म. टा. वृत्तसेवा, कळवण
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अभोणा गटात होणाऱ्या लक्षवेधी लढतीची हवा निघून गेली आहे. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह अभोणा गट व अभोणा, नरुळ गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीच माघार घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत व्यक्तीकेंद्रीत आघाडी झाल्याचे समजते.
अभोणा गटात यशवंत गवळींमुळे पवार परिवाराने समोरासमोर लढा देण्याचा प्रयत्न सफशेल फोल ठरला. गवळी व पवार यांच्यात आगामी विधानसभेची अविरोधी ‘कमिटमेंट’ झाल्याचे एकीकडे बोलले जात आहे. यानिमित्ताने गवळी पुन्हा काँग्रेसकडून आपल्या हक्काच्या अभोणा गटात निवडून येण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर कनाशी गटातून माजी आमदार व मंत्री पुत्र नितीन पवार, विद्यमान खासदारपुत्र समीर चव्हाण, प. स. चे माजी सभापती काशिनाथ गायकवाड यांच्यात तिरंगी होणारी लढत होणार आहे. खर्डेदिगर गटात जयश्री पवार व मानूर गटात डॉ. भारती पवार उभ्या आहेत.
खर्डेदिगर गट
जयश्री पवार (राष्ट्रवादी), झेलुबाई ठाकरे (भाजप), जयमाला खांडवी (अपक्ष ), लता बर्डे (माकप), मीराबाई पवार (शिवसेना), वंदना बहिरम (काँग्रेस) यांच्यात लढत आहे. या गटातून कोणीही माघार घेतली नाही.
मानूर गट
डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी), हेमलता पवार (माकप) यांच्यात समोरासमोर लढत होईल. अपक्ष बेबीबाई सोनवणे यांनी माघार घेतली.
कनाशी गट
जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार(राष्ट्रवादी), समीर चव्हाण (भाजप), काशिनाथ गायकवाड (काँग्रेस), हिराजी चौधरी (माकप) यांच्यात लक्षवेधी लढत होईल. शिवसेनेकडून बाबुराव हिराजी कोल्हे यांची उमेदवारी छाननीत बाद ठरली होती.
अभोणा गट
जयश्री पवार किंवा सुभाष राऊत यांच्यापैकी एक उमेदवारी करणार होते. मात्र दोघांनी या गटातून माघार घेतल्याने होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भावी राजकारणाची खेळी खेळण्यात नितीन पवार व यशवंत गवळी यांना यश लाभल्याचे चर्चा होत आहे. यशवंत गवळी (काँग्रेस), जितेंद्र ठाकरे (भाजप), विश्वनाथ थैल (माकप)यांच्यात तिरंगी लढत होईल. या गटातून इंदुबाई गवळी यांनी माघार घेतली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट