही जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाभरातून एक लाख प्लास्टिक बॉटल्स संकलित केल्यावर त्यांचे करायचे काय, असा प्रश्न कंपनी व्यवस्थापनासमोर उभा राहिला होता. यात इटलीत ४५ हजार प्लास्टिक बॉटल्सचा मॉन्स्टर उभा केला असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यामुळे संकलित केलेल्या एक लाख प्लास्टिक बाटल्यांचा मॉन्स्टर उभा करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने हाती घेतला. औपचारिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्लास्टिकच्या बाटल्यांच्या या मॉन्स्टरचे उद्घाटन करण्यात आले.
गीनिज बुकात होणार नोंद
एक लाख प्लास्टिकच्या बॉटल्स संकलित करून तब्बल २१ मीटर उंचीचा मॉन्स्टर महिंद्राने उभारला आहे. जगातील सर्वांत मोठा प्लास्टिक बाटल्यांचा मॉन्स्टर महिंद्राने उभारल्याने त्याची गीनिज बुकात लवकरच नोंद केली जाणार असल्याचे व्यवस्थापनाचे जोशी यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट