Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महापौरांच्या प्रभागात रंगणार बहुरंगी लढत

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत महापौर अशोक मुर्तडक यांच्या प्रभागातील सर्वसाधारण जागेसाठी त्यांच्या ड प्रवर्गात षटरंगी लढत रंगणार आहे. या प्रभागात मखमलाबाद, हनुमानवाडी, रामवाडी व क्रांतीनगर विभागातील भागांचा समावेश आहे. महापौर मुर्तडक या प्रभागातून मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांचा मुख्य सामना भाजपचे विद्यमान नगरसेवक दामोदर मानकर व शिवसेनेचे दीपक पिंगळे यांच्याशी आहे. या प्रभागात तीन अपक्षही मैदानात असून, त्यांचा फटका कोणाला बसतो यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

यंदा निवडणूक प्रभाग रचनेमध्ये बदल केल्यामुळे अतिरिक्त भागांचा समावेश झाल्याने महापौरांसाठीही निवडणूक अटीतटीची ठरू शकते. या प्रभागातील चारही प्रवर्गात मनसेने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा महापौरांना होणार असला तरी या विभागात भाजप व सेनेबरोबर त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील अनुसूचित जमाती जागेसाठी मनसेने चित्र तांदळे, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी शितल थोरात व सर्वसाधारण महिला जागेसाठी छाया काकड यांना उमेदवारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचारासाठी भाजपचे प्रभागनिहाय ‘पालक’

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत विविध निवडणूक यंत्रणेचे काम प्रभावी पणे व्हावे, यासाठी निवडणूक विशेष प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय पालक पदाधिकारी तसेच विविध समित्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

महापालिका प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनांसदर्भात बैठक झाली. यात भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ. अपूर्व हिरे, प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, प्रशांत जाधव, विजय साने, काशीनाथ शिलेदार, पवन भगुरकर, योगेश चौधरी, सुनील देसाई आदी उपस्थित होते. यावेळी रघुनाथ कुलकर्णी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेचे नियोजन करून प्रभावीपणे काम करावे तसेच बारीकसारिक गोष्टींचा अभ्यास करून समित्यांचे काम प्रभावीपणे व्हावे, असे सांगितले.

बैठकीत जबाबदारी निहाय समिती प्रमुखांची घोषणा करण्यात आली. बूथ रचना व बूथ मेळावे यासाठी प्रशांत जाधव, सुनील देसाई, जाहीर सभेसाठी प्रशांत जाधव, काशिनाथ शिलेदार, प्रचार प्रसिद्धी व सोशल मीड‌ियासाठी गोविंद बोरसे, पवन भगुरकर, योगेश चौधरी, प्रचार साहित्यासाठी नंदकुमार देसाई, चौक सभेसाठी अॅड. अभिजीत बगदे, सुनील देसाई, अजिंक्य साने, अमित घुगे, तुषार जोशी, रश्मी हिरे आदींवर जबाबदाऱ्या सोपव‌िल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराची धामधूम, विद्यार्थी घामाघूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी, बारावीच्या तसेच विविध स्पर्धा परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. अभ्यास करण्यासाठी शांतता मिळावी, एकाग्रता निर्माण व्हावी, या उद्देशाने अभ्यासिकांमध्ये गर्दीही वाढू लागली आहे. मात्र, परीक्षांचा कालावधी व निवडणुकीची धामधूम एकत्रितच सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय सहन करावा लागत आहे. आता आपल्या अभ्यासाचे काय होणार या विचारानेच विद्यार्थी घामाघूम होऊ लागले आहे.

नुकत्याच पदवीधर महासंघाच्या निवडणुका पार पडल्या असून, आता सर्वांचेच लक्ष महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागले आहे. तर तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी संपूर्ण लक्ष प्रचारावर केंद्रित केले आहे. प्रचारात कोणतीही कमतरता होऊ नये, याची खबरदारी त्यांच्याकडून घेतली जात आहे. यामध्ये घोषणाबाजींपासून अगदी रस्त्यावर दिसणाऱ्या व्यक्तींना हात मिळवून निवडून देण्याची विनंती केली जात आहे. एकीकडे निवडणुकीचे रंग असे गडद होत आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या करीअरला कलाटणी देणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षाही काही दिवसांवर

आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहेत. शिवाय, स्पर्धा परीक्षांचे पेपरही येत्या काही दिवसांपासून सुरू होत आहे. या दोन्हीही महत्त्वाच्या बाबी एकत्र आल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची परवड होत आहे. परीक्षांपूर्वीचा एक महिन्याचा काळ अतिशय महत्त्वाचा असल्याने अशा वातावरणानी त्यांच्या डोक्यावर चिंतेचे सावट पसरलेले आहे.

पश्चिम कार्यालयाजवळ असलेल्या मुरकुटे अभ्यासिकेत मी अभ्यास करतो. सातत्याने या परिस्थितीत प्रचारांची घोषणाबाजी सुरू असते. पुढील महिन्यात एमपीएससीचा पेपर आहे. मात्र, अभ्यासिकांजवळ निर्माण झालेल्या अशा वातावरणामुळे अभ्यास करताना व्यत्यय येतो.

प्रशांत बांगर, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कुठे तिरंगी, कुठे पंचरंगी लढती

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत तीन प्रभागात दुहेरी निवडणूक सोडल्यास सात जागेवर तिरंगी, १३ जागेवर चौरंगी तर १६ जागेवर पंचरंगी निवडणुका होणार आहेत. या सर्व ठिकाणी काही प्रवर्गात अटीतटीच्या तर काही प्रवर्गात एकतर्फी निवडणूका होण्याची शक्यता आहे. ३१ प्रभागातील १२२ जागेवर होणाऱ्या या निवडणुकीसाठी आता अवघे ८२१ उमेदवार रिंगणात आहेत. यातील प्रमुख पाच पक्षाचे ४५० उमेदवार सोडल्यास ३७० हून अधिक उमेदवार हे अपक्ष आहेत. त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारतो हे महत्त्वाचे आहे.

या निवडणुकीत सर्वच प्रमुख पाच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असले तरी एकाही पक्षाला संपूर्ण १२२ जागेवर आपले उमेदवार देता आलेले नाहीत. भाजपने या निवडणुकीत १२० जागेवर उमेदवार दिले आहेत. तर शिवसेनेचे १११ उमेदवार रिंगणात असून, ९ ठिकाणी त्यांचे पुरस्कृत उमेदवार आहेत. मनसेचे १०२, राष्ट्रवादीचे ५८ व काँग्रेसचे ५१ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काही ठिकाणी थेट भाजपा-सेनेचा सामना होणार आहे. तर काही ठिकाणी हे प्रमुख पाच पक्षापैकी चार पक्ष समोरासमोर आहेत. या पक्षांबरोबरच छोट्या पक्षांचेही काही ठिकाणी उमेदवार प्रभाव दाखवू शकतात. त्यामुळे या निवडणुका वरवर सोप्या वाटत असल्या तरी प्रभागाच्या बदललेल्या रचनेमुळे विजयाचे आव्हान कायम असणार आहे. प्रभागातील प्रश्नांबरोबरच स्थानिक गणितेची महत्त्वाची ठरणार आहेत. त्यात जातपात, वैयक्त‌िक प्राबल्याचा समावेश आहे. तसेच प्रभागातील विकासासाठी नागरिक स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देतील, अशी शक्यता असल्याने याचा फायदा प्रभागात चारही उमेदवार उभे केलेल्या पक्षांना याचा फायदा होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ व्हिडीओचे चौकशीनाट्य

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत भाजपच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. भाजप कार्यालयात उमेदवारी वाटपाच्या वेळेस स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये माग‌ीतल्याच्या व्हिडीओची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. दोन लाखापाठोपाठ दहा लाखांच्या व्हिडीओ प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी नाशिक पूर्व विभागातील आयोगाच्या एका भरारी पथकाने अचानक भाजप कार्यालयात धडक देवून संबंधित प्रकरणाची चौकशी केली. परंतु भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पथकाकडे चौकशी व तक्रारीचे लेखी आदेश आहेत का अशी विचारणा केल्याने पथकातील अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले. चौकशीचे लेखी आदेश नसल्याने अखेर पथकाला रिकाम्या हातानेच परतावे लागले.

महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे प्रचार सुरू झाला असताना भाजपमागे लागलेल्या भानगडी संपत नसल्याचे चित्र आहे. तिकीट वाटपात झालेल्या झालेल्या गोंधळप्रकरणी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर सोशल मीड‌ियातून आरोप होत आहेत. तिकीट वाटपावेळी भाजप कार्यालयातच दोन लाख रुपये उमेदवारीसाठी व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ गोपाळ पाटील यांचा दहा लाखाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर मंगळवारी सुरेखा दाणी यांनी तिकीटासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या आरोपांची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. परंतु याप्रकरणी पक्षाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या या प्रकरणांची निवडणूक आयोगाने मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आचारसंहीता अंमलबजावणी पथकाने अचानक धडक दिली. उमेदवारीसाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांची प्राथमिक चौकशी करण्याचा प्रयत्न नाशिक पूर्व विभागातील तीन अधिकाऱ्यांनी केला. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता पथकाकडेच चौकशीचे लेखी आदेश आहेत का? अशी करीत चौकशी पथकाला माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पदाधिकारी व आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्ये वादविवादही रंगले. निवडणूक आयोगाच्या लेखी पत्राला पक्षाकडून लेखी उत्तर दिले जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर चौकशी पथकाचे अधिकाऱ्यांना परतावे लागले.

चौकशी पथकात तीन अधिकारयांसह दोन पोलीस कर्मचारी व दोन व्हिडिओग्राफरचा समावेश होता. मात्र लेखी आदेश नसल्याने पथक माघारी फिरले असले तरी भाजपमागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.

याप्रकरणी प्राथमिक चौकशी असल्याने लेखी पत्र देण्यात आले नव्हते, मात्र आता या प्रकरणाची लेखी स्वरुपात पत्र देऊन चौकशी करण्यात येणार आहे.

शिवाजी काळे, प्रमुख,

आचारसंहिता पथक, नाशिक

पूर्व विभागातील आचारसंहिता विभागातील अधिकारी चौकशीसाठी आले होते. पथकाला काय माहिती हवी आहे, याची लेखी माहिती द्यावी, असे आम्ही सांगितले. पथकाने लेखी माहिती दिल्यास त्याला लेखी स्वरूपात उत्तरे दिले जाईल.

लक्ष्मण सावजी, सरचीटणीस, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्षांना येणार अच्छे दिन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीसाठी माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झाले असून, बुहतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. विशेषता अपक्षांनी या लढतीमध्ये रंगत वाढवली आहे. तब्बल २७५ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकीकडे अपक्षांची संख्या मोठी असताना, प्रमुख राजकीय पक्षांकडे मात्र उमेदवारांची कमतरता असल्याचे चित्र आहे. सत्तेसाठी आतुर झालेल्या भाजप व शिवसेनेलाही पूर्ण क्षमतेने उमेदवार उतरवता आलेले नाहीत.
माघारीनंतर आता कोणत्या प्रभागात किती अपक्ष व राजकीय पक्षांचे उमेदवार शिल्लक आहेत याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावरील ६ राजकीय पक्ष तसेच राज्य स्तरावरील ४ राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर छोट्या १२ पक्षांचे उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. महापालिकेच्या १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सर्वाधिक २७५ उमेदवार हे अपक्ष आहेत. भाजपचे ११९ उमेदवार रिंगणात आहेत, तर शिवसेनेकडे ११२ उमेदवार अधिकृतरित्या आहेत. त्यानंतर मनसेकडे ९७ उमेदवार असून, काँग्रेसकडे ५४ तर राष्ट्रवादीकडे ४१ अधिकृत उमेदवार आहेत. बसपाने ३२ उमेदवार तर भाकपकडे १४ अधिकृत उमेदवार आहेत.

तगडे उमेदवार खाणार ‘भाव’!

राष्ट्रीय, राज्यस्तरीय व छोट्या पक्षांची मोठी संख्या असतांनाही अपक्षांची संख्या मोठी आहे. या अपक्षांमध्ये तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे अपक्षांच्या वाढलेल्या संख्येचा फटका कोणाला बसतो याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. सद्यस्थितीत तरी एखाद्या पक्षाला बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. त्यामुळे सत्तेच्या बेरजेत अपक्षांची संख्या विक्रमी असल्याने ते भाव खातील अशी चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. गेल्यावेळेस पालिकेतील केवळ सहा अपक्षांनी सत्तेची सर्व पदे भोगली. त्यामुळे यंदाही अपक्षांना सत्तेची फळे चाखायला मिळतील, अशी शक्यता अधिक आहे.

पक्ष आणि उमेदवार संख्या

भारतीय जनता पार्टी : ११९, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी : ५४, माकपा : २, भाकपा : १४, बहुजन समाजवादी पार्टी : ३२, शिवसेना : ११२, मनसे : ९७, एमआयएमएम : ९, समाजवादी पार्टी : ३, जनसुराज्य शक्ती : १, राष्ट्रीय समाज पक्ष : ५, भारीप बहुजन महासंघ : १४, बहुजन विकास आघाडी : ६, आरपीआय (सेक्युलर) : ४, धर्मराज्य पक्ष : ११, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया : २, संभाजी ब्रिगेड : २, भारतीय संग्राम परिषद : ६, बहुजन रि.सोशलिस्ट पार्टी : ३, भारतीय जनहित काँग्रेस पार्टी : १, आरपीआय (ए) : ८ तर अपक्ष २७५ असे एकूण ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीसीपीआर नाशिककरांना जाचक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहराची फुटलेली शहर विकास नियमावली जशीच्या तशी लागू झाली तर शहरातील सामान्य नागरिकांना घरे बांधणे व जमीन विकासाच्या स्वप्नांवर पाणी फिरणार आहे. शहरातील जुने नाशिक व गावठाण भाग हा कायम विकासापासून कोसो दूर राहणार असल्याचे चित्र असून, इतर शहरांच्या तुलनेत शहराची पूर्णपणे आर्थिक आणि सामाजिक कोंडी करण्याचा भाजप व शिवसेना युती सरकारचा डाव असल्याची टीका आमदार जयवंत जाधव यांनी केली. सदर नियमावलीला आमचा विरोध असून या नियमावलीत जाचक अटी रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार जाधव यांनी म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर मतांचा जोगवा मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहराचा विकास आराखडा मंजूर केला. त्यानंतर शहर विकास नियंत्रण नियमावली काल दिवसभरात सोशल मीड‌ियावर फिरत होती. सदर नियमावली ही प्रथमदर्शनी खरी असल्याचे दिसते आहे. ही नियमावली जर नाशिक शहरासाठी जशीच्या तशी लागू झाली तर नाशिक शहरातील गावठाणातील ९० टक्के तसेच नाशिक शहराचा सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या घरबांधणी व जमीन विकासाच्या स्वप्नांवर पाणी फिरणार आहे. तसेच शहरातील कपाटाचा प्रश्न पुन्हा एकदा जाचक अटींमध्ये अडकून पडणार असून, नाशिक शहर विकासापासून कोसो दूर राहणार आहे.
या सरकारने बाल्कन्या बंद करता येणार नाही, अशी जाचक तरतूद नवीन नियमावलीत केलेली दिसते. नियमावलीनुसार लहान रस्त्यांच्या लगत टीडीआर नसल्याने तेथील नागरिकांना आपली घरे छोटी बांधावी लागणार आहेत. पुणे व इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहराला लावलेल्या या अटी अधिकच जाचक असून, नाशिक शहराला कोंडीत पकडण्याचा सरकारचा हेतू असल्याचे यातून दिसून येत आहे. आघाडी सरकारनंतर नाशिक शहरातील सर्वच विकासाच्या कामांना ब्रेक लागला असून, नाशिक शहरातील महत्वपूर्ण कार्यालये व उद्योग पळविण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे आणि त्यानंतर नियमावलीच्या प्रश्नांवर शहराची कोंडी करण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले.

भाजपची कोंडी, बिल्डरांमध्येही अस्वस्थता

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटलेल्या शहर विकास नियंत्रण नियमीवलीबाबत अनिश्चितता कायम आहे. राज्य सरकारकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात न आल्याने ही नियमावली खरी की खोटी याबाबतचा संभ्रम वाढला आहे. महापालिकेने मात्र आपल्याकडे अधिकृत काहीच आले नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. दुसरीकडे भाजपची अस्वस्थता वाढली असून नियमावली अशीच राह‌िली तर पक्षाचे मोठे नुकसान होणार असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, विरोधकांनी या नियंत्रण नियमावलीवर तीव्र टीका केल्याने भाजपच्या अडचणीत भरच पडली आहे. सरकारने शहर विकास आराखडा भागशः प्रसिध्द केला आहे. त्यानंतर महीनाभरात शहर विकास नियंत्रण नियमावली येणे अपेक्ष‌ित होते. पंरतु अद्याप नियमावली अधिकृतपणे आलेली नाही. त्यामुळे नगररचना विभागाचीही कोंडी झाली असून, नेमक्या परवानग्या कोणत्या नियमावलीच्या आधारे द्यायच्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाकडून आता मार्गदर्शन मागवण्याची तयारी पालिकेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस मॅरेथॉनमध्ये परदेशी स्पर्धक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहर पोलिसांच्या पुढाकाराने १२ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जवळपास साडेदहा हजार स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा स्पर्धकांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून, स्पर्धेसाठी विविध देशांमधील ३५ स्पर्धकांनी सहभागी होण्याची तयारी केली आहे. यंदा १५ हजारांपेक्षा अधिक स्पर्धक धावणार असून, यामुळे मॅरेथॉनची रंगत वाढणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून, नियोजन प्रोफेशनल पध्दतीने करण्यात आले आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलिसांच्या नियोजनावर फरक पडलेला नाही. कायदा व सुव्यवस्थेचे काम सांभाळत अधिकारी मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनाला हातभार लावत आहेत. व्यावसायिक पध्दतीने आयोजन होत असून, त्यामुळे या स्पर्धेत देशविदेशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. आजवर सुमारे साडेदहा हजार स्पर्धकांची नोंदणी झाली असून, १२ तारखेपर्यंत हा आकडा १६ हजारांपर्यंत पोहचणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले. स्पर्धेसाठी अमेरिकेसह दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, तैवान, दक्षिण कोरिया या आठ देशांतील ३५ धावपटूंनीही नोंदणी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे स्थानिक स्पर्धकांचा उत्साह वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्षपदाकडे बागलाणचे लक्ष

$
0
0

कैलास येवला, सटाणा

तब्बल ४० वर्षांपासून नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापासून वंचित असलेल्या बागलाण तालुक्याने यंदा अध्यक्षपद इतर मागासवर्ग महिला आरक्षित झाल्याने लाल दिव्यासाठी महिला उमेदवारांना रणांगणात उतरविले आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या चारही पक्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गातील महिलांना उमेदवारी दिल्याने बागलाणला यावेळी मोठी संधी दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल ७ जागा असलेल्या बागलाण तालुक्याला नेहमीच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या लाल दिव्याने हुलकावणी दिली आहे. १९७४ साली तत्कालीन जि. प. सदस्य मोतीआण्णा सूर्यवंशी यांच्या रुपाने बागलाण तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले होते. यानंतर या पदाची नेहमीच तालुक्याला आस लागून होती.

सन १९९७-९८ मध्ये देखील ठेंगोडा गटाचे जि. प. सदस्य यशवंत पाटील यांना काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. त्यावेळी पंढरीनाथ थोरे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. काँग्रेस पक्षातील मत विभागणीचा परिणाम झाल्याने यशवंत पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी पराभूत व्हावे लागले होते. याचे शल्य आजही तालुकावासियांच्या मनात कायम आहे.यावेळी अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षित आहे. बागलाण तालुक्यात सात पैकी तब्बल तीन गट या पदासाठी आरक्षित असल्याने राजकीय मातब्बरांनी अध्यक्षपदासाठी परफेक्ट प्लॅनिंग केले आहे.

ठेंगोडा जिल्हा परिषद गटात माजी जि. प. सभापती यशवंत पाटील यांनी पत्नी तथा माजी जि. प. सभापती संगिता पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे. याच गटात काँग्रेसचे विद्यमान जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी पत्नी सारिका पाटील यांना उमेदवारी देऊन जि. प. अध्यक्षपदावर डोळा ठेवला आहे.
ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटातही मविप्रचे माजी उपसभापती व भाजपचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव यांनी पत्नी लता बच्छाव यांना रिंगणात उतरवून अध्यक्षपदासाठी रणनीती आखली आहे. याच गटात शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य प्रशांत बच्छाव यांनीही पत्नी वर्षा बच्छाव यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून लाल दिव्यासाठी जोर जावला आहे. काँग्रेसकडून जायखेडा गटातून महेंद्र भामरे यांनी पत्नी रेणुका भामरे यांना उमेदवारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला उमेदवारांमध्ये मालेगावात रंगणार लढत

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. अनेक गट-गण महिला आरक्षित झाल्याने प्रस्थापित व इच्छुकांच्या राजकीय महत्वाकांक्षांना ब्रेक लागला. आरक्षणामुळे असले तरी यातून मार्ग काढत हिरमोड झालेल्यांनी आपल्याच घरातील महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावत तिकीट मिळवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवार जरी महिला असल्या तरी त्यांचे पती, चिरंजीव, वडील, सासरे हेच झेरॉक्स उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यातून गट गणांसाठी दाखल झालेल्या एकूण १६० अर्जांपैकी ४७ अर्ज हे महिला उमेदवारांचे आहेत. यात पंचायत समितीसाठी ३४ तर जिल्हा परिषदेसाठी १३ महिला उमेदवार रिंगणात आहेत. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी महिला आरक्षण नसलेल्या गट गणातून महिला उमेदवारांना तिकीट देण्याचे धरिष्ठ दाखवलेले नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे.

गटातील उमेदवारांवर नजर टाकली असता ७ पैकी ३ गट महिला आरक्षित आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपने तीन तीन महिला उमेदवार दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने काँग्रेसकडे असलेल्या दोन्ही गटात जि.प.साठी एकही महिला उमेदवार रिंगणात नाही. तर राष्ट्रवादीकडे ५ गट असून, त्यापैकी महिला आरक्षित असलेल्या तील गटातूनच महिला उमेदवार दिले आहेत. अपक्ष म्हणून ४ महिला उमेदवार रिंगणात आहेत. गणातूनदेखील महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. १४ पैकी ७ गण महिला राखीव आहेत.

त्यामुळे या सात गणातून सेना भाजपने मातब्बर महिला उमेदवार दिले आहेत. तर आघाडीकडून पाचही गणातून महिला उमेदवार देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने ९ पैकी ४ जागी महिलांना संधी दिली आहे. गणांतून ९ अपक्ष महिला उमेदवार रिंगणात असून पक्षाकडून तिकीट न मिळालेल्यांची संख्या अधिक आहे. संभाजी ब्रिगेडने देखील तीन गणातून उमेदवार दिले आहेत. त्यापैकी झोडगे व चिखलओहाळ गणातून दोन महिला उमेदवारांना संधी दिली आहे.

दाभाडी, सौंदाणे, कळवाडी गट लक्षवेधी
दाभाडी, सौंदाणे, कळवाडी गट सर्वसाधारण महिला आरक्षित आहेत. कळवाडी गटातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे, भाजपचे लकी गिल यांच्या मातोश्री बलबीरकौर गिल यांच्यात लढत आहे. तर दाभाडी गटात सेनेच्या संग‌ीता निकम, भाजपच्या विद्या निकम, राष्ट्रवादीच्या अंजना देवरे यांच्यात चुरशीची लढत आहे. सौंदाणे गटात सेनेकडून मनीषा रत्नाकर पवार तर भाजपकडून वैशाली सुनील पवार, राष्ट्रवादीकडून पुष्पा देसाई यांच्यात सामना रंगणार आहे. गणात सर्वसाधारण महिला आरक्षित असलेल्या झोडगे, वडनेर, सौंदाणे गणातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये विकास आघाडीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर निफाड तालुक्याचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहचण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेतील बंडाळी, राष्ट्रवादीतील नाराजी या पार्श्वभूमीवर तालुक्यात विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, तालुक्यातील सर्व गटात विकास आघाडीचे उमेदवार उभे करण्यासाठी यतीन कदम, राजेंद्र डोखळे यांच्यात बैठक घडविण्याचे प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी सुरू केले आहेत.

कदम-डोखळेंची आघाडी निर्माण झाल्यास शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर बनकर, जयदत्त होळकर, संदीप टर्ले बाळासाहेब क्षीरसागर आदी नेत्यांना सेनेनेही उमेदवारी बहाल केल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पालखेड, उगाव, चांदोरी गटात कट्टर शिवसैनिक बंडखोरीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. बंडखोर शिवसैनिकांनी सेनेच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान दिल्यास निफाड तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसेल अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणूक लक्ष ठेऊन बड्या नेत्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणि त्यांना जि.प. ची उमेदवारी देण्याची खेळी आमदार अनिल कदम यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांची राजकिय कोंडी करण्यासाठी तालुक्यातील काही नाराज सैनिक सक्रिय झाले असल्याचे समजते. यातूनच यतीन कदम व राजेंद्र डोखळे यांची विकास आघाडी तयार झाल्यास आघाडीला चांगले यश मिळेल, असा सूर कार्यकत्र्यांमध्ये आहे.

यतीन कदम यांनी ओझर गटात उमेदवारी करण्याचा निर्णय घेत कसबे सुकेणे चांदोरी सायखेडा गटात विकास आघाडीचे उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ओझर परिसरात यतीन कदम यांचे प्रभुत्व निवडणुकिसाठी त्यांनी केलेली सज्जता याचा अंदाज घेत आमदार कदम यांनी ओझर गटात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार देण्याचे टाळले. कदम परिवाराच्या संघर्षात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा नको या विचारातून आमदार कदमांनी अंतर्गत संघर्ष टाळल्याचे बोलले जात आहे. इकडे पालखेड गटात शिवसेनेने भास्कर बनकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक व कारसूळचे उपसरपंच देवेंद्र काजळे यांनी बंडाचे निशाण फडकवत पालखेड गटात आक्रमक प्रचाराचा प्रारंभ केला आहे. उगाव गटातही बाळासाहेब क्षीरसागर यांना सेनेने उमेदवारी दिल्याने आमदार कदमांचे सहकारी राजेंद्र डोखळे यांनी बंडखोरीचे संकेत देत प्रचारास प्रारंभ केला आहे. चांदोरी गटात संदीप टर्ले यांच्या उमेदवारीने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुख उत्तम गडाख यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आघाडी किंवा भाजपमध्ये फारशा कुरबुरी नसल्या तरी पालखेड गणात संजय वाळूंज यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर देवगाव गटातही अमृता पवार यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नाराजांची मोट बांधून संपूर्ण तालुक्यात विकास आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून यतीन कदम यांचे नेतृत्व फुलविण्याची राजकिय खेळी या निमित्ताने खेळली जाणार आहे.

आमदार अनिल कदम यांना वेळोवेळी अनेक निवडणुकीत मदत केली. त्यांची पाठराखण केली. मात्र त्यांनी कधीही विश्वासात घेतले नाही. तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांची हीच अडचण असल्याने आमदार कदमांवर तालुक्यात मोठी नाराजी आहे. उगाव गटातून उमेदवारी करणार असून यतीन कदम यांच्या बरोबर युती करून निफाड तालुक्यात विकास आघाडी स्थापन करणार आहे.

- राजेंद्र डोखळे, संचालक, लासलगाव बाजार समिती

ओझर, सुकेणा व चांदोरी गटासाठी आपण विकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. चांदोरीत उत्तम गडाख यांच्यांशी बोलणी सुरू आहे. राजेंद्र डोखळे यांच्याशी चर्चा करून पालखेड, उगाव व इतर गटाबाबत विकास आघाडीचे निर्णय घेतला जार्इल.- यतीन कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये अपक्षांकडे लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवडमधून विविध गटात व गणात अपक्षांची मोठी रेलचेल असल्याने अपक्ष या निवडणुकीत मोठी भूमिका बजावतील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. काँग्रेसचे राहुल कोतवाल, भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे, शिवसेनेचे शांताराम ठाकरे अशी लढत असून या शिवाय अपक्ष देखील निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी स्थानिक विकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्नसुद्धा लक्षवेधी आहे. तसे झाल्यास ही आघाडी कोणाला मारक ठरेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चांदवडमध्ये नगराध्यक्षपद तसेच बाजार समिती सभापतीपद भाजपकडे आहे. जि. प. व पं. स. निवडणुकीत सेनेने व भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आता शिवसेनेला भाजपशी टक्कर द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने चांदवड तालुक्यात ग्रामीण भागात शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे. बाजार समितीचे उपसभापती नितीन आहेर, उपनगराध्यक्ष कविता उगले यांच्यासह सेनेचे नेते एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी आमदार शिरीष कोतवाल, उत्तमबाबा भालेराव, राष्ट्रवादीचे डॉ. गायकवाड यांनी आघाडीद्वारे सेना व भाजप समोर आव्हान उभे केले आहे. तर आमदार राहुल आहेर, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व ज्येष्ठ नेत्यांनी तालुक्यात भाजपची सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयमच्या जिद्दीला सागराची गाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजाराने खचून न जाता त्यावर मात करून सागरालाही आव्हान देणाऱ्या नऊ वर्षीय बालकाच्या जिद्दीने अनेकांना उभारी दिली आहे. संक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे सागरी अंतर पोहण्याचे त्याचे ध्येय असून, ही कामगिरी साधल्यास त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होऊ शकेल. जन्मतःच डाऊन सिंड्रोमसारख्या आजारावर मात करणाऱ्या स्वयम विलास पाटील याची ही कहाणी.

स्वयम राणेनगरच्या जाजू प्राथमिक विद्यामंदिरात तिसरीत शिकत असून, आजपर्यंत त्याने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्याला नुकतीच राज्य जलतरण संघटनेने परवानगी दिली असून, ११ फेब्रुवारी रोजी तो हे अंतर पार करणार आहे. डाऊन सिंड्रोम हा जनुकीय आजार कधीही बरा होत नाही. त्या अनुषंगाने येणाऱ्या शारीरिक व मानसिक व्याधींवर मात करून तो हे रेकॉर्ड करणार आहे. आजपर्यंत हृदय, कान, नाक, घसा याचे ऑपरेशन्स झाले आहेत. त्याचप्रमाणे स्नायूंच्या कमकुवतपणामुळे त्याला रांगणे आणि चालणे या क्रियाही उशिरा करता येऊ लागल्या. कमजोर दृष्टी, एकाग्रतेचा अभाव, हायपर थायरॉइड या आजारांवरही त्याने मात केली आहे.

तो रोज दोन ते अडीच किलोमीटर सराव करतो. औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने गोल्ड आणि सिल्व्हर मेडल जिंकले होते. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मालवण येथे झालेल्या सागरी स्पर्धेत त्याने दोन किलोमीटर अंतर अवघ्या १७ मिनिटांत पार केले होते. नाशिक येथे झालेल्या अॅक्वाथॉन स्पर्धेत १०० मीटर स्वीमिंग व दोन किलोमीटर रनिंगमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले होते. आपल्या नावावर रेकॉर्ड असावे असे त्याला या वयातच वाटत होते. त्याच्या आवडीला प्रोत्साहन देण्यचे काम त्याच्या आईवडिलांनी केले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या सरावासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांनी मेहनत घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारणे कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार आहे. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला दांडी मारलेल्या ३०० कर्मचाऱ्यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी १४३ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी अद्याप १५७ कर्मचाऱ्यांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या १५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली असून, शुक्रवारी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. भारतीय लोकशाही अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हे गुन्हे दाखल केले जाणार असून, त्यात एक वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेच्या वतीने निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण कार्यशाळा आयोज‌ित करण्यात आली होती. विविध शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांतील प्राध्यापक, लिपिकांचा समावेश होता. दादासाहेब गायकवाड सभागृह, काल‌िदास कलामंद‌िर, राजे संभाजी स्टेड‌ियममध्ये स्वतंत्रपणे ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जवळपास १६०० पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांना निवडणूकप्रक्रिया हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार होते. मात्र, या प्रशिक्षण कार्यशाळेला जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे महापालिकेने या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या. त्यापैकी १४३ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रमात हजर राहण्याचे महापालिकेला कळवले असून, त्यांचे १२ तारखेला पुन्हा प्रशिक्षण होणार आहे.

एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

नोटिसांकडे १५७ कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून, महापालिकेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेने या कर्मचाऱ्यांना रडारवर घेत, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. भारतीय लोकशाही अधिनियम १९५१ चे कलम १३४ व राज्य निवडणूक आयोग यांचा २ मार्च १९९५ मधील तरतुदीनुसार हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या तरतुदीनुसार निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शास्ती किंवा एक वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच भोवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांचा ‘सातबारा’ सार्वजनिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाच्या नियमामुळे उमेदवारांनी आपल्या शपथपत्राचा संगणकीय प्रणालीमधून दिलेला गोषवारा मतदानापूर्वी महापालिकेला एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे हा गोषवारा मतदान केंद्राबाहेर फ्लेक्सच्या स्वरुपात लावणे अनिवार्य केल्यामुळे त्याचाही भुर्दंड महापालिकेला सोसावा लागणार आहे. या निवडणुकीत एका प्रभागात सरासरी ५० मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे याचा खर्च जाहिरातींपेक्षा जास्त असणार आहे.

उमेदवारांच्या शपथपत्राचा गोषवारा सर्वसामान्य मतदारांना कळावा यासाठी ही मोहीम आहे. यात प्रभाग क्रमांक व त्याचा प्रवर्ग, त्यानंतर उमेदवाराचे नाव, शैक्षणिक अर्हता, जंगम व स्थावर मालमत्ता, थकीत रकमा, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा आठ काॅलममध्ये माहिती देऊन ती प्रसिद्ध करावी लागणार आहे. प्रथमच हा नियम काढल्यामुळे उमेदवारांचा सातबारा प्रकर्षांने सर्वांसमोर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरला कावळ्यांचे गूढ मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सातपूर गावालगत असलेल्या महादेवनगर भागातील महादेवाच्या मंदिराला लागून असलेल्या वृक्षांवर कावळ्यांची घरटे आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अचानक १५ ते २० कावळे एकामागून एक वृक्षावरून पडत बेशुद्ध होत होते. त्यानंतर काही वेळाने त्या कावळ्यांचा मृत्यूदेखील झाला. अचानक कावळ्यांच्या मृत्यूने सातपूरच्या महादेवनगर भागात तर्क वितर्कांना उधाण आले होते. कावळ्यांच्या मृत्यूबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला विचारले असता विषबाधेने कावळे मृत झाले असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महादेवनगर भागात मंदिराच्या शेजारी जुन्या चार वृक्षांवर कावळ्यांची घरटी होती. रोजच पहाटे कावळ्यांची ‘कावकाव’ तेथील रहिवाशांना ऐकू यायची. परंतु, अचानक कावळ्यांचा आवाज बंद कसा झाला, हे पहाण्यासाठी तेथील रहिवाशी विजय आहिरे गेले. मंदिराच्या जवळ आहिरे गेले असता काही कावळे अस्ताव्यस्त अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यांनतर टप्प्याटप्प्याने वृक्षांवर बेशुद्ध अवस्थेत कावळे एकामागून एक पडत असल्याने नेमके काय झाले असावे, याबाबत चर्चा सुरू झाली. अचानकपणे कावळे मरून पडत असल्याची बातमी महादेवनगरला पसरल्यावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता विषबाधेमुळे कावळ्यांचा मृत्यू झाला असावा, अशा शंका त्यांनी व्यक्त केली.


पहाटे अचानक कावळ्यांचा आवाज बंद का झाला हे बघण्यासाठी महादेव मंदिरात आलो होतो. यावेळी वृक्षांवरून कावळे खाली पडत असल्याचे दिसले. यात तब्बल १५ ते २० कावळे मयत झाले आहेत.
- विजय आहिरे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसरंगाची करीत उधळण आला वसंत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वृक्षलतांचे देह बहरले,
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला
आला, आला वसंत ऋतू आला
असं कवींनी वर्णन केलेल्या ऋतुराज वसंताची चाहूल लागली आहे. पळसफुलांचे वृक्ष बहरू लागले असून आंब्यांचाही मोहर ऐन भरात आला आहे. लवकरच वसंताचे आगमन होणार असल्याने वातावरणातील बदल जाणवू लागला आहे. १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वसंताचा भर पहिला दीड महिना राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वसंत ऋतू म्हणजे मोहरलेली आंब्यांची झाडे, पेटत्या पलित्यासारख्या भासणाऱ्या पळसफुलांचे वृक्ष, अंगाला झोंबणारा भरार वारा, कोकिळेचे कुजन, रंगांचा व सुगंधाचा उत्सव. वर्षभरात वैशाखात येणारा ग्रीष्म, आषाढात येणारा वर्षा ऋतू, भाद्रपद महिन्यात येणारा शरद, कार्तिक महिन्यात येणारा हेमंत, पौषातला शिशिर तर फाल्गुनात डोकावणारा व चैत्रात बहरणारा वसंत असे सहा ऋतू असतात. यातील वसंताला ऋतूराज मानले जाते. कारण याच काळात हिरवाई बहरते. झाडांना नवी पालवी फोडणारा असल्याने वसंतात सर्जनशीलतेला वाव असतो. त्यामुळे कवी, लेखक, कलावंत यांची प्रतिभा याच काळात फुलते. वसंतातच अनेक ठिकाणी काव्यगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. इतकेच नाही तर संग‌ीताला वसंत ऋतूने अनोखे वरदान दिलेले असून, वसंत बहार रागाच्या मैफली याच काळात होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला मेगा बूस्ट

$
0
0

महिंद्राची १५०० कोटींची गुंतवणूक

म. टा. खास. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक : नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुन्हा एकदा नाशिकला मोठा बूस्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडियांतर्गत पुढील वर्षापर्यंत नाशिक आणि इगतपुरीच्या प्लांटमध्ये एकूण १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे प्रत्यक्ष ७००, तर अप्रत्यक्षरित्या शेकडो रोजगार उपलब्ध होऊन नाशिकच्या उद्योगाला चालना मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर नाशिकमध्ये एवढी मोठी गुंतवणूक होणार असल्याने ठप्प झालेला विकास मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

महिंद्र अँड महिंद्र कंपनीने नाशिक आणि इगतपुरी येथील उत्पादन प्रकल्पात १५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात कार उत्पादन व इंजिन बनविण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या उद्योगांना बूस्ट मिळणार आहे. हा नवा यु ३२१ प्रकल्प असून, महिंद्रच्या नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटरमध्ये तो विकसित केला आहे. आता तो या वर्षभरात नाशिकमध्ये कार्यान्वित होणार आहे. महिंद्राचे मुंबईतील कांदिवली, पुण्यातील चाकण आणि नाशिक, इगतपुरी येथे प्रकल्प आहेत. यातील नाशिक व इगतपुरी येथील प्रकल्पाची निवड केली आहे. नाशिकच्या प्रकल्पात कंपनीकडून झायलो, क्वांटो ,व्हेरिटो व बोलेरो या व्हेइकलची निर्मिती केली जाते. इगतपुरीच्या प्रकल्पात इंजिन बनविण्यात येते. या नव्या प्रकल्पामुळे ५० हजार कारची निर्मिती होणार आहे. टोयोटाच्या इनोव्हा या कारशी स्पर्धा करणारी नवी कार महिंद्रा बनविणार आहे. महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि समूह अध्यक्ष पवन गोएंका यांनी वर्षभरापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

असा आहे प्रकल्प
नवा प्रकल्प : यु ३२१, शेकडो रोजगार होणार उपलब्‍ध, ५० हजार कारची निर्मिती होणार, वर्षाअखेरिस प्रकल्प कार्यान्वित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालेकिल्ल्यातच भाजपची कसोटी

$
0
0

बालेकिल्ल्यातच भाजपची कसोटी

Gautam.Sancheti

@timesgroup.com

sanchetigMT

नाशिकच्या सहा विभागांपैकी पंचवटी विभागाची निवडणूक शहरात सर्वाधिक लक्षवेधी राहणार आहे. या ठिकाणी विद्यमान महापौर, उपमहापौरांसह, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार यांचे पुत्र रिंगणात आहेत. भाजपच्या संभाव्य महापाैरपदाचे प्रबळ दावेदारही याच विभागात आहेत. राष्ट्रवीदाच्या विरोधी पक्षनेत्यांचाही हा विभाग असल्यामुळे येथील निवडणूक रंगतदार असणार आहे. नववसाहतींचा मोठा भाग असल्यामुळे येथे धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचा वरचष्मा असलेल्या या भागात शिवसेना व मनसेने कडवे आव्हान उभे केले आहे, तर काही प्रभागांत राष्ट्रवादीबरोबर निकराची झुंज होणार आहे.

पक्षनिहाय उमेदवार असे

गेल्या निवडणुकीत याच विभागात २४ पैकी भाजप व मनसेने प्रत्येकी सात जागा जिंकत समान ताकद दाखवली होती. त्या खालोखाल राष्ट्रवादीने पाच जागा मिळवून घड्याळाचा गजर केला होता. काँग्रेस व अपक्षांना प्रत्येकी दोन, तर शिवसेनला अवघी एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे असून, २४ जागांसाठी सहा प्रभागांतून तब्बल १३७ जण रिंगणात आहेत. त्यात प्रमुख पाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संख्या ८३ आहे. त्याचप्रमाणे छोट्या पक्षांचे आठ उमेदवार रिंगणात असून, ४६ अपक्ष उमेदवार आहेत. भाजपने सर्व २४ जागी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेचे २० उमेदवार असून, तीन जणांना पुरस्कृत करण्यात आले आहे. मनसेच्या पक्ष चिन्हावर २०, तर एक जण पुरस्कृत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असली, तरी या विभागात राष्ट्रवादीचे १२ व काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. बसपने आपले चार, तर आंबेडकर राइट, माकप, धर्मराज्य व रासपा यांचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे.

आमदारपुत्राला आव्हान

प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक रिंगणात असून, येथे चारही प्रवर्गांत राष्ट्रवादीने आपले उमेदवार दिले आहेत. याच प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांचा एबी फाॅर्मचा गोंधळ झाल्यामुळे येथे तिघांना पुरस्कृत केले आहे. ज्यांचा एबी फाॅर्म फाडला त्या सविता बडवे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी नगरसेवक भगवान भोगे व मनसेतून शिवसेनेत आलेले विद्यमान नगरसेवक डाॅ. विशाल घोलप यांच्या मातोश्री प्रतिभा घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. हे तुल्यबळ उमेदवार असले, तरी चिन्हाचा फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे भाजपनेही आपले चार उमेदवार येथे रिंगणात उतरवले आहेत. प्रभाग क्रमांक तीनमधील निवडणूक सर्वांचे लक्ष वेधणारी ठरणार आहे. या प्रभागात चार वेळा नगरसेवक झालेले भाजपचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपले पुत्र मच्छिंद्र यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आमदारांसाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. गेले काही दिवस आमदारांनी येथे जाेरदार प्रचार करून घरोघरी मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. याच प्रभागात आमदार सानप यांना अडकवून त्यांना जेरीस आणण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी ठाण मांडून शिवेसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याची व्यूहरचना आखली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब सानप यांचे कार्यकर्ते असलेले विलास आव्हाड यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतल्यामुळे सानप यांच्या पुढील आव्हाने वाढले आहे.

‘एसटी’ प्रवर्गात चुरस

प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या उद्धव निमसेंमुळे ही निवडणूक चर्चेत आहे. येथे भाजप, शिवसेना व मनसेने सर्व प्रवर्गांत उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने दोन, तर काँग्रेसने एकाच प्रवर्गात उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे निमसे यांच्या प्रवर्गात काँग्रेस व राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही. त्यामुळे येथील निवडणूक काही प्रवर्गातं तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी होणार आहे. या प्रभागात माकप, बसप व अपक्षही रिंगणात आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपच्या रंजना भानसी या पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यामुळे या प्रभागातील निवडणूक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भानसी यांच्याविरोधात विद्यमान नगरसेवक गणेश चव्हाण यांनी आपल्या पत्नी जयश्री चव्हाण यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथे अटीतटीची लढत आहे. इतर प्रवर्गांतही हेच चित्र आहे. एकूणच सहा प्रभागांत होणाऱ्या या निवडणुकीत गेल्यावेळेसारखे चित्र नसले, तरी भाजपचा वरचष्मा असलेल्या या भागात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.


पहिला निकाल पंचवटीतूनच!

स्थलांतरित, नववसाहत, झोपडपट्टी, जुने नाशिक असा संमिश्र भाग असलेला हा विभाग क्षेत्रफळानुसार मोठा आहे. पक्षांबरोबरच उमेदवारांनी कंबर कसली असून, घरोघरी प्रचार करून संपर्काची मोहीम वाढवली आहे. निवडणुकीच्या निकालाची सुरुवात याच प्रभागातून होणार असल्यामुळे आेपनिंगला असणाऱ्या या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष आहे. या प्रभागात सर्व राजकीय पक्षांत बंडखोरी व नाराजी आहे. त्यामुळे या बंडखोरांची उमेदवार व पक्ष कशी समजूत घालतात हे महत्त्वाचे अाहे. आघाडी व अपक्षांची डोकेदुखीसुद्धा आहेच. गेल्या वेळेस या विभागात मनसे व राष्ट्रवादीने यश मिळवल्यामुळे शिवसेनेला जोरदार झटका बसला होता. पण, आता भाजप व शिवसेनेने संपूर्ण निवडणूकच प्रतिष्ठेची केल्यामुळे येथे शिवसेना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जाेरदार कामाला लागली आहे. मनसेचे काही नगरसेवक शिवसेनेला मिळाल्यामुळे त्यांचाही जोर वाढला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी तर आमदारपुत्राच्या प्रभागात ठाण मांडून बसण्याचा इशारा दिल्यामुळे येेथे संघर्ष व स्पर्धा चुरशीची होणार आहे.


महापौर, उपमहापौरांच्या लढती

महापौर अशोक मुर्तडक हे प्रभाग क्रमांक सहामध्ये उमेदवार असून, त्यांची ही पाचवी निवडणूक आहे. यावेळी भाजप व शिवसेनेने त्यांना कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांच्या या प्रवर्गात अपक्ष नगरसेवक असलेल्या दामोदर मानकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने दीपक पिंगळे यांना रिंगणात उभे केले आहे. याच प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपमध्ये आलेले सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल या क प्रवर्गात उमेदवारी करीत आहेत. महापौरांप्रमाणेच या विभागात प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी ड प्रवर्गातून उपमहापौर गुरुमित बग्गा रिंगणात आहेत. येथे त्यांचा सामना राष्ट्रवादीचे माजी खासदार माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांच्याबरोबर आहे. त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आहे. शिवसेनेने या प्रवर्गात अनिल बागुल यांना उमेदवारी केली आहे. या प्रभागात सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले असले, तरी उपमहापौरांनी मनसेचे उल्हास धनवटे, नंदिनी बोडके व काँग्रेसेच्या नगरसेविका असलेल्या अपक्ष उमेदवार विमल पाटील यांना बरोबर घेऊन आघाडी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये गोंधळ कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आल्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना इच्छुकांच्या रोषाचा रोज सामना करावा लागत आहे. ध्येयनामा प्रकाशनासाठी भाजप कार्यालयात आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच उमेदवारी डावलेल्या महिलांनी रौद्र रूप धारण करत, उमेदवारी नाकारल्याचा जाब विचारला. त्यामुळे पालकमंत्र्यांनाही या गोधळात बंद खोलीत थांबून राहावे लागले. तिकीट नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या या रणरागिणींनी आपले काय चुकले, असा सवाल करत चुकीच्या लोकांना तिकिटे दिल्याचा आरोप केला, तर आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना एका महिलेला तिथेच रडू कोसळले. त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा खोटा ठरला आहे.

महापालिकेसाठी उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये सर्वाधिक गोंधळ झाला. एबी फॉर्म वाटपाच्या वेळेस प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरील वाद शमत नाही तोच दहा लाखांचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. निष्ठावंतांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी नाकारल्याचा आरोप होऊन अनेकांनी बंडाचा झेंडा उगारला आहे, तर अनेकांनी पैसे घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय सावरण्याचा प्रयत्न केल्याने आता वाद थांबतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी नाकारल्याचा उद्रेक शुक्रवारी भाजप कार्यालयात पुन्हा उफाळून आला.

ध्येयनामा प्रकाशित करण्यासाठी भाजप कार्यालयात आलेले पालकमंत्री महाजन यांच्यासमोरच दोन महिलांनी उमेदवारी नाकारल्याचा जाब विचारला. प्रभाग क्र. १२ मधून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या आशा कांबळे यांनी थेट पालकमंत्री महाजन यांची भेट घेऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेटू दिले नसल्याने त्यांनी केबिनबाहेरच गोंधळ घातला. या वेळी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. पालकमंत्र्यांना भेटू देण्याचा आग्रह केला. मात्र, कार्यकर्त्यांनी भेटू न दिल्याने त्यांना रडू कोसळले. आपल्याला उमेदवारी का नाकारली, असा प्रश्न उपस्थित केला. माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सारवासारव करत, कांबळे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तर प्रभाग क्र. २३ मधून भाजपतर्फे इच्छुक असलेल्या स्मिता बोडके यांनीही या वेळी गंभीर आरोप केले. उमेदवारी देताना मोठा घोळ झाल्याचा आरोप करत, ज्यांना कोणी ओळखत नाही, अशांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्या प्रकारामुळे पालकमंत्री महाजन यांच्यावर बंद खोलीत बसून राहण्याची वेळ ओढवली. भाजपमध्ये उमेदवारी वाटपात गडबड झाली नसल्याचा दावा पालकमंत्री करीत असताना, हा गोंधळ झाल्याने भाजपमध्ये अजूनही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images