अर्ध्या रात्रीतून खेळाडू तयार होत नाहीत. त्यासाठी गावपातळीवरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अॅथलिट पद्मश्री अंजू बॉबी जॉर्ज हिने केले. मविप्र मॅरेथॉनप्रसंगी पत्रकारांशी तिने संवाद साधला.
अंजू पुढे म्हणाली, आपल्याकडे खेळाडू मोठे झाल्यावर त्याच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात होते. खेळाडू लहान असताना त्याच्याकडे लक्ष दिले तर भारत कोणत्याही खेळात निश्चितच नाव कमावेल. ऑलिम्पिकसाठी ज्या मुलभूत सुविधा खेळाडूंना आवश्यक आहेत, त्या गावपातळीपासून उपलब्ध करुन द्यायला हव्यात. तर यशप्राप्ती होईल. प्लॅनिंग कमिशनने याकडेही लक्ष द्यायला हवे. ऑलिम्पिक होण्याच्या आधी भारतात एक वर्ष सरावाला सुरुवात होते. खेळाडूंना काय हवे काय नको ते त्यावेळी पाहिले जाते. त्यामुळे खेळाडू अपेक्षित यश मिळवू शकत नाही. यात सातत्य असले तरच खेळाडू पदके मिळवू शकतील. माझी क्रीडा प्रबोधिनी आतापासून २०२० व २०२४ च्या ऑलिम्पिकची तयारी करते आहे. त्यासाठी अपेक्षित खेळाडूंवर विशेष मेहनत घेतली जात आहे. तेव्हा या ऑलिम्पिकमध्ये निश्चित यश मिळेल अशी आशा आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात वातावरण चांगले आहे. सध्या ४०० मीटर, ८०० मीटर, रेसलिंग, टेनिस या खेळांमध्ये चांगली प्रगती आहे. येणाऱ्या काळात या खेळाकडून चांगल्या अपेक्षा आहेत. भारत सरकारने खेलो इंडिया यासारखे उपक्रम सुरू करुन खेळाडूंच्या प्रगतीला हातभार लावला आहे. मी सुध्दा त्या कमिटीत आहे. या माध्यमातून खेळाडूंना नवनवीन तंत्र शिकण्यास मदत होईल, असे ती म्हणाली.
डोपिंगच्या वाटेला जाऊ नका
डोपिंगचे प्रमाण आपल्या देशात अत्यंत कमी आहे. मात्र, डोपिंग हा गुन्हाच आहे. कोणत्याही खेळाडूने या मार्गाला जाऊ नये. त्यामुळे खेळाडूंची कारकीर्द लवकर संपुष्टात येते. परदेशी कोचविषयी ती म्हणली की, भारतीय कोचमध्ये काहीही कमतरता नाही. त्यासाठी त्यांनाही चांगली प्रसिध्दी द्यायला हवी. परदेशी कोचप्रमाणे त्याचाही रिफ्रेशर कोर्स होणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या डाएटबद्दल ती म्हणाली की, आपल्याकडे फक्त भाजी, पोळी, भात असाच डाएट असतो. परदेशी खेळाडूंच्या तुलनेत तो अत्यंत कमकुवत आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूंनीही व्यवस्थित डाएट घ्यावा व तो उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारनेही प्रयत्न करावेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट