भारतीय जनता पक्षाकडून सलग पाच वेळा महापालिकेत निवडून येण्याचा मान मिळविलेल्या रंजना भानसी या एकमेव ज्येष्ठ सदस्य आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच महापौरपद मिळालेल्या भाजपच्या त्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या या निष्ठेचे बक्षीस म्हणूनच पक्षाने त्यांना महापौरपदाच्या खुर्चीवर बसविले आहे.
सन १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मधील महापालिका निवडणुकीत भानसी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील (कै.) कचरूभाऊ राऊत हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून १९९२ आणि १९७२ या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे विधानसभेत निवडून गेले होते. १९९७ ला मालेगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. माहेरी घरातच राजकीय वातावरण असल्याने शालेय शिक्षण घेत असताना त्यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. राऊत यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत भानसी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. निवडणूक जिंकण्यासाठी कसब त्यांना याच टप्प्यावर शिकायला मिळाले होते.
आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक पोपटराव भानसी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर गृहिणी म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना १९९७ मध्ये पहिल्यांदा नाशिक महापालिका निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. म्हसरुळ परिसरातील वॉर्ड क्रमांक एक हा अनुसूचित जमाती, महिला गटासाठी आरक्षित झाला होता. तेव्हा भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष (कै.) बंडोपंत जोशी आणि (कै.) दौलतराव आहेर यांनी म्हसरुळच्या जागेसाठी खासदार राऊत यांना घरातील महिला उमेदवार देण्याचा आग्रह धरला. राऊत यांची मुले सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत होत्या. त्यामुळे घरातील महिला उमेदवार देणे शक्य होणार नाही, हे लक्षात
घेऊन मुलगी रंजना या लग्नानंतर म्हसरूळ परिसरातील केतकी सोसायटीत वास्तव्यास असल्याने त्यांना या भागातून उमेदवारी देण्यास हरकत नसावी, असा मुद्दा (कै.) राऊत यांनी मांडला आणि रंजना भानसी यांची उमेदवारी निश्चित झाली.
महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत तसेच पोटनिवडणुकीत काँग्रेसने यश मिळविले होते. त्यामुळे हा वॉर्ड काँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेला होता. त्यामुळे काँग्रेसला मानणाऱ्या भागातून भाजपची उमेदवारी करणे तसेच अवघड होते. हे शिवधनुष्य पेलण्याचा विडा त्यांनी उचलला आणि या भागात पहिल्यांदाच भानसी यांच्या रुपाने भाजपचा उमेदवार विजय झाला. त्यानंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत त्या अरुण पवार आणि राजेंद्र नवले यांच्यासोबत भाजपकडून विजयी झाल्या. २००७ मध्ये एकसदस्यीय वॉर्ड रचनेत त्यांची लढत आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली पवार यांच्याशी झाली. या अटीतटीच्या लढतीतही त्यांनी विजयश्री खेचून आणली. २०१२ च्या दोन सदस्यीय प्रभाग रचनेतही त्यांनी विजय मिळविला. चार सदस्यीय प्रभाग रचनेत त्यांनी पुन्हा विजय मिळवित सलग पाचव्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून येण्याचा विक्रम केला. भानसी यांनी यापूर्वी तीन वेळा स्थायी समितीचे सदस्यपद, एकदा पंचवटी प्रभाग समितीचे सभापतीपद तसेच एकदा महिला बालकल्याण समितीचे सदस्यपद भूषविलेले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट