टीम मटा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली खरी, मात्र पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नाही. पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरच अर्ज भरण्यास वेग येणार आहे. निवडणूक कक्षांमध्ये शुकशुकाटच होता. ऑनलाइनवर मात्र २६ उमेदवारांनी माहिती भरल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
मालेगाव ः तालुक्यातील सात जि. प. गट व १४ गणांसाठी निवडणूक होत असून, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. यावेळी प्रथमच इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे असल्याने अनेक इच्छुकांचा पहिला दिवस ‘भाऊ ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?’ या प्रश्नांचे उत्तर शोधण्यातच गेला. प्रशासनकडून अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यात आली असून प्रांत कार्यालात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गट-गणनिहाय एक मंडळ अधिकारी, दोन तलाठी असे २१ अधिकारी, १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ६ फेब्रुवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
निवडणुकीसाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी पहिल्या दिवशी ऑनलाइन प्रक्रिया अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे येथील प्रांताधिकारी कार्यालायात बुधवारी दिवसभर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यातच अनेकांचा वेळ गेला. यासाठी निवडणूक शाखेकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जात आहे. अर्ज दाखल करण्याचे संकेतस्थळ, आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, बँक खाते आदी कागदपत्रे याबाबत उमेदवारांना निवडणूक नायब तहसीलदार गिरीश वाखारे, जगदीश निकम यांच्याकडून मार्गदर्शन केले जात असून, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळाव करण्यासाठी प्रांत, तहसील, न्यायालय आदी कार्यालयांच्या आवारात बुधवारी इच्छुकांनी गर्दी केली होती. ऑनलाइन प्रक्रियेत काही त्रुटी राहून आपला अर्ज बाद होऊ नये यासाठी उमेदवार काळजी घेत आहेत. प्रांत आवारात तालुक्यातील उमेदवारांकडून मात्र ऑनलाइन प्रक्रियेबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अर्थात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने सर्वच इच्छुक कामाला लागले असून, महा ई-सेवा केंद्र, सायबर कॅफे याठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली आहे. दोन दिवसात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज आहे.
मनमाडमध्येही शांतता
मनमाड ः नांदगाव व चांदवड येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही. जिप व पं स निवडणुकीसाठी उमेदवारी कोण करणार? कोणत्या पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असून, आता गुरुवारी तरी उमेदवारी अर्ज भरण्याचा श्रीगणेशा होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारपासून दोन्ही तालुक्यांमध्ये वातावरण तापणार असून, पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुककांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
निफाडमध्येही चाचपणी
निफाड ः तालुक्यात बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. नाशिक जिल्हा परिषदेत सर्वात जास्त दहा गट निफाड तालुक्यात आहेत. पंचायत समितीसाठी २० गण आहेत. मात्र बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.
येवल्यातही पाटी कोरीच
येवला ः जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारी सुरुवात झाली खरी, मात्र येवला तालुक्यातील कुठल्याही गट अन् गणातुन बुधवारच्या पहिल्या दिवशी कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या निवडणूक प्रक्रियेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपले अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर ऑनलाइन भरायचे असून, संकेतस्थळावर भरलेल्या या अर्जाची प्रिंट काढून संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे. जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारी (दि.१) सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी तालुक्यात कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल दाखल न झाल्याने पहिल्या दिवसाची पाटी कोरीच राहिली. येवला तालुक्यातील पाटोदा,मुखेड,नगरसुल,राजापुर व अंदरसुल या जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह,येवला पंचायत समितीच्या पाटोदा,धुळगाव, मुखेड,चिचोंडी बुद्रुक,नगरसुल,सावरगाव,राजापुर, सायगांव,अंदरसुल व नागडे या दहा गणात पंचवार्षिक निवडणुक होत आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवाऱ्या जाहीर झाल्यावरच एकंदरीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस मोठा वेग येणार असल्याचे रागरंग दिसत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट