Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इच्छुक पोहोचले काठावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन नाशिक विभागातील सहा प्रभागांसाठी १७ इच्छुकांनी १८ ठिकाणी दावेदारी सांगत आपली माहिती भरली आहे. अद्याप त्यांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी यादीवर शिक्कामोर्तब झाले नसून, काठावर बसून इच्छुक उमेदवार आपल्याला संधी मिळणार काय, याची प्रतीक्षा करीत आहेत.

नवीन नाशिकमध्ये २४ ते २९ असे सहा प्रभाग असून, यात प्रमुख राजकीय पक्षांची ताकद पणाला लागली आहे. शिवसेना आणि भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी फौज आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच राष्ट्रवादीकडे थोडीफार ताकद असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून, प्रभाग २४ आणि २९ मधील उमेदवारांनी आपापली माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. माहिती भरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नाही. दाखल झालेल्या अर्जाची प्रत उमेदवारास विभागीय कार्यालयात जमा करावी लागणार आहे. मनसेचे पहिली यादी ३० किंवा ३१ जानेवारीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. इतर प्रमुख पक्षदेखील याच दरम्यान आपले उमेदवार निश्चित करतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने अर्जातील माहिती भरून ठेवत इच्छुक आपल्या उमेदवारीवर दावा करीत पक्षावर दबाव निर्माण करण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग २४ मधून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार प्रवीण सावळीराम तिदमे यांनी वॉर्ड क्रमांक अ, तसेच ड साठी उमदेवारी अर्जावरील माहिती भरली आहे. याच प्रभागातून अ वॉर्डातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. इच्छुक उमेदवारांमधील चढाओढीला सुरुवात झाल्याचे यातून दिसते. प्रभाग २५ (अ)मधून हेमंत ईश्वरलाल बिऱ्हाडे, २६ (ड)मधून अण्णा पाराजी आरोटो, २७ (अ) मधून किरण हरी ढवळे, २८ मधील अ मध्ये नयन दिलीप कोठावदे आणि विजय साहेबराव शिंदे, २८ ब मध्ये भाजपच्या इच्छुक अपर्णा रमेश गाजरे, २८ (ड)मधून साहेबराव गंगाधर दातीर, प्रभाग २९ च्या अ वॉर्डासाठी विठाबाई बाळासाहेब सोनवणे, ब वॉर्डामधून तुषार गजानन नागरे, तसेच संतोष लक्ष्मण सांगळे, क वॉर्डामध्ये मुक्तार अन्सार शेख, तसेच सुरेश रामचंद्र पवार आणि ड वॉर्डामधून शिवसेनेचे इच्छुक रमेश रामजी उघडे यांनी माहिती भरण्यात आघाडी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेचे वॉर कॅम्पेन

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने वॉर कॅम्पेनचे अस्त्र वापरण्याचे नियोजन केले आहे. आक्रमक आणि प्रभावी प्रचार करण्यासाठी सेनेचे पदाधिकारी झटून कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या एकमेव जाहीर सभेबरोबरच शहरातील विविध प्रभागांत सेनेतील मंत्र्यांच्या १२ सभा आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो असे भरगच्च नियोजन करण्यात येत आहे.

यंदा कुठल्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसेनेने परिणामकारक रणनीतीचा अवलंब करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपशी युती न करण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केला. तत्पूर्वी, उद्धव यांनी सेनेचे राज्यभरातील पदाधिकारी, सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना आणि वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे उद्धव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. या घोषणेद्वारे सर्व सेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत अवघ्या १४ जागा जिंकणारा भाजप यंदा सत्तास्थापनेच्या वल्गना करीत आहे. प्रत्यक्षात भाजपच्या जवळपास दुप्पट जागा शिवसेनेने गेल्या वेळी जिंकल्या होत्या, तसेच इतर पक्षांतील सत्ताधारी नगरसेवकांच्या जोरावर सद्यःस्थितीत शिवसेनेचे संख्याबळ ५० च्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी वॉर कॅम्पेन करण्याचे सेनेने निश्चित केले आहे. त्यासाठी नाशिकसह मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी झटून कामाला लागले आहेत.

येत्या दोन फेब्रुवारी रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि प्रचार रॅली होणार आहे. याद्वारे शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहे. त्यानंतर दररोज एका शिवसेना मंत्र्याची जाहीर सभा शहराच्या विविध प्रभागांमध्ये घेण्याचे नियोजन आहे. सेनेच्या एकूण १२ मंत्र्यांच्या सभांची आखणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. खान्देशवासीयांची संख्या असलेल्या भागात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, कसमादेवासीयांच्या परिसरात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे अशा पद्धतीने मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १६ जानेवारी रोजी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यास खासदार हेमंत गोडसे यांनी दुजोरा दिला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही सभा झाल्यास त्याचा मोठा फायदा पक्षाला मिळू शकतो, असा शिवसेनेचा कयास आहे. त्याबरोबरच सेनेतील विविध सेलिब्रिटींच्या प्रचार दौऱ्यांची आखणी सुरू आहे. त्यात अभिनेता आदेश बांदेकर यांचा समावेश आहे. आक्रमक आणि मतपरिवर्तन घडेल, अशा प्रचाराची ही रणनीती सत्ता काबीज करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवसेनेला असून, त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सारेच कामाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मत विकणे म्हणजे गुलामगिरीकडे वाटचाल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

संपूर्ण आशिया खंडात केवळ बळकट लोकशाहीमुळे भारत देश शांततापूर्ण देश आहे. मतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. राजकारण हे समाजाचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. प्रलोभन स्वीकारून मतदान करणे म्हणजे स्वतःला विकून गुलामगिरीकडे वाटचाल करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांनी केले.

येथील मसगा कॉलेजातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. त्यांच्या हस्ते तरुणांना निवडणूक पत्र देण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मतदार या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. ठाकोर, प्रा. ए.एम.बिरारी, कुलसचिव आर. एच. शेलार, जयवंत कट्यारे, रमेश सोनावणे आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मनीषा सोनवणे यांनी केले तर प्रा. निकम यांनी आभार मानले.

तहसील कार्यालय

कळवण : मतदान करणे हा आपला पवित्र हक्क असून प्रत्येक मतदाराने मतदान करून संविधानाची पवित्रता राखून कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे मत तहसीलदार कैलास चावंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. के. एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिओ डोस देण्यासाठी साडेतीन हजार पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील आठ लाख बालकांना पहिल्या दिवशी पोलिओ डोस देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली असून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून पोलिओ मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी रविवारी केले. पोलिओ डोस घेऊ न शकलेल्या बालकांना तीन हजार ५३४ फिरत्या पथकांद्वारे घरोघर जावून डोस दिला जाणार आहे.
बालकाला पोलिओ डोस देऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशिल वाकचौरे, राजेंद्र पोतदार आदी उपस्थित होते. जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहिमेतून आठ लाख नऊ हजार ६४१ बालकांना डोस देण्यात येणार असल्याची माहिती लांडगे यांनी यावेळी दिली. त्यासाठी जिल्ह्यात चार हजार ४६७ बूथ उभारण्यात आले असून, ११ हजार ९५५ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व ९४१ पर्यवेक्षक कार्यरत आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता चार लाख ४२ हजार ३१९ बालके ही ग्रामीण भागात असून त्यांच्यासाठी तीन हजार १९५ बूथ तयार करण्यात आले आहेत.
प्रत्येक बालकापर्यंत पोहचण्यासाठी आज मोहिमेत पोलिओ डोस घेऊ न शकलेल्या बालकांना तीन हजार ५३४ फिरत्या पथकांद्वारे घरोघर जावून डोस दिला जाणार आहे. शहरी भागात उद्यापासून पाच दिवस तर ग्रामीण भागात उद्यापासून तीन दिवस प्रत्येक घरी फिरते पथक जाईल. याव्यतिरिक्त २५३ मोबाइल टीम खेडी व अतिदुर्गम भागातील बालकांचा शोध घेऊन डोस पाजतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी भाजपची फिल्डिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, प्रचारही शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेने पदवीधरसंदर्भात अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्याने भाजपने रविवारी कार्यालयात बैठक घेऊन प्रचाराची रणनीती ठरवली आहे. पदवीधरचे भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रचारासाठी पदवीधरचे प्रभारी लक्ष्मण सावजी यांनी भाजपच्या धुरिणांची बैठक घेऊन शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, माजी खासदार प्रतापदादा सोनवणेही प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यांनी धुळे व नंदुरबारमध्ये प्रचार केला. डॉ. पाटील यांनी रविवारी नाशिकमधील डॉक्टर्स, वकील, तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, काँग्रेस आणि भाजपने उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणा जुंपली आहे. भाजपने डॉ. प्रशांत पाटील यांच्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने भाजपनेही रविवारी तातडीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदवीधरच्या प्रचाराचा आढावा घेतला. पदवीधरचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणनीती तयार केली आहे. प्रचाराला दोन ते तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. महिला ब्रिगेडसह अन्य पदाधिकारी आता तालुकावार जाऊन डॉ. पाटील यांचा प्रचार करणार आहेत. सोशल मीडिया अॅक्टिव्ह केला असून, प्रत्येक मतदाराशी फोनवर संपर्क करण्याचे काम सुरू झाले आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी कायम ठेवण्याच्या सूचना सावजी यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

दिग्गज उतरले मैदानात

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता डॉ. पाटील यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. सावजी यांनी नाशिक, तर माजी खासदार तसेच मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतापदादा सोनवणे यांनीही प्रचारात भाग घेतला आहे. रविवारी सोनवणे यांनी धुळे व नंदुरबारमधील विविध संघटनांच्या भेटीगाठी घेऊन डॉ. पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात भाजपचा जोर वाढला आहे.

डॉ. पाटील यांचा प्रचार

भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी रविवारी शहरातील विविध संघटनांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. डॉक्टर्स, मेडिकल असोसिएशन, व्यापारी संघटना, उद्योजकांच्या भेटीगाठी घेतल्या. विविध पदवीधर संघटनांशीही चर्चा करत, परिवर्तनासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपची ताकद मजबूत करण्यासाठी मला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी संघटनांना केले. डॉ. पाटील यांनी आंनदवल्ली येथे पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी होऊन एका मुलीला डोस पाजला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याजमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची थट्टा करणारा

$
0
0

डॉ. जयंत पवार यांची टीका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांच्या अल्पावधीच्या पीक कर्जावरील नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांचे व्याज माफ करण्यात आले. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. अवघे ५० ते १०० रुपयांचे व्याज माफ करून केंद्र सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना साठ दिवसांचे व्याज माफ करण्याची घोषणा केली. याचा नीट विचार केला तर लक्षात येईल, की ६ टक्के व्याजदराने एक लाख रुपयांचे एक वर्षाला एक सहा हजार रुपये होतात. ६० दिवसांचे म्हणजे दोन महिन्यांचे एक हजार रुपये. द्राक्षाला सोसायटी काढून एकरी ८५ हजार रुपये कर्ज मिळते, तर कांदा, टोमॅटोला १० ते ३५ हजार रुपये मिळतात. म्हणजे या पिकांना कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार १०० ते ३५० रुपये. कडधान्य उत्पादकांना तर फक्त ५० ते १०० रुपये व्याजमाफी मिळेल. यातून एका मजुराचा दिवसाचा रोजसुद्धा निघत नाही. सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नोटाबंदीच्या काळात शेतीमालाला मातीमोल दर मिळाला. अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो, पालेभाज्या रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. कांदा चारशे ते पाचशे रुपये क्विंटल विकावा लागला. यातून त्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अस्मानी संकटापासून सुटका मिळाली, मात्र सुलतानी संकटाने आसूड ओढले. उद्योग व उद्योजकांच्या पदरात कोट्यवधींचे दान टाकणारे सरकार बळीराजाची चेष्टा करीत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‌व्हिंटेज कार रॅलीने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील डिसुझा कॉलनी येथील ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे ‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’ने नाशिकरांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीचा शुभारंभ पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते झाला.
यावेळी सिंघल म्हणाले की, जुन्या काळातल्या असल्या तरी ‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’मध्ये सहभागी झालेल्या कार्सच्या मालकांनी अत्यंत प्रेमाने त्यांची देखभाल केलेली आहे. मुलासारखं त्यांनी या कार्सला जपलं असून या कार्स असणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे.
ते पुढे म्हणाले की, मीदेखील व्हिंटेज कार्सचा फॅन आहे. माझ्याकडेदेखील एक व्हिंटेज कार आहे आणि त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. ‘टाइम्स ग्रुप’ तर्फे ‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’चे आयोजन करुन नाशिककरांना एक चांगला अनमोल ठेवा पहायला उपलब्ध करुन दिला आहे. नाशिककरांनी या कार अजून चांगल्या स्थितीत जतन करुन ठेवल्या आहेत, असे ते म्हणाले.
‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’मध्ये ३५ हून अधिक व्हिंटेज कार सहभागी झाल्या होत्या. त्यात विल‌िज् जीप, ऑस्टिन बेबी, ऑस्टिन, टोयोटा कोरोना, प्रीम‌ियर पद्मिनी, हिलमॅन मिक्स, हिंदुस्तान मोटर्स कॉन्टेसा, फोर्ड परफेक्ट, प्युयोजट ३०९, फियाट ६००, इटॅलियन फियाट ११००, मित्सुबिशी एफटीओ, फोक्सव्हॅगन मायक्रो व्हॅन, एमएम ५४०, टोयोटा मार्क २, महिंद्रा जीप, सॅन स्ट्रोम आदि कंपन्यांच्या कार्स सहभागी झाल्या होत्या. ही रॅली डिसुझा कॉलनी येथून सुरू होऊन श्री स्वामी समर्थ चौक, डोंगरे वसतिगृह मैदान ते कॅनडा कॉर्नरमार्गे कॉलेजरोड भोसला गेट येथून एबीबी सर्कल आणि मायको सर्कलमार्गे यूटर्न घेऊन फ्रवशी अॅकॅडमी त्र्यंबक रोड येथे तिचा समारोप झाला. रॅलीचा समारोप झाल्यानंतर फ्रवशी अॅकॅडमी येथे दुपारी २ वाजेपर्यंत या कार डिस्प्ले म्हणून ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी सहभागी व्हिंटेज कार मालकांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात फ्रवशी अॅकॅडमीचे अध्यक्ष रतन लथ, सोमाचे अध्यक्ष प्रदीप पाचपाटील, सह्याद्री हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर प्रीती झवर, एम. डी. सफायचे अपूर्व दिक्षीत, ‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडे लागली रीघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची गर्दी होत असून, जिल्ह्यात तब्बल ७८५ जणांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, नाराज घटकांकडून बंडखोरी झाल्यास शिवसेनेची बंडखोरी वाढणार आहे.

जिल्हा परिषदेवर भगवा फडकावा यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागात वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना गण, तसेच गणांमध्ये उमेदवारीचे वेध लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल ७८५ इच्छुक उमेदवारीला सामोरे गेले आहेत. रविवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यांमधील १८ गट आणि ३६ गणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये विद्यमान खासदारांसह काही लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनी मुलाखती दिल्या. शनिवारी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नांदगाव, येवला, निफाड व चांदवड या चार तालुक्यांमधील २३ गट व ४६ गणांसाठी तब्बल ४०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. निफाडमधील दहा गट, नांदगावमधील चार, येवल्यातील पाच, तर चांदवडमधील चार गटांसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, आमदार अनिल कदम आदींनी, तर रविवारी जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, अॅड. शिवाजी सहाणे आदींनी मुलाखती घेतल्या. दरम्यान, इच्छुकांमध्ये सुशिक्षित महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे.

यांनी दिल्या मुलाखती

खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे यांनी एकलहरे गटासाठी मुलाखत दिली. याशिवाय इगतपुरीतून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला, शिवराम झोले यांच्या स्नुषा मीना यांनी वाडिवऱ्हे गटासाठी उमेदवारीची इच्छा दर्शविली, तर सिन्नरमधील चास गटातून शीतल सांगळे यांनी मुलाखत दिली. नाशिक तालुक्यातील पळसे गटातून संजय तुंगार, अनिल ढिकले, जगन आगळे, भाऊसाहेब ढिकले आदींनी मुलाखती दिल्या.

यादी पक्षप्रमुखांकडे

जिल्ह्यात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मुलाखतीमुळे इच्छुकांची नेमकी संख्या कळली असून, लवकरच यादी तयार केली जाईल. ही यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविली जाईल. जिल्ह्यात शिवसेनेसोबत जाण्याची तयारी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने दर्शविली आहे. पक्ष पदाधिकारी अर्जुन डांगळे यांनी जिल्ह्यात काही जागांची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप विस्तृत चर्चा झाली नसल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपचा उमेदवार मनसेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपला रविवारी दणका बसला. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या सहकारी असलेल्या नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून, इतर पक्षांसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

महापालिकेत अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. बहुतांश विद्यमान नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेचा रस्ता पकडला. या काळात मनसेची अग्निपरीक्षा पार पडली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा आपला मोर्चा शहराकडे वळवला. मराठी सिने कलाकारांसह ठाणे शहरातील मतदारांना शहराची सैर घडवली. एकीकडे पक्षाकडे ताकद नसल्याची ओरड विरोधकांकडून होत असताना मनसेकडून निवडणूक लढवण्याची तब्बल पावणेपाचशे उमेदवारांनी तयारी दर्शवली. शिवसेना, भाजपत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मनसे याकडे लक्ष ठेवून आहे. शिवसेना, भाजपकडून तिकीट नाकारण्यात येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी पक्षाकडून सुरू आहे. मनसेसाठी बंडोबा फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ११ अमधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका ज्योती अर्जुन गांगुर्डे यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस सोमनाथ बोडके यांनीही पक्षाला रामराम करीत मनसेची वाट धरली. विशेष म्हणजे ज्योती गागुंर्डे आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमवेत निवडून आल्या होत्या. सानप वॉर्ड क्रमांक ११ बमध्ये विजयी झाले होते. मनसेने थेट भाजप शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून, भाजपसाठी हा दणका मानला जातो आहे. भाजप हा विषय किती गांभीर्याने घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीसाठी सूर जुळेना!

$
0
0

बैठक निष्फळ; अशोक चव्हाणांच्या कोर्टात चेंडू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजपच्या फारकतनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीतही आघाडीसाठी सूर जुळत नसल्याचे चित्र आहे. रविवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आघाडीसंदर्भातील बैठक निष्फळ ठरली. तीन प्रभागांवरून आघाडीचे घोडे अडले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात आज (दि.३०) होणाऱ्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.

शिवसेना व भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची भावना असतांनाही दोघांमध्ये अजूनही जागावाटपाच्या फॉर्म्युलावर एकमत होत नाही. जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी रविवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयंत जाधव, नाना महाले यांच्यात बैठक झाली. परंतु, या बैठकीत ४, १२, १६ या तीन प्रभागांवरून एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. अखेरीस अंतिम निर्णयाचा चेंडू मुंबईकडे टोलवण्यात आला आहे. या तीन जागांसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. त अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.

भाजपची आज यादी?

भाजप व शिवसेनेने उमेदवार याद्या जवळपास अंतिम केल्या आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी भाजपच्या यादीवर अंतिम हात फिरवणार असून, सोमवारी उशिरापर्यंत यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहेत. शिवसेनेनेची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच यादी जाहीर केली जाईल. दोन्ही पक्षांतील बंडखोरांना काँग्रेस व राष्ट्रवादीकडून चाचपडले जाणार असल्याने आघाडीची यादी शेवटच्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंसाठी ‘टाटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सुरू झालेल्या वनौषधी उद्यानाला सोमवारी प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा भेट देणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आली. या वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे हजर राहणार असून, पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साकारण्यात आलेल्या काही प्रोजेक्टपैकी एक असलेल्या वनौषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. या वेळी अमिताभ बच्चन, तसेच रतन टाटा येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, टाटा ट्रस्टच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून वनौषधी उद्यानाला आर्थिक मदत करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक संदेश देणारा ‘कथा अरण्याची’ हा साऊंड आणि लाइट शो सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर टाटा यांनी उद्यानाला भेट द्यावी, यासाठी राज ठाकरे आग्रही होते. ठाकरेंच्या विनंतीला टाटा यांनी मान दिला असून, ते सोमवारी सकाळी उद्यानाला भेट देणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. ठाकरे रविवारी रात्री शहरात दाखल झाले आहेत.

पहिली यादीही जाहीर होण्याची शक्यता

मनसेच्या जवळपास पावणेपाचशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला. या मुलाखतींचा सार काढत त्याचा अहवाल संपर्कनेते अविनाश अभ्यंकर यांनी राज ठाकरे यांना सादर केला. ३० किंवा ३१ जानेवारी रोजी पक्षाची पहिली यादी जाहीर होऊ शकते. रतन टाटा यांच्या भेटीच्या निमित्ताने शहरात दाखल होणारे ठाकरे कोणाची नावे जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरील ‘राजकारण’ थंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे अतिउत्साही उमेदवारांनी प्रचारसुद्धा सुरू केला आहे. उत्साह अद्याप शिगेला पोहोचला नसला तरी निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. यात सोशल मीडिया मात्र थंड पडलेला दिसतो. पोलिस आपल्या पातळीवर सोशल मीडियावरील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दंगलीत तेल ओतण्याचे काम सोशल मीडियाने केले होते. यामुळे शहरातील वायलेस इंटरनेट सेवा तब्बल चार ते पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. यानंतर शहर, तसेच ग्रामीण पोलिस दलाने अफवा किंवा दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने पसरवण्यात आलेल्या माहितीचे संकलन केले. त्यानुसार शहर, तसेच ग्रामीण हद्दीत प्रत्येक सात ते आठ व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर गुन्हे दाखल झाले. याशिवाय काही फेसबुक युजरदेखील कायद्याच्या कचाट्यात सापडले. या घटनेने सोशल मीडियाचा अंदाधुंद वापर करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला. सध्या शहरात महापालिका, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीचा फिव्हर पाहण्यास मिळतो आहे. मात्र, यात सोशल मीडिया अलिप्त असल्याचे दिसते. याबाबत बोलताना क्राइम ब्रँचचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडियाचा वापर प्रत्येकाने जबाबदारीने केला पाहिजे. आपल्याकडून इतरांची बदनामी होणार नाही, अफवा पसरणार नाही याची दक्षता घेतली गेली नाही तर पोलिस कारवाई करतील. यासाठी सायबर सेलला सूचना करण्यात आल्या असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिक या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर राहत असल्याचे सांगितले जात आहे. युतीबाबत मुंबईत दीर्घकाळ झालेला वाद, काँग्रेस- राष्ट्रवादीची सद्यःस्थिती, तसेच नोटाबंदीसारख्या बाबींचा हा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. सध्या तरी राजकीय कार्यकर्त्यांपुरतेच वातावरण गरम असून, त्यात सर्वसामान्य मतदार इतक्या लवकर सहभागी होणार नसल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केनियाचा इसाक केम्बोई अव्वल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्सतर्फे वणी येथील गडावर रविवारी झालेल्या सप्तशृंगी मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात केनियाच्या इसाक केम्बोईने, तर मुलींमध्ये मंजू सोहनीने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत अर्जेंटिनाचीही लीना मारियेला ही महिला खेळाडूही सहभागी झाली होती. तिने स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून, ही स्पर्धा पुढेही सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

ही स्पर्धा ३, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये झाली. देशातील ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान खेळाडू असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा सप्तशृंगी गडावर घेण्यात आली. विजेत्या खेळाडूंना रोख रकमेसह श्री सप्तशृंगीदेवीची प्रतिमा भेट देण्यात आली. जिल्हा प्रधान न्यायाधीश ए. एम. ढवळे, न्यायाधीश एस. पी. पैठणकर, अॅड. नितीन ठाकरे, सप्तशृंगीदेवी ट्रस्टचे राजेंद्र सूर्यवंशी, जयंत जायभावे, तहसीलदार कैलास चावडे उपस्थित होते. नारायण वाघ, डॉ. प्रशांत देवरे, महेंद्र छोरिया, श्रीपाद दाबक, सुयोग शहा, अतुल संगमनेरकर, सुजित नायर यांनी सहकार्य केले. स्पर्धेत डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. वैभव पाटील, डॉ. नितीन वाघचौरे यांचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले होते.

स्पर्धेचा निकाल

१० किलोमीटर ः

मुले ः प्रथम- धर्मेंदर, द्वितीय- नितीन गावित, तृतीय- सोनू सोनवणे. मुली ः प्रथम- पूनम सोनवणे, द्वितीय- सायली मेंगे, तृतीय- वर्षा चौधरी.

२१ किलोमीटर

पुरुष ः प्रथम- इसाक केम्बोई, केनिया, द्वितीय- हिरामण थविल. मुली ः प्रथम- मंजू सोहनी, द्वितीय- लीना मारियेला, अर्जेंटिना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार कुटुंब एकसंधच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पवार कुटुंबात कुठलेही मतभेद नसून, आम्ही एकसंध आहोत व कळवण तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सर्व तत्पर असल्याची ग्वाही रविवारी पवार कुटुंबीयांनी मेळाव्याद्वारे दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथील श्रीसाई लॉन्सवर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा झाला. त्यावेळी पवार कुटुंबीयांनी मत व्यक्त केले. मेळाव्यात पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकाच वेळी व्यासपीठावर उपस्थित असल्याने ते काय संवाद साधतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आम्ही तालुक्याच्या विकासासाठी एकसंध असल्याची ग्वाही त्यांनी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पवार, जिल्हा परिषदेचे गटनेते रवींद्र देवरे, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, प्रवीण पवार, उपसभापती संजय पवार, पांडुरंग पाटील, पोपटराव वाघ, अशोक पवार, जितेंद्र पवार, योगेश पगार, शरद गुंजाळ आदी प्रमुख पाहुणे होते.

गेल्या चार दशकांपासून माजी मंत्री ए. टी. पवार यांनी कळवण तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व करून आपले संपूर्ण आयुष्य तालुक्याच्या विकासासाठी खर्च केले. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज व सिंचन या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून तालुका सुजलाम् सुफलाम् केला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचा विकास खुंटला असून, विकासकामे ठप्प झाली आहेत. खासदार, आमदाराला तालुक्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. भाजप सरकारने जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, नोटबंदीमुळे जनता त्रस्त झाल्याची टीका करतानाच पवार कुटुंबात मतभेद नसल्याचेही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटबंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील जनता आता पश्चात्ताप करीत आहे. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद व भांडण नसून, भांडण करणे आमच्या कुटुंबाला माहीत नाही. तालुक्याच्या विकासासाठी पवार कुटुंबामागे उभे राहण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत पवार, गटनेते रवींद्र देवरे, नारायण हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त करून ए. टी. पवार यांनी केलेला विकास जनतेला ज्ञात असून, त्यांच्या विकासकार्याचा या वेळी गौरव केला. दोन वर्षांपासून विकास खुंटला असून, विकासासाठी तालुक्यातील जनता पवार कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून, पवार कुटुंब एकसंध असताना कुणीही या कुटुंबाबाबत अपप्रचार करू नये, असे आवाहनही या वेळी केले.

जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांनी सांगितले, की तालुक्यात ए. टी. पवारांनी आपल्या कारकिर्दीत मंजूर केलेली कामे तालुक्यात सध्या सुरू असून, नवीन कामे करण्यात आमदार व खासदारांना अपयश आले आहे. सुरगाणा तालुक्यातील जनतेचा विकास ज्या खासदार व आमदाराला करता आला नाही ते काय कळवण तालुक्याचा विकास करतील, असा सवालही त्यांनी केला. तालुक्यातील जनता भरकटत चालली असून, अपप्रचाराला बळी पडल्याने विधानसभेत पक्षाला पराभव पत्करावा लागला. मधुकर भदाणे, कडू पाटील, मावंजी पाटील, रामा पाटील, केदा बहिरम, हरिभाऊ वाघ, अशोक पाटील, रामचंद्र गायकवाड, ज्ञानदेव पवार, देवेंद्र गायकवाड, शांताराम जाधव, विलास रौंदळ, प्रवीण रौंदळ, भिवा बागूल, उमेश वाघ, दीपक वाघ, आशुतोष आहेर, सनी बोरसे, मनोज पवार, विष्णू बोरसे, अशोक पाटील, रामदास देवरे, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील देवरे, सुनील जाधव, रमेश पवार, यशवंत पवार, श्याम भोये, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. विलास रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

पवार कुटुंबीयाबद्दल विरोधकांचा अपप्रचार

तालुक्यातील पाणीप्रश्न महत्त्वाचा असून पाण्याचे आरक्षण, आवर्तन यासाठी तालुक्यातील जनतेला एकत्र यावे लागणार आहे. आमच्या कुटुंबात कलह असल्याचा विरोधक अपप्रचार करीत आहे. आम्ही सर्व एक आहोत आणि तुमच्यासमोर आहोत. केवळ तालुक्यातील जनतेच्या हिताची जोपासना करण्याची शिकवण आम्हाला ए. टी. पवारांनी दिली आहे. त्या हिताची जोपासना करण्याचे आमचे कर्तव्य असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पवार कुटुंब व राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन नितीन पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ?

$
0
0

संजय लोणारी, येवला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १ फेब्रुवारीपासुन सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील राजकारणाचे रंगढंग आता समोर येऊ लागले आहेत. उमेदवारीच्या घोडेमैदानात आशाआकांक्षेचे धुमारे फुटलेल्या इच्छुकांचे घोडे चांगल्याच टापा टाकत ताल धरू लागले असून, पक्षांच्या नेतेमंडळींच्या पावलांकडे इच्छुकांसह सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यातील वाहत्या प्रवाहाचा एकंदरीत अंदाज घेत गट व गणांमधील बहुसंख्य इच्छुकांचा ओढा शिवसेनेच्या रिंगणाकडे वाढत चालल्याने इच्छुकांच्या या भाऊगर्दीत शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांची कसोटी लागणार आहे.

जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने येवला तालुक्यातील पाच गट व दहा गणांतील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरात ढवळून निघतानाच आता उमेदवारी वाटपाच्या महत्त्वपूर्ण पर्वात तर अनेक गट व गणांतील राजकारणाने कूस बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेने राज्यभर ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचे परिणाम येवला तालुक्यातील राजकारणातही दिसू लागले आहेत. तालुक्यात प्रबळतेच्या दृष्टीने सर्वांत पुढे असणाऱ्या शिवसेनेने अगोदरच येथे जोरदार तयारी सुरू केली होती. शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच येवल्यातील गट व गणांच्या लढाईत प्रामुख्याने मुकाबला होईल असे आतापर्यंतचे चित्र दिसत असतानाच मुंबईत शिवसेनेने दिलेल्या नाऱ्याचे पडसाद आता येवल्यातही उमटू लागले आहेत. भाजपदेखील शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी पुढे सरसावली असून शतप्रतिशत भाजपचा नारा देत माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी झालेला भाजपचा मेळावा त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. भाजपचा शुक्रवारचा मेळावा होतो न होतो, तोच शिवसेनेनेदेखील शनिवारी येवल्यात मोठा मेळावा घेत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या मेळाव्यात नेते अन् पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील ‘झेडपी’च्या पाच जागांसह पंचायत समितीच्या दहाही जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच भाजप कुठल्या गट व गणातून नेमके कुणाला निवडणूक रिंगणात उतरवणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्या मानाने भाजपसह काँग्रेसकडयाबाबतीत म्हणावे तसे चित्र दिसत नाही. त्यामुळेच शिवसेना व राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळणाऱ्यांवर भाजपसह काँग्रेसचे लक्ष गेल्यास नवल वाटायला नको. कुठल्या गट व गणात असे नेमके कोणकोणते मासे भाजपच्या गळाला लागतात, याचे उत्तर मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यावरच समोर येणार आहे.

येवला तालुक्यातील अनेक गट व गणांतील इच्छुकांच्या भाऊगर्दीवर नजर टाकली तर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीकडेही गर्दी दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील पाच गटांपैकी तब्बल चार गट, तर पंचायत समितीच्या दहापैकी आठ गण काबीज करणाऱ्या राष्ट्रवादीकडे गेल्यावेळच्या तुलनेने यंदा गर्दी ओसरली असली, तरी पाटोदा, अंदरसूल यांसारख्या जिल्हा परिषद गटांसह पंचायत समितीच्या काही गणांमध्ये पक्षातील आहे त्यांच्यातच उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळेच या तिकिटाच्या साठमारीत कुणाला ‘हाय’ करायचं अन् कुणाला ‘नाय’, हे अवघड बनलेलं गणित सोडवताना राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेषतः पाटोदा गटातील संजय बनकर, बाळासाहेब पिंपरकर, ज्ञानेश्वर शेवाळे आदी १२ इच्छुकांसह अंदरसूल गणातील शाहुराजे शिंदे, मकरंद सोनवणे, महेंद्र काले आदी इच्छुकांमधील उमेदवारीचा तिढा राष्ट्रवादी नेमका कसा सोडवते, यावरही तालुक्यातील निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे हे नक्की.

शिवसेनेपुढे तर उमेदवारीवरून मोठा पेच आहे. राजापूर गटातून जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ आपल्याच हाती हे गृहीत धरून गटात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या गटातील राजापूर व सायगाव या दोन्ही गणांत आपल्या जोडीला दमदार उमेदवार असावेत या दृष्टीने दराडेंनी बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले राष्ट्रवादीचे देविदास निकम यांना शिवसेनेत प्रवेश देऊन पावन करून घेतले आहे. निकम यांच्या पत्नीला अनुसूचित जाती स्त्री राखीव जागेवर शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्याचा दराडे यांचा मनसुबा आहे. मात्र, निकम गणाबाहेरचे असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर गणात स्थानिक उमेदवार द्यावा ही मागणी बळावू लागली आहे. माजी आमदार मारोतराव पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पंचायत समितीच्या सावरगाव गणातही उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. या गणातील गेल्या पोटनिवडणुकीवेळी पुढच्या आश्वासनावर थांबलेले ज्येष्ठ नेते साकरचंद साळवे यांचे पुत्र कांतिलाल आपल्या सौभाग्यवती आशा यांच्यासाठी आधीच शिवसेनेकडून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना दराडे समर्थक सुधीर जाधव यांनी आपल्या पत्नी शोभा यांच्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर अचानक शिवसेनेत उडी घेतली आहे. ओबीसी स्त्री राखीव असलेल्या सावरगाव गणात साळवे कि जाधव, हा गुंता शिवसेना कशी सोडवते हे बघणे औत्सुक्याचे असेल. गट व गणातील इच्छुकांच्या शनिवारी मुलाखती घेतल्या. शिवसेनेकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागलेली इच्छुकांची रीघ बघता जिल्हानेत्यांसह पक्षश्रेष्ठी कुठल्या गट आणि गणात नेमक्या कुणापुढे उमेदवारीच्या पायघड्या अंथरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'राज'कल्पनेतून साकारलेल्या गार्डनला टाटांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बॉटनीकल गार्डनची उद्योगपती रतन टाटा यांनी आज सकाळी पाहणी केली. गार्डन फारच सुंदर झाल्याचे सांगत टाटांनी राजकीय वक्तव्य करण्याचे मात्र टाळले. स्थानिक निवडणुकांबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे स्पष्ट करीत पुढील कार्यक्रमासाठी टाटा निघून गेले.

महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सुरू झालेल्या वनौषधी उद्यानाला सोमवारी रतन टाटा यांनी भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी हजर होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास टाटा तसेच ठाकरे यांचे आगमन झाले. टाटा ट्रस्टच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून तसेच ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे गार्डन विकसीत करण्यात आले आहे. मिळालेल्या निधीचा विनियोग कसा आणि किती झाला, हे राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना दाखवून दिले. या बाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतर रतन टाटा यांनी थेट परतीचा मार्ग पकडला. यावेळी पत्रकारांनी त्यांना गार्डनबाबत छेडले असता त्यांनी, "आय एम इम्प्रेस" असे उत्तर दिले. गार्डनचे काम चांगले असल्याची पावती देणाऱ्या टाटांनी राजकीय भाष्य करण्यास मात्र नकार दिला. एवढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट करीत टाटांनी थेट उद्योजक रतन लथ यांच्या घराचा रस्ता पकडला. यावेळी टाटा ट्रस्टचे अधिकारी, मनसेचे पदाधिकारी तसेच उद्योजक हजर होते.

बॉटनीकल गार्डन ठरतोय चर्चेचा मुद्दा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी बॉटनीकल गार्डन चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. गार्डनच्या उद्घाटनासाठी मराठी सिने सृष्टीतील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. आता याच गार्डनच्या पाहणीसाठी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढीत रतन टाटा हजर झाले. अवघ्या दीड ते दोन तासात रतन टाटा शहरातून माघारी फिरले. दरम्यान, बॉटनीकल गार्डनचा मुद्दा सतत चर्चेत ठेवण्यात मनसैनिक अद्याप यशस्वी ठरली आहे. मात्र, बॉटनीकल गार्डन मनसेला ताकद देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हास्तरीय समित्यांचे भिजत घोंगडे

$
0
0

धुळे जिल्हा योजनांच्या लाभांपासून वंचित


म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या विविध उपक्रमांची आणि योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा. प्रशासकीय यंत्रणेवर लोकप्रतिनिधींचा वचक राहून भ्रष्टाचार विरहीत कारभार होऊन सरकारी यंत्रणेच्या कारभार व त्रुटींवर अंकुश राहावा, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर विविध समित्या गठीत करण्यात येतात. मात्र सध्या युतीत बेबनाव असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या समितीने विविध समिती सदस्यांची होणारी निवडीचे घोंगडे भिजत आहे.

परिणामी, बहुतांश समित्यांचे पुनर्गठणाशिवाय प्रशासकीय स्तरावर कामकाज पार पडत आहे. तर काही समित्यांची नियुक्ती नसल्यामुळे कामकाज रखडले आहे. याचे गांभीर्य धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा प्रशासनालादेखील नाही. परंतु, यामुळे अनेक योजनांच्या लाभापासून सर्वसामान्यांना वंचित राहावे लागत आहे. या समित्यांमध्ये निवड करावयाच्या अशासकीय सदस्यांमध्ये भाजप व शिवसेनेचे किती सदस्य घ्यावे यावरून तोडगा निघत नाही. त्यामुळे दोन वर्षांत या समित्याच नियुक्त करण्यात आलेल्या नाहीत. या समित्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य व्हावी, महिला बालके, गरोदर माता, अल्पसंख्याक घटक, आदिवासी, मागासवर्गीय घटकांना न्याय मिळावा, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभारांना पायबंद घालण्यात यावा या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असतात. मात्र जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले दादा भुसे यांनी अद्यापही समित्यांच्या अशासकीय सदस्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांकडून नियुक्तीसाठी पाठपुरावाच होत नाही. यामुळे अच्छे दिनचे स्वप्न भंगल्याचा प्रत्यय जिल्ह्याला येत आहे.

‘आरटीई’ अडचणीत

जिल्हा शिक्षण सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्य निवडीसाठी मागील पंधरा वर्षांपासून मुहूर्तच सापडत नाही. विद्यमान पालकमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. बालकांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा येत असून आरटीईची यशस्वी अंमलबजावणीस अडचणी येत आहेत.

मोजक्याच समित्यांचे कामकाज

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बोटावर मोजण्या एवढ्याच समित्यांच्या नियमीत बैठका झालेल्या आहेत. या समित्यांचे योग्य नियोजन केले जाते. बैठकाही मागे पुढे होत असल्या तरी त्या घेतल्या जातात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठक व्यतिरिक्त इतर बैठकांना पालकमंत्री क्वचितच दिसतात. उर्वरित बैठकांना सचिव म्हणून खाते प्रमुखांनाच घ्यावा लागतात.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्या गठीत नसल्यामुळे कामकाजावर परिणाम झालेला नाही. मात्र, इतर विभागांच्या समिती निवडीच्या बाबतीत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्या समित्या गठीत करण्यात येतील.

तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतून एकमेव अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी पत्र भरण्यासाठी चार दिवस बाकी असतांना पंचवटी विभागात आतापर्यंत अवघ्या दोन जणांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेतर्फे मधुरा सुनील गांगुर्डे यांनी प्रभाग क्रमांक दोनमधील अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव असलेल्या अ प्रवर्गातून सोमवारी अर्ज भरला. पण अर्जासोबत शिवसेनेचा एबी फॉर्म नव्हता. शनिवारी याच प्रभागातून क प्रवर्गातून मनसेतर्फे अनंता सूर्यवंशी यांनी फॉर्म भरला होता. त्यामुळे या प्रभागात तूर्त दोन उमेदवार झाले आहेत.

एकाच वेळी होणार गर्दी

एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला. त्यात रविवारी सुध्दा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पण, तरीही उमेदवारांकडून विलंब केला जात आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात धावपळ करीत गर्दीमध्ये उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

चार दिवस ट्रेनिंग
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणी येत नसल्यामुळे हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या कामात कोणतीही चुक राहू नये, अर्ज लवकर ऑनलाइन सादर व्हावा, यासाठी कर्मचाऱ्यांना टिप्स दिल्या जात आहेत.

अधिकाऱ्यांना पडला प्रश्न
चार दिवसात केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरतांना नेमकी काय अडचण आहे, असा प्रश्न आता अधिकारीच चौकशीसाठी येणाऱ्या उमेदवारांना विचारू लागले आहेत. पण कागदपत्राची अपूर्तता असे ढोबळ उत्तर सर्व जण देत आहेत. प्रत्यक्षात प्रमुख पाच पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवार फॉर्म भरणार नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहिणी, तरी करोडपती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे संजय चव्हाण यांच्या पत्नी आशा चव्हाण यांनी प्रभाग ७ मधील सर्वसाधारण गटातून सोमवारी उमेदवारी अर्ज सादर केला. त्या भाजपच्या तिकिटासाठी इच्छूक आहेत. दहावी शिक्षण झालेल्या आशा यांची कौटुंबिक संपत्ती मात्र १ कोटी २६ लाख ८२ हजार ३२ एवढी आहे. पश्चिम प्रभागात केवळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज सोमवारपर्यंत दाखल झाला आहे.

गंगापूररोडवर प्रसाद मंगल कार्यालय, गोळे कॉलनी, अशोकस्तंभालगतचा घारपुरे घाट, कॉलेजरोड-डिसुझा कॉलनी, पाटील लेन, पंडित कॉलनी असा पसरलेला हा प्रभाग उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय वस्तीचा अधिक आहे. मात्र, मल्हारखाण झोपडपट्टीही याच प्रभागात येते. प्रभागातील एकूण लोकसंख्या ४४ हजार ३८२ एवढी आहे. यात अनुसूचित जाती २८११ तर जमाती २४६९ लोकसंख्येचा समावेश आहे. प्रभागात एकूण ३६ हजार १५३ मतदार आहेत. प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहेत. तर एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक जागा सर्वसाधारणसाठी आहे. या प्रभागात भाजपच्या वतीने आशा संजय चव्हाण या सर्वसाधारण गटातून इच्छूक आहेत. चव्हाण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दहावी शिक्षण झालेल्या आशा चव्हाण या गृहिणी आहेत. त्यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांच्याकडे रोख तीस हजार रुपये, बँकेत ६ हजार ७९० रुपयांच्या ठेवी, कंपन्यांमधील कर्जरोखे २ हजार १०१ रुपये, पोस्ट व ‘एलआयसी’तील गुंतवणूक ४२ हजार ९०० एवढी आहे. त्यांच्या नावे एकही वाहन नाही. १६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोने मात्र त्यांच्याकडे आहे. आशा यांच्या नावे एकूण १७ लाख ६१ हजार ७९१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पती संजय यांच्याकडे रोख २५ हजार, बँकेत ८३ हजार ७८०, कंपन्यांमधील कर्जरोखे २७ हजार १२६, पोस्ट व ‘एलआयसी’मधील गुंतवणूक १ लाख ८५ हजार ८३५ आहेत. संजय यांच्या नावे एकही वाहन नाही. त्यांच्या नावे ८ लाख ८१ हजार ७४१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

कर्जाचा भार शून्य
आशा यांच्या नावे नाशकात ६० लाख रुपये किंमतीचे १७२८ चौरसफुटाचे घर आहे. त्यांचे पती संजय यांच्या नावे घर नसले तरी इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक आणि विल्होळी येथे एकूण ३ शेत जमिनी आहेत. त्यांचे एकत्रित मूल्य ४० लाख ३१ हजार ५०० रुपये एवढे आहे. चव्हाण दाम्पत्याच्या नावे कुठलेही कर्ज नाही. चव्हाण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ४० हजार रुपये एवढे आहे.

योगेश हिरे गॅसवरच
भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे हे प्रभाग ७ मधून भाजपच्या वतीने इच्छूक आहेत. भाजपची यादी विविध कारणांमुळे जाहीर होण्याचे लांबत आहे. हिरे यांचेही तिकीट नक्की नसल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग सातमधून एकूण ८ जणांनी उमेदवारीसाठी ऑनलाइन माहिती भरली आहे. त्यात कुंदनकुमार दुसाने, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, अल्का जांभेकर, आशा चव्हाण, मयूर पवार, आनंद ढोली, सागर पगार, ज्ञानेश्वर भोसले यांचा समावेश आहे.

प्रभाग १२ मध्ये १२ उमेदवारांनी त्यांची ऑनलाइन माहिती भरली आहे. त्यात शारदा निकाळे, प्रसाद बागुल, अमर काठे, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, प्रमोद कर्डिले, विशाल कमोद, सदानंद जाधव, देविदास सराटे, किशन आडवानी, कुणाल भोसले यांचा समावेश आहे.

प्रभाग १३ मध्ये १२ उमेदवारांनी त्यांची माहिती ऑनलाइन भरली आहे. त्यात सुनंदा बर्वे, सचिन भोसले, मृणालराजे घोडके, नगरसेवक विनायक खैरे यांची कन्या एकता खैरे, आनंद डागा, उन्नती आहेर, प्रकाश कनोजे, दीपक डोके, अजिंक्य खैरे, रोहन बागुल, सुमंत परांजपे, सागर सोनवणे यांचा समावेश आहे.

प्रभाग १४ मध्ये एकूण १९ उमेदवारांनी त्यांची माहिती ऑनलाइन भरली आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये नेहा चव्हाण, मोईनुद्दीन शेख, फरीद पठाण, इस्माईल शेख, मुधसार सय्यद, अस्लम खान, राणी जगताप, करणसिंग पवार, विद्या चव्हाण, मकसूद खान, संदीप कमोद, दिनेश मोटकरी, नासिर शेख, रामसिंग बावरी, गणेश जाधव, अंकुश राऊत, गोविंद बिरुटे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्येकडून पित्याचा अंतिम प्रवास सुकर...

$
0
0


रामनाथ माळोदे, पंचवटी

ज्या समाजात महिलांना अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये जाण्यास मनाई केली जाते, अशा सिंधी समाजातील एक कन्येने आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. नाशिकमध्ये सिंधी समाजाच्या मुलीने अशा प्रकारे पित्याच्या अंत्यसंस्कारात अग्निडाग देण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. आपल्या पित्याचे मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे अवयवदान करण्याची प्रेरणाही या तरुणीने निर्माण केली. तिच्या या निर्णयाचे समाजाकडून कौतुक होत आहे.

पंचवटीतील पाथरवट लेन येथील राधेश्याम निवास येथील शिरीष मन्शानी (वय ६६) हे इंदिरानगर येथे एका बांधकामाच्या कामकाजाचे सुपरव्हिजन करीत असताना पाय घसरून ते पडले. त्यांच्या खुब्याला मार लागला, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेतून सावरत असतानाच त्यांना दि. २२ जानेवारी रोजी हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी राखी या चुलतभावाच्या मुलीला तिच्या जन्मावेळीच दत्तक घेतले होते. तेव्हापासून राखी त्यांच्याकडे लहानाची मोठी झाली. बालपणापासून राखीला त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणेच वागणूक दिली. राखीनेही माता-पित्यांच्या सेवेत कुठलीच कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली. बांधकाम व्यवसायानिमित्त ते १५ वर्षे बीड येथे राहिले होते. राखी मात्र नाशिकलाच शिक्षण घेत होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून राखीने वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. कॅनडा कॉर्नर येथे कॉम्प्युटरचे होलसेलचे दुकान असलेल्या नीरज नागदेव यांच्याशी तिचा विवाह झाला. विवाहाच्या अगोदर ती क्लासेस चालवित होती.

सिंधी समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर हिंदू धर्माप्रमाणे त्यांचेही अंत्यसंस्कार अग्निडाग देऊन करण्यात येतात. अंत्यसंस्कारांच्या दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जन केले जाते. दहाव्या आणि अकराव्या दिवशी रामकुंडावर पिंडदान करण्यात येते. बाराव्या आणि तेराव्या दिवशी घरी मोठा विधी केला जातो. सिंधी समाजाच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला महिलांना जाता येत

नाही, ही परंपरा आहे. त्यामुळे शिरीष मन्शानी यांचे अंत्यसंस्कार कुणाच्या हातून करायचे, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी गंगापूररोड येथील डॉ. महेश मन्शानी यांनी राखीने आपल्या पित्यासाठी आतापर्यंत सर्वकाही केले, मग अंत्यसंस्कार तिच्या हातून केले तर काय हरकत आहे, असा मुद्दा मांडला. अंत्यसंस्कारांचा विधी करणारे सुरज महाराज यांनीही काही हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, हे मत समाजातील इतर लोक मान्य करतील की नाही, याबाबत शंका होती. विशेषतः (कै.) शिरीष यांचे मोठे बंधू श्रीहरी आणि भजनलाल, तसेच राखीचे सासरे, दीर आणि पती यांना हे मान्य होणार नाही, असेच वाटत होते. मात्र, त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवित होकार दिला आणि राखीच्या हाताने अमरधाममध्ये अग्निडाग देण्यात आला.


जपली सामाजिक बांधिलकी

आपल्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी धीरोदात्त राखीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपल्या पित्याचे नेत्रदान करण्याची परवानगीदेखील दिली. दुःखातही तिने दाखविलेल्या या समाजभानामुळे सिंधी समाजातील अनेकांना प्रेरणा मिळाली असल्याचे मत समाजबांधव व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images