म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा विळखा काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याची स्थिती आहे. येथील वाहतुकीचे नियोजन करण्याचा प्रयत्न होऊनदेखील हा प्रश्न सुटत नसतानाच एसटीच्या बसथांब्यामुळे येथील कोंडीत भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. येथील बस थांब्याचे स्थलांतर करावे, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
नाशिकरोडहून निघाल्यानंतर दत्त मंदिर चौक, उपनगर आणि फेम टॉकीजजवळ वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. काठे गल्ली सिग्नलचे दिव्य पार केल्यावर ही वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. कसाबसा द्वारका चौक ओलांडल्यावर सारडा सर्कलकडे जाताना नवे संकट वाहनचालकांपुढे उभे राहते, ते म्हणजे येथे थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांचे. एकामागोमाग एक बस येथे उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत असल्याचे चित्र या भागात दिसून येते. येथे एका रांगेत दोन-तीन बस उभ्या राहिल्यावर द्वारका चौकातून निघालेल्या वाहनांना थांबण्याशिवाय पर्यायच राहत नाही. बहुतांश बस अचानक थांबतात. त्यामुळे मागील वाहनांना त्यांना वळसा मारून सारडा सर्कलकडे जावे लागते. या एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या न प्रवासी उतरेपर्यंत भर रस्त्यातच उभ्या राहतात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होतोच, पण मागे द्वारका चौकातही गोंधळ उडतो. परिसरातील संपूर्ण वाहतूकच ठप्प होते. काही जण वाहने विनाकारण रेस करतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते, तर बहुतांश वाहनचालक हॉर्न वाजवीत असल्याने ध्वनिप्रदूषणातही भर पडते. त्यामुळे येथील एसटीचा थांबा अन्यत्र हलविल्यास हा त्रास कमी होईल, अशी भावना वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
चोहोबाजूंनी कोंडी
नाशिकरोडकडे जाताना द्वारका चौकात हॉटले द्वारकासमोर रिक्षाथांबा आहे. त्याच्यापुढे अनधिकृत वाहन पार्किंग आहे. पुढे काठे गल्लीचा सिग्नल ओलांडल्यावर जीप आणि छोटे ट्रक व्यावसायिक वाहने उभे करतात. त्यामुळे या मार्गावरील रिक्षाथांबा हटवावा, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. असाच प्रकार कन्नमवार पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर होत आहे. येथील सर्व्हिसरोडवर वाहने उभी असतात. चहा, वडापाव व अन्य व्यावसायिक व्यवसाय करतात. द्वारका हॉटेलशेजारी असणाऱ्या सर्व्हिसरोडवरही असेच चित्र आहे. नाशिकरोडहून द्वारकाला आल्यावर हनुमान मंदिराशेजारून जिल्हा बँकेसमोरील सर्व्हिसरोडवरही वाहने, व्यावसायिक असतात. या सर्व समस्येवर तातडीने कायमची उपाययोजना शोधण्याची मागणी होत आहे.
स्थलांतरने मिळेल दिलासा
हा बसस्थांबा त्वरित पेट्रोलपंपाच्या पुढे स्थलांतरित केल्यास या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकेल. या थांब्याशेजारीच रिक्षांचाही थांबा आहेत. मात्र, मंजूर संख्येपेक्षा जास्त रिक्षा येथे उभ्या असतात. त्याचेही स्थलांतर करणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलिसांनी ही कार्यवाही तातडीने केल्यास सर्वांचाच मनस्ताप दूर होईल. वाहतूक कोंडी झाल्यावर पोलिसही हतबल होतात. कारण, त्यांना एसटी बसमुळे झालेली कोंडी सोडवायची, की द्वारका चौकाकडे लक्ष द्यायचे, असा प्रश्न पडतो. सारडा सर्कलहून द्वारका चौकात आल्यावर तेथे देवीच्या मंदिराशेजारीही एसटी व शहर बस उभ्या राहतात. त्यामुळे तेथेही कोंडी होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट